आमोद पाटील-आगरी बाणा: पठाणकोट हल्ला...अब तुम्हारे हवाले वतन साथियो...

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

पठाणकोट हल्ला...अब तुम्हारे हवाले वतन साथियो...



     पठाणकोट येथील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ७ जवान शहीद झाले. परंतु, हल्ल्याच्या नंतर भारतामध्ये काय घडत आहे? चर्चेच्या नावाखाली टीव्ही मीडियामध्ये पाकिस्तानमधले लोक आणून बसवले जात होते, भारतातून कोणीतरी आणून बसवले जात होते आणि यांची टीव्ही समोर शाब्दिक फेकाफेक चालू होती. पाकिस्तानमधून चर्चेत आणलेला व्यक्ती सदरील हल्ला पाकिस्तानच्या भूमीवरून झाला नाही, हा हल्ला भारतामधूनच कोणीतरी केला असेल हे ठासून सांगण्यात मग्न होता. मग इकडून त्याच्या विधानावर तावातावाने बोलणारे पण होते. टीआरपी मिळवण्यासाठी अतिशय संवेदनशील विषयाची तोडून-मोडून वाट लावली जात आहे.

     मिडियावर लगेच पाकिस्तानी लोक बोलवून विषयाचे गांभीर्य नष्ट करण्याचे प्रयत्न केला जातो आणि मिडियाने न्यायालयाच्या भूमिकेमध्ये शिरून न्यायदानाचे काम सुरु केले. हल्ल्यामागे कोण कमी पडला, कोणाची चूक आहे याच्यासाठी वरच्या पातळीवर चौकशी केलीच जाईल तेव्हा मिडीयाला स्वतःच्या अर्धवट माहितीवर न्यायदान करायची गरज नाही. घटनेची पूर्ण माहिती न घेताच लगेच चर्चांचे फड आखले जातात. शहिदांच्या बलिदानाच्या प्रसंगी होत असलेल्या चर्चांना गल्लीमध्ये चालू असलेल्या भांडणाचे स्वरूप आलेले आहे.

     पठाणकोट येथे हल्ला सुरु असताना ज्या तत्परतेने पहिल्या दिवशी हल्ला समाप्त झाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारी विधाने सरकारमधील मंत्र्यांनी केली. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गोळीबार सुरु झाला तेव्हा सदरील मंत्री महोदयांना आपले ट्वीट डिलीट करावे लागले. कोणतीही माहिती न घेता प्रत्येकजण टीव्हीवर बाईट देण्यासाठी उत्सुक होता. सर्वजण आमच्याजवळ अगोदरच हल्ल्याची माहिती होती म्हणून आम्ही हल्ला परतून लावला असे सांगण्यात मग्न होते. परंतु, त्यानंतरही दुसऱ्या हल्ला सुरूच राहिला. जे जवान ऑपरेशन करत होते त्यांच्याकडून माहिती मिळवण्याची तसदीही नेते मंडळीना घ्यावीशी वाटली नाही.

     आपल्या सर्वाना गर्व आहे भारतीय सैन्यावर ज्यांच्यामुळे हा देश सुरक्षित आहे. परंतु, ह्याच जवानांना विश्वासात घेऊन सरकार पाकिस्तान सोबत चर्चा करत आहे का? गेले एक महिनाभर भारत-पाकिस्तानच्या विविध स्तरावर चर्चा झाल्या. परंतु, त्यानंतरही पठाणकोट येथे एअरबेसवर हल्ला झाला आणि आता हल्ला संपल्यानंतर मिळालेले पुरावे असे सांगतात की, सदरील हल्ला हा पाकिस्तानमध्ये बसलेल्यांनीच घडवून आणला आहे. चर्चा करणारे चर्चा करतात आणि जवान सीमेवर शहीद होत राहतात ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. कारगिल युद्धाच्या अगोदर देखील पाकिस्तान सोबत चर्चा चालू होत्या आणि त्यानंतर जे युध्द झाले त्यात भारताचे अपरीमित नुकसान झाले. पाकिस्तानची हीच नीती नेहमी राहिलेली आहे. आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे. प्रत्येक हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानाला देखील एक कुटुंब असते...त्या जवानांच्या मृत्युस दोषी असणाऱ्यांना पुरावे देऊनही शिक्षा होत नसेल आणि सरकारला चर्चेत गुंतुवून ते दहशतवादी अजून एखादा हल्ला करण्यासाठी तयार होत असतील तर अश्या चर्चा काय कामाच्या हा प्रश्न नेहमीच मनात येतो. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊनही पाकिस्तानने नक्की कोणता तपास केला हे उघड आहे. हाफिज सईद वैगेरे दहशतवादी पाकिस्तानमध्ये राहून भारताविरुद्ध भाषणे देत आहेत आणि पाकिस्तान सरकार त्याला वाचवत आहे. ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये सापडला यातच पाकिस्तानची भूमिका समजते. आज त्याच देशाला जेव्हा दहशतवादी हल्ल्याचे फटके बसायला सुरुवात झाली तेव्हा मात्र आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत हे सांगायची वेळ आली. त्यामुळेच, लोकशाही मार्गाने निवडून येणाऱ्या भारतीय सरकारची पाकिस्तानविषयक भूमिका सर्व भारतीय जनतेला समजणे आवश्यक आहे...

     पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली....हल्ल्यातील शहिदांची बातमी पाहून एकच भावना मनात आली....
कर चले हम फ़िदा जानो-तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो

आपलाच,
आमोद पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा