आमोद पाटील-आगरी बाणा: ऑक्टोबर 2010

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

आगरातली आगरी बोली-1© AGRI BOLI



आगरातली आगरी बोली-१


दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. (थोडक्‍यात, प्लांटेशन) असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगावपासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. या समाजाची बोली ती आगरी बोली, असे या बोलीचे नामकरण करता येईल, परंतु आगरी ही एक जात समजली जाते. तेव्हा अशी जातीची बोली- आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या या बोलीस आगरातील बोली- "आगर बोली' म्हणणे संयुक्तिक वाटते.ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्चारस्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी अनुनासिक आहे; तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे; तर नवी मुंबईतील ही बोली कोळी समाजबोलीमिश्रीत अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोलीमिश्रीत अशी येते.आगरी समाजाचे पूर्वी 1) शुद्ध आगरी, 2) दस आगरी व 3) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात, तेही आता मानले जात नाहीत.आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "ळ'च्या ऐवजी "ल' व "ण'च्या ऐवजी "न' जसे सकाळ- सकाल, पळव-पलव, कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषतः लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्‍वरीत जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हाताऱ्या आजीकडून- डोकऱ्यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.गाय बा चऱ्हतं भीमा तीरी गो,भीमा तीऽऽरीगायला राखीत किस्न हरी गो,किस्न हऽऽरीकाय बा वर्नू गायची शेपू गोगायची शेऽऽपू,जशी नांगीन घेतं झेपू गो,नांगीन घेतं झेऽऽपूकाय बा वर्नू गायच्या मांड्या गो,गायच्या मांऽऽड्याजशा पालुखीच्या दांड्या गोपालुखीच्या दांऽऽड्याइथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टीच्या ओनाम्याला येते ती तीन भावंडांची गोष्ट-अकामकची गोष्टयक व्हता अका, यक व्हात मका. आन्‌ त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवाला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.(यक- एक, व्हता- होता, खारीन- खाडीत, झोलाला- मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी)- मासळीचे प्रकार, चुलीन- चुलीत, भुजत- भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली- करपली, डोचूक- डोके, जवान- जेवण. कावला-चिरीची गोष्टयकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलंवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी काऱ्हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, "चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्‍या गोनी दे. "चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, "कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्‍या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, "कावलंदादा, तुझी माझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'दृष्टांतपाठात शोभाव्या अशा किती तरी आगर बोलीत लोककथा आहेत. अशी बोली ऐकताना या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील.1) "ळ' बद्दल "ल'- कंटाळा- कंटाला, नळ- नल, धूळ- धूल.2) "ण' बद्दल "न'- आठवण- आठवन, पण- पन, गोण- गोन.3) शब्दात प्रथम येणारा "ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या "ड'चा "र' होतो. डबा- डबा, डसा, कडू- करू, वेडा- यरा, तडांग- तरांग.4) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो- गेलो- गेलू, आलो- आलू.5) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे "स' येतो- घेतो- घेतस, मारतो- मारतस, करतस, जातस इ.6) शब्दान्ती "त' ऐवजी "व' येतो- घेतलात- घेतलाव, बघितलेत- बघितलाव, केलाव, तोरलाव इ.7) एकारान्त शब्द अनुस्वारान्त होतो- कुठे- कुठं, तिथे- तिथं, इथं.8) एकारान्त अनेक वचनात आकारान्त होते- झाडे- झारा, पोरे- पोरा, लाकडा, शेता.9) अनुस्वार स्पष्ट उच्चारला जात नाही- आंबा- आऽबा, चिंच- चिऽच, रंग- रऽग, हंडा- हाडा, पिंपळ- पिपल, खुंट- खूट.10) छ चा सर्रास स होतो- छत्री- सत्री, छोटा- सोटा, छोकरा- सोकरा, छगन- सगन, छडी- सरी.11) शब्दान्ती कटोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो- केवडा- कव्हरा, तेवढा- त्यव्हरा, जेवढा- जव्हरा.12) शब्दाच्या सुरुवातीच्या र चा कधी ल होतो- रडतोय- लरतय, रबर- लबर,13) जोड शब्दातील र वेगळा उच्चारला जातो- प्रकाश- परकास, मात्र- मातर, कात्री- कातर, श्रीमंत- शीरीमंत.14) श चा स होतो- शरद- सरद, शाप- सराप, शोध- सोद.15) सुरुवातीचा वि जाऊन त्याजागी इ. येतो- विमान- इमान, विमल- इमल, विषय- इषय, विरजण- इरजन.16) पण ऐवजी पन किंवा बी येते- मीपण- मीपन/बी, तू पण- तूपन/बी (सुद्धा ह्या अर्थाने- तू सुद्दा चल- तूपन/बी चल).

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आमची आगरी बोली-2 AGRI BOLI



आमची आगरी बोली-२


17) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो- गर्दीतून- गर्दीशी, गावातून- गावानशी, लांबून- लांबशी, गावाहून- गावशी.18) ला प्रत्यया ठिकाणी ल+महाप्राण येतो- तुला- तुल्हा, तिला- तिल्हा. मलाचे मना होते.19) त ऐवजी न येतो- फुलात- फुलान, रानात-रानान, मनात- मनान.20) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो- पोरांनो- पोरांनू/पोरांहू, गाववाल्यांनो- गाववाल्यानू/हू.21) "प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते- त्याप्रमाणे- त्या सारा/री मुलाप्रमाणे- मुलासारा, साखरेप्रमाणे- साकरंसारा.22) "होता', "नव्हता' ऐवजी "व्हता', "नता' येते.23) "आता'चे "आथा' होते- आथा कल्हा लरतस?24) "अ'चा सर्रास "आ' होतो- अंग-आऽग, अंतर- आंतर, असा- आसा.25) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते- कन्हाला आलास?26) "वे' ऐवजी "य' येतो- वेडा- यरा, वेस- यस, वेगळा- यगला, वेद- यद, वेसण- यसन.27) "म' ऐवजी "म्ह' येतो- महादेव- म्हादेव, मोठा- म्होटा, मारुती- म्हारोती, महाराज- म्हाराज.28) "ढ' ऐवजी "ऱ्ह' येतो- गाढव- गाऱ्हव, पेढा- पेऱ्हा, कढी- कऱ्ही.29) सुरुवातीच्या "ओ' ऐवजी "व' येतो- ओटा- वटा, ओवा- ववा, ओकारी- वकारी, ओल- वल.30) "ए' ऐवजी "य' येतो- एक- यक, एकदा- यकदा, एवढा- यवऱ्हा.31) शेवटच्या ईऐवजी य येतो- सुई- सुय, रुखमाई- रुखमाय, आई- आय, घाई- घाय, जावई- जावय.32) सुरुवातीचा ऐ कार जाऊन मूळ अक्षरापुढे ई कार येतो- बैल- बईल, म्हैस- म्हईस, वैद्य- वईद, मैल- मईल, खैर- खईर, सैल- सईल.33) सुरुवातीचा औ कार जाऊन मुळाक्षरापुढे ऊ येतो- मौज- मऊज, गौर- गऊर, फौज- फऊज, हौद- हऊद, कौल- कऊल.अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात पूर्वी लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही, पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा AGRI BHASHA



आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा

"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. ९०च्या दशकापासून समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.