आमोद पाटील-आगरी बाणा: 2012

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

आगरी समाज महाअधिवेशन AGRI SAMAJ MAHA ADHIVESHAN

अखिल आगरी समाज परिषद ७ वे महाअधिवेशन(AGRI SAMAJ MAHA ADHIVESHAN)

अधिवेशनात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी


निमंत्रण पत्रिका

निमंत्रण पत्रिका-२३ डिसेंबर,२०१२

निमंत्रण पत्रिका-२४ डिसेंबर,२०१२

आगरी समाज महाअधिवेशनातील कार्यक्रम

आगरी समाज महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर भाषण देताना शरद पवार

प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात न घेता, ज्यांच्या जमिनी विमानतळासाठी जाणार आहेत अशा शेतकऱ्यांना विचारात न घेता शरद पवार यांची परस्पर घोषणा.

आगरी समाज महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर भाषण देताना मुख्यमंत्री

मनोहर जोशी आगरी समाज महाअधिवेशनात, मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकनेते दि.बा.पाटील यांचा सत्कार, अखिल आगरी समाज परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार

मुख्यमंत्र्यांचे भाषण

मा.मुख्यमंत्री आगरी समाज महाअधिवेशनात(MAHARASHTRA CM AGRI SAMAJ MAHA ADHIVESHAN)

मा.केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आगरी समाज महाअधिवेशनात लोकनेते दि.बा.पाटील यांचा सत्कार करताना( SHARAD PAWAR AGRI SAMAJ MAHA ADHIVESHAN)


रविवार: २३ डिसेंबर,२०१२
आगरी समाज महाअधिवेशन

रविवारी पनवेलमध्ये खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ अ‍ॅड. दत्ता पाटील नगरीत अखिल आगरी समाज परिषदेच्या सातव्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या व्यासपीठावर प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दि. बा. पाटील, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकूर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालक मंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, रायगडचे जिल्हाधिकारी च. के. जावळे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त ए. के. शर्मा आदी उपस्थित होते.

कोण काय म्हणाले/मान्यवरांची विचारधारणा:

शरद पवार,
देशावर जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाले, तेव्हा भुमीच्या रक्षणासाठी स्थानिक समाजाचे योगदान मोठे होते.  समाज म्हणून एकजूट जरुर असली पाहीजे, मात्र इतरांचा व्देष करुनये. सामाजिक न्याय हक्कासाठी निश्चित लढण्याची गरज आहे.  समाजाला दिशा देण्याचे काम समाजपरिषदेने करावे.  समाजातील लोकांनी शिक्षणात प्रगती करावी. आगरी समाजाने महाराष्ट्रात इतिहास निर्माण केला. परकीय आक्रमणे झाली. तसेच मोगल आणि इंग्रजांच्या काळातसुध्दा त्यांच्या पिढीने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. कुठलाही इतिहास आगरी समाजाचे योगदान लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही. या समाजाच्या स्वाभिमान तसेच संघर्षमय वृत्तीमुळे त्याने वेळोवेळी न्याय व हक्क पदरी पाडून घेतले आहेत. तसेच आजही तो आपल्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरतो याचा समाजाला अभिमान असल्याचे उद्गार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन येथील ७व्या अखिल आगरी समाज परिषदेच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी दिवंगत ऍड. दत्ता पाटील नगरीमध्ये व्यक्त केले.जेएनपीटीप्रमाणेच विमानतळासारखे अनेक प्रकल्प तुमच्या डोक्‍यावर येत आहेत. नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत. या विकासात तुमची पिढी कुठे आहे, असा प्रश्‍न विचारत आगरी समाजाचा माणूस तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत किती दिवस काम करणार याचा विचार करा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. त्याच वेळी वाळू, मुरूम, बिल्डर यांसारख्या धंद्यापेक्षा आगरी युवक उद्योजक, कारखानदार झालेला मला पाहायचा आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.
जमीन गेल्यावर शेतकरी उद्‌ध्वस्त होतो. म्हणून प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाप्रमाणेच; पण चार पट पैसे द्यावेत, तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घ्यावे. नोकरी न दिल्यास त्या कुटुंबाला नोकरीतील 20 वर्षांचा पगार एकदम द्यावा, अशी शिफारस आपल्या अध्यक्षतेखालील समितीने केली असून, त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ते विधेयक लोकसभेत मांडले जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज सातव्या आगरी समाज परिषदेचे उद्‌घाटन करताना दिली.
‘आगरी मुलींना शिक्षण द्या’
मायभूमीच्या रक्षणासाठी आगरी बांधवांनी दिलेल्या योगदानाशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही, असे अधोरेखित करून नारायण नागू पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील आदी आगरी समाजधुरिणांच्या कार्याचा आढावा त्यांच्या भाषणातून घेतला. आगरी माणसाचा स्वभाव फणसासारखा आहे. त्यात वरून काटे दिसत असले तरी तसा मधुर आस्वाद अन्य कुणातही नसल्याचे पवार म्हणाले. घरातल्या मुलीला शिकवा ती घर पुढे नेईल. मुलामुलींना शिक्षण दिल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही, असेही त्यांनी सुनावले. आपण संरक्षणमंत्री असताना हवाई दलात मुलींना भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे फायदे दिसू लागले आणि विमानांचे अपघात कमी याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलींमधील एकाग्रता हे त्यांच्या यशाचे मूळ कारण असल्याने आगरी मुलींना शिक्षण द्या, म्हणजे त्या सैन्य दलात भरती होतील/उच्चपदावर काम करतील, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
या वेळी आगरी समाजाच्या मोडेन; पण वाकणार नाही या बाण्याचा उल्लेख करीत श्री. पवार यांनी आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील, ऍड्‌. दत्ता पाटील, ग. ल. पाटील, दि. बा. पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला.

छगन भुजबळ,
आगरी समाज इमानदार, कष्टाळू, नीडर, बेडर व लढवय्या आहे. आगरी समाजापुढे आजघडीला अनेक प्रश्न आहेत ते सरकारदबारी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल,’ असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. आगरी समाजाचे योगदान आता सर्व क्षेत्रात दिसत आहे.  सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी आरक्षण आहे. आरक्षणासाठी भविष्यात एकजूटीने लढावे लागेल. सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी अशा अधिवेशनांची आवश्यकता असते. सात ते साडेसात हजार जातींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, ओबीसी व खुला अशा चार वर्गांत समाविष्ट केले. यापैकी मोठय़ा संख्येने असलेल्या ओबीसींची जातगणना करा असा ठराव करण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे रडत न बसता एकत्रितपणे लढा दिला पाहिजे. आगरी समाज ओबीसी वर्गात मोडतो. त्यामुळे आपण सारे ओबीसी म्हणून लढू या, अशी भावनिक साद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी घातली. आपल्या महाराष्ट्रात ओबीसींपैकी सर्वात जास्त म्हणजेच नऊ आमदार व तीन खासदार आगरी समाजाचे आहेत, असे भुजबळ यांनी नमूद केले.


गणेश नाईक,
शासनाची भूमिका नाकारता येणार नाही, पण प्रकल्पग्रस्त या शिक्क्याखाली किती दिवस जगायचे असा सवाल उपस्थित करून ही मानसिकता बदलली पाहिजे. जमिनीचा योग्य मोबदला मिळत असेल, तर त्याद्वारे विकास साधला पाहिजे; अन्यथा नवी पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आपली भूमिका मांडली. भविष्याचा विचार न करता जमिनीतून मिळालेला पैसा आपण संपवला. आपण चुकीचे वागलो, हे त्यांनी खुल्या मनाने कुबल केले. विकास साधायचा असेल, तर प्रकल्पाच्या वाढीसोबत भूमिपुत्राचा विकासदेखील झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. असे न झाल्यास आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपला विकास साधताना परिसरात येणार्या अन्य जाती-धर्मांच्या बांधवांनाही पंखाखाली घ्यायला हवे, अशी अपेक्षाही नाईक यांनी व्यक्त केली.

रामशेठ ठाकूर,
आगरी समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. सरकारी नोकरीत अजूनही आगरी समाजाला फारसे स्थान नाही.  स्वतंत्र आरक्षण धोरण राबविण्याची गरज आहे. समाजाच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरुन एकत्र येण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.  प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वेळेतच सोडवले जावेत तसेच प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात असताना प्रकल्पग्रस्त पुढील किमान ५० वर्षे ताठ मानेने जगला पाहिजे. त्याकरता निश्चित स्वरूपाचे धोरण सरकारने राबवले पाहिजे. अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार दि. बा. पाटील हे वयाच्या 87 वर्षीही समाज एकत्र करून नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी त्यांना मनापासून साथ देणे गरजेचे आहे, असे आवाहनही श्री. ठाकूर यांनी समाजबांधवांना केले.

इतर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. त्यांना सुनील पाटील यांनी उत्तम साथ दिली. उपस्थितांचे आभार परिषदेचे सरचिटणीस का. ध. पाटील यांनी मानले.

सोमवार: २४ डिसेंबर,२०१२
खुले अधिवेशन

सोमवारी पनवेलमध्ये खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ अ‍ॅड. दत्ता पाटील नगरीत अखिल आगरी समाज परिषदेच्या सातव्या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या खुल्या अधिवेशनाला प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दि. बा. पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार सुरेश टावरे, आमदार प्रशांत ठाकूर, अ‍ॅड. लीलाधर डाके, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रवीशेठ पाटील, खासदार सुरेश टावरे, योगेश पाटील, सिडकोचे संचालक नामदेव भगत आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री,
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळामुळे रोजगारनिर्मितीला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यात आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय प्रकल्प आल्यास येथील तरुणांना रोजगार, व्यवसाय, उद्योगधंदे मिळतील. आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे विदेशी डॉलर महाराष्ट्रात येतील, चांगल्या गुंतवणुकीमुळे आपला विकास होईल, त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ होणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. पनवेल भागात जेएनपीटी, ओएनजीसीसारखे मोठे प्रकल्प आल्याने येथील जमिनींना चांगला भाव आला. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या सुविधा, औद्योगिक शांतता मिळाली तर येथे उत्तम प्रकारे गुंतवणूक होऊन तरुणांना रोजगार व व्यवसायही मिळेल. कोणत्याही प्रकल्पासाठी जमीन घेताना संबंधित शेतकऱ्यांना त्या जमिनीचा योग्य तो भाव व भागधारक अथवा खासगी कंपनीत समभाग, प्रकल्पांत रोजगारासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरांना काही कायदे लावून नियमित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सिडकोने बांधलेली घरे मोडळकीस आलेल्या इमारतींना अतिरिक्त चटई क्षेत्र दऊन पुनर्रचना करण्यासाठी नवे धोरण आणणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘सेझ’संबधी नवे धोरण आखण्यात येणार असून त्यात ६० टक्के जागेत उद्योग व उरलेल्या ४० जागेमध्ये घरे, शाळा, पार्क, उद्यानाचा समावेश असणार आहे. ओबीसींना समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करून टप्प्याटप्प्याने शिष्यवृती दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मनोहर जोशी,
आगरी समाज हा जनहित जपणारा आहे. हे महाअधिवेशन आगरी समाजाला निश्चितच उपयोगी ठरेल. या समाजापुढे अनेक समस्या आहेत त्यासाठी समाजाची एकजूट होणे गरजेचे आहे. या समाजातील तरुण पिढीने नोकऱ्यांच्या मागे न लागता रोजगार मिळवून देणारी ताकद उभी करावी, असे विचार माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मांडले.

शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

अखिल आगरी समाज परिषदेचे ७ वे महाअधिवेशन AKHIL AGRI SAMAJ PARISHAD



आयोजक:
अखिल आगरी समाज परिषद

अखिल आगरी समाज परिषद अध्यक्ष:
मा.श्री.दि.बा.पाटील साहेब.

संमेलनाध्यक्ष:
मा.श्री.रामशेठ ठाकूर.

स्थळ:
खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदान(पनवेल)

कार्यक्रम रूपरेषा:
उद्घाटन: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार  यांच्या हस्ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता.
खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता.

मान्यवर:
उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, आ. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, खासदार संजीव नाईक, खा. संजय दिना पाटील, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. जयंत पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. विवेक पाटील, आ. मीनाक्षी पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चलो पनवेल....!!
राज्याच्या लोकसंख्येत ५५ ते ६० लाख आगरी समाज बांधवांची संख्या असून आगरी समाजाचे संघटन अधिक व्यापक आणि प्रभावी करून त्या संघटित ताकदीच्या बळावर समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने तसेच आगरी समाजाचे मुंबई व नवी मुंबई शहराच्या निर्मितीमध्ये असलेले भरीव योगदान याची शासनाला खर्‍या अर्थाने ओळख पटवून देण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे येत्या २३ आणि २४ डिसेंबर रोजी आगरी समाजाचे सातवे महाअधिवेशन खांदेश्वर पनवेल येथे आयोजित करण्यात आले आहे . या महाअधिवेशनाचे उद्घाटन २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तर २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे . या दोन्ही समारंभाचे अध्यक्षस्थान प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा परिषदचे अध्यक्ष माजी खासदार दि .बा .पाटील भूषविणार आहेत.

आगरी समाज बांधवाच्या नव्या पिढीसमोर भविष्यात उद्भवणारी संकटे, समस्या, आगरी बोलीभाषा, समाजातील बदलते लोकजीवन, शासकीय स्तरावर समाजाचे प्रलंबित असलेले प्रश्न, आगरी साहित्य, आगरी लग्नसमारंभ त्यातील धवला(लग्नगीते), आगरी शिक्षणसंस्था, कर्तृत्ववान आगरी माणसं, साहित्यिक, उद्योजक, गुणवंत प्रतिभावान विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्रीगण, महिला, युवक, समाजसेवी संस्था, आर्थिक पतसंस्था, सहकारी संस्था, प्रगतशील शेतकरी आणि कलाकार, पत्रकार या समाजातील सर्व घटकांची वीण घट्ट बांधून आगरी समाज संघटन व्यापक करण्याच्या उद्दिष्टाने हे सातवे महाअधिवेशन आयोजित केले आहे. मुंबईची ६२ गावे, नवी मुंबईची ९५ गावातील शेतजमिनी व मिठागरे आगरी समाज बांधवांची होती. शासन व खाजगी कंपन्या मालकी आता इथे प्रस्तापित झालीय. समाजाच्या साडेबारा टक्के भूखंड, शासनदरबारी नोकर्‍या, मच्छीमारांचे प्रश्न व इतर समाजाशी निगडीत अनेक प्रश्नांवर चर्चा, परिसंवाद होणार असून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल.

अखिल आगरी समाज परिषद आगरी समाजाची मध्यवर्ती संघटना असून १९५९ पासून आजवर या परिषदेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी एकूण सहा अधिवेशन घेण्यात आली आहेत . आता सातवे महाअधिवेशन पनवेल येथील खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भव्य मैदानात होत आहे .

या अधिवेशनात क्रीडा , सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्नांचा सविस्तर परामर्श घेऊन ते सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील . यात प्रामुख्याने आगरी समाजातील हळदी - साखरपुड्यांवरील अमर्याद खर्चासारख्या अनिष्ट रूढी बंद करून इतर चांगल्या रुढी - परंपरा टिकविण्याच्यादृष्टीने अधिवेशनात सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे . तसेच एखाद्याच्या स्वर्गवासानंतर असणारा १३ दिवसांचा दुखवटा कमी करणे , प्रकल्पग्रस्तांनी पुर्नवसनासाठी मिळालेल्या पैशांचा योग्यप्रकारे विनियोग करणे , शेती - मिठागरे - रेती काढणे तसेच मच्छीमारीही बंद झाल्याने भूमीहिन शेतकऱ्यांना शेतकरी दाखल मिळण्यासाठी विशेषत्वाने या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

समाज संघटन अधिक व्यापक व प्रभावी करून त्या ताकदीच्या बळावर समाजाचे विविध प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने अखिल आगरी समाज परिषदेतर्फे येत्या 23-24 डिसेंबर रोजी 7 वे महाअधिवेशन पनवेल येथे भरवले आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते व परिषदेचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या दोनदिवसीय महाअधिवेशनाचे उद्‌घाटन 23 तारखेला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल. यावेळी उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, खा. संजय दिना पाटील, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ. प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

24 तारखेला दुपारी 4 वाजता खुल्या अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होईल. या वेळी माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे आदी मान्यवर उपस्थित राहतील. त्याच दिवशी महिलांच्या कबड्डी सामन्यांचे उद्‌घाटन होईल. सायंकाळी समाजातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या अधिवेशनामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील. या महाअधिवेशनाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.



गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

SEZ ने केली शेतकऱ्यांची फसवणूक







रिलायन्सनिर्मित महामुंबई एसईझेडसाठी भूसंपादन करण्यास मुदतवाढ देण्यास राज्य सरकारने नकार दिल्यानंतर रिलायन्स गाशा गुंडाळण्याच्या बेतात असल्याने, या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन पॅकेज मिळण्याची आशा धूसर झाली आहे. जमीनही गेली आणि नुकसानभरपाईही नाही, अशा कात्रीत सापडलेल्या येथील शेतकऱ्यांनी आपली जमीन परत मिळवण्याचा निर्धार केला असून त्यासाठी कोर्टात लढा देण्याची तयारी केली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि पनवेल तालुक्यातील ४५ गावांतील सुमारे ३० हजार एकर जमिनीवर एसईझेड विकसित केले जाणार होते. मात्र रिलायन्सच्या या एसईझेडला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. परिणामी, रिलायन्सला दिलेल्या मुदतीत फक्त १३ टक्के जमीन संपादित करता आली. राज्य सरकारनेही स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन भूसंपादनाला मुदतवाढ देण्यास नकार दिला.

सुरुवातीला येथील जमीन सहज संपादित करता यावी, यासाठी रिलायन्स कंपनीतर्फे अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रिलायन्सला जमिनी विकल्या. या व्यवहाराच्या वेळी साठेखत, खरेदीखत करताना कंपनीतर्फे शेतकऱ्यांना एक पुनर्वसन पॅकेज दिले होते. त्यानुसार, वरकस जमिनीसाठी एकरी पाच लाख आणि भातशेतीसाठी एकरी १० लाख रु. दर देण्याचे ठरले होते. तसेच या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना विकलेल्या जमिनीच्या साडेबारा टक्के भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले होते. हा साडेबारा टक्के भूखंड नको असेल, तर त्याच्या विकसित भूखंडाऐवजी एकरी पाच लाख रु. मोबदला तात्काळ देण्याचे मान्य करण्यात आले होते. हे दोन्ही पर्याय नको असतील, तर संबंधित प्रकल्पबाधित कुटुंबाला आयुष्यभरासाठी दरमहा पाच हजार रु. देण्यात येतील, असे लेखी दिलेले होते. तसेच प्रकल्पबाधितांचे जीवनमान सुधारण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीला प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले होते. प्रकल्पग्रस्ताला नोकरी नको असेल, तर त्या कुटुंबाला नोकरीऐवजी तीन लाखांची रक्कम देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. ज्या गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार होता, त्या गावांत सुधारणा करण्यासाठी ९० कोटींचा खर्च रिलायन्स कंपनी करणार होती. त्याविषयी लेखी आश्वासन दिले होते. ते दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर्डही झाले होते.

मात्र राज्य सरकारने भूसंपादनास मुदतवाढ नाकारल्याने या भागातील प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहेत . त्यामुळे या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन पॅकेज मिळण्याची आशाही धूसर झाली आहे . या भागातील शेतकऱ्यांनी जमीन देताना साडेबारा टक्के योजनेचे पाच लाख आणि नोकरीच्या नोटीसचे तीन लाख रु . घेतलेले नाहीत , त्यांची या योजनेतील रक्कम सेझकडून आलेली नाही .

रायगड जिल्ह्यात जवळजवळ ७०० एकर जमीन शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी दिली आहे . त्या बदल्यात जमीन विकलेल्या लोकांना कंपनीकडून साडेबारा टक्के भूखंडांच्या योजनेच्या बदल्यात जवळजवळ ३५ कोटी रुपये मिळावयाचे आहेत . नोकरीच्या नोटीसशी संबंधित २१ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे ; मात्र सरकारने मुदतवाढ नाकारल्याने रिलायन्सच्या सेझ ने गाशा गुंडाळला आहे . सेझ कंपनीची या भागातील जवळजवळ सर्व कार्यालये बंद झाली आहेत . या कंपनीने जमीन खरेदी करण्यासाठी नेमलेले दलाल आणि नोकरही गायब झाले आहेत . त्यामुळे या शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काची रक्कम कोणाकडे मागावी , असा प्रश्न निर्माण झाला आहे .

एसईझेडबाबत कंपनीने दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नसतील आणि येथे प्रकल्प होत नसेल , तर आमच्या जमिनी परत कराव्यात , अशी मागणी शेतकरी करीत आहेत . विकलेल्या जमिनींच्या विक्रीचे अधिकार पुन्हा शेतकऱ्यांना मिळावेत , अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे .

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

प्रकल्पग्रस्त आगरी शेतकऱ्यांचा एकच वाघ (AGRI TIGER)






प्रकल्पग्रस्त आगरी शेतकऱ्यांचा एकच वाघ....लोकनेते श्री.दि.बा.पाटील साहेब.....


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी रचलेला इतिहास संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला स्फुर्ती देतो. शिवरायांच्या रायगड जिल्ह्याला एक आगळावेगळा सोनेरी इतिहास आहे. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वाभिमानाच्या लढाईचा वसा येथील भूमीपुत्र कायम जपत असल्याची बाब जेएनपीटी आंदोलनातून दिसून आली.

शिवरायांचे शौर्य आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून स्फुर्ती घेऊन झालेला जेएनपीटीचा लढा नक्कीच इतिहासाच्या पानावर लिहिला जाण्याजोगा आहे. आपल्या न्यायहक्कासाठी येथील भूमीपुत्र असलेल्या शेतक-‍यांनी उभारलेले अनेक लढे हे रायगड जिल्ह्याच्या इतिहासाची शान वाढविणारे आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्काची लढाई पेटली ती जासईच्या आंदोलनाने. तिथे हौतात्म्य पत्करलेल्या पाच भूमीपुत्रांच्या बलिदानाने. या सर्व लढ्यांची मुहूर्तमेढ रोवली ती लोकनेते दि.बा.पाटील यांनी. आयुष्याची ८० वर्षे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी दिली. या सर्वांना लाल सलाम...!

जेएनपीटी आंदोलनातून महाराष्ट्र आणि देशानेदेखील काही शिकण्यासारखे आहे. जेएनपीटी लढाई मागील २८ वर्षांपासून सुरू आहे. मुळात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्काची लढाई १९७१-७२ सालीच सुरू झाली. सरकारने नवी मुंबई वसविण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हापासूनच या प्रश्‍नाचा जन्म झाला. सरकारने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जमिनी संपादित केल्या.नवी मुंबईत येणार्‍या ठाणे जिल्ह्याच्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न तसा सुटलेला आहे. मात्र, नवी मुंबईत मोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुक्याकडे सरकार तितकेसे का गंभीर नाही? हा मोठा प्रश्‍न आहे. यामुळेच पनवेल आणि उरण तालुक्यात मोठी आंदोलने पेटली. त्यापैकीच एक महत्त्वाचे आंदोलन म्हणजे जेएनपीटीतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न होय.

नामदेव शंकर घरत, रघुनाथ अर्जुन ठाकूर, केशव महादेव पाटील, महादेव हिरा पाटील, कमलाकर कृष्णा पाटील यांचे हौतात्म्य आणि दि.बा पाटील यांचा त्याग यातून आंदोलकांमध्ये स्फुर्ती आली होती. प्रकल्पग्रस्तांचा हा लढा सामाजिक न्यायहक्कासाठी होता. २८ वर्षापूर्वी दि.बा.पाटील यांनी सुरू केलेले जेएनपीटी आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. ५० वर्षात रायगड जिल्ह्यातील ऐक्य कोणी मोडू शकले नाही. शेतकर्‍यांची ऐक्याची ताकद समाजाला नक्कीच संदेश देणारा आहे. या लढाईचे सर्वेसर्वा असलेले दिबा यांचे शरीर थकलेले आहे. मात्र, आजदेखील त्यांचे मन वाघाचे आहे.

ही बाब भूमीपुत्रांच्या आणि एकूणच समाजातील तरुण पिढीला आदर्शवत ठरणारी आहे. जेएनपीटीची अखेरची लढाई म्हणून दिबांच्या नेतृत्वाखाली जिंकली.

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक बरखास्त(MTHL, CIDCO, JNPT)



शिवडी - न्हावा - जासई - चिर्ले दरम्यान उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित सागरी सेतूसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत त्यांच्या पुनर्वसनाबाबत जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि एमएमआरडीए अधिकारी यांच्यात मंगळवारी पनवेल येथे एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . परंतु सदर बैठकीला जोपर्यंत सिडकोचे एमडी तानाजी सत्रे येत नाहीत तोपर्यंत याबाबतची बैठक न करण्याचा इशारा संघर्ष समितीचे नेते माजी खासदार दि . बा . पाटील यांनी दिल्याने सदर बैठक विना चर्चा गुंडाळण्यात आली . त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे घोंगडे तसेच भिजत पडले .
सेतू उभारण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत त्या शेतकऱ्यांनी योग्य त्या मोबदल्याशिवाय जमीन संपादन करू देणार नसल्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे . पुनर्वसनासंदर्भात चर्चा करण्यासाठी संघर्ष समितीचे प्रमुख नेते माजी खासदार दि . बा . पाटील , माजी खा . रामशेठ ठाकूर , आमदार विवेक पाटील , रायगडचे जिल्हाधिकारी जावळे , एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात मंगळवारी पनवेल जिमखान्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती . परंतु या बैठकीला सिडकोच्या एमडींनी उपस्थित राहणे अपेक्षित होते , असे संघर्षसमितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते . त्यामुळे जोपर्यंत सिडकोचे एमडी या बैठकीस येत नाहीत तोपर्यंत बैठक न घेण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला .

शेतकऱ्यांच्या मागण्या
न्हावा - शिवडी ट्रान्स हार्बरच्या उभारणीच्या निमित्ताने उरण - पनवेल तालुक्याभरातील ४९४ खातेदारांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत . शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभावाप्रमाणे एक रकमी नुकसान भरपाई देणे व सिडकोप्रमाणे साडेबारा टक्के भूखंड देणे , प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वारसाला प्रकल्पग्रस्त दाखला देऊन जेएनपीटी व त्यावर आधारित उद्योगामध्ये नोकरी मिळवण्यास तो ग्राह्य समजण्यात यावा . तसेच जोपर्यंत कायमस्वरुपी नोकरी मिळत नाही तोपर्यंत दाखला धारकाला एमएमआरडीएतर्फे मासिक वेतन देण्यात यावे , शेतकऱ्यांना या सेतू प्रकल्पामध्ये शेअर होल्डर करुन घ्यावे तसेच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या क्वॉरी , कंटेनर यार्ड , गोडाऊन , दुकाने आदी व्यवसायिकांना योग्य नुकसान भरपाई व पर्यायी जागा द्यावी आदी मागण्या संघर्ष समितीने केल्या आहेत .

शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी यापूर्वीही उरण तालुका परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित करण्यात आल्या . विशेषत : सिडकोच्या जमीन संपादनाच्या निमित्ताने आजही शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित आहेत . त्यातच नव्या शहराचे शिल्पकार अशी बिरुदावली मिरविणाऱ्या सिडकोने उरण तालुका परिसरात प्रकल्पग्रस्तांच्या नजरेत भरेल असे कोणतेही काम केलेले नाही . उलट शेतकऱ्यांच्या जमिनी थेट रिलायन्ससारख्या खासगी सेझ प्रकल्पाला नवी मुंबई सेझच्या निमित्ताने शासनाने देऊन टाकल्या आहेत .

सिडकोची फसवेगिरी
जमिनींना योग्य मोबदला आणि १२.५% भूखंड मिळावेत यासाठी १६ आणि १७ जानेवारी १९८४ साली झालेल्या जासई-दास्तान फाटा-पागोटे येथील लढ्यात पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात ५ शेतकऱ्यांचा बळी गेला होता आणि आज २०१२ साली देखील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही.
शिवडी - न्हावा - जासई - चिर्ले सागरी सेतूसाठी सिडको भूसंपादनाची प्रक्रिया करणार आहे आणि सिडकोतर्फेच १२.५% भूखंड आणि प्रत्यक्ष जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. संपादित केलेली जमीन नंतर MMRDA कडे हस्तांतरित करणार आहे.
मग याचं न्यायाने...
JNPT आणि NH-4B प्रकल्पग्रस्तांना देखील सिडकोतर्फेच १२.५% भूखंड मिळायला हवेत, कारण ही जमीन देखील शेतकऱ्यांकडून सिडकोनेचसंपादित केली होती आणि नंतर ही जमीन शेतकऱ्यांशी कोणताही विचारविनिमय न करता, जमिनीला कोणत्याही प्रकारचा योग्य मोबदला न देता, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न करता JNPT कडे हस्तांतरित करण्यात आल्या आणि JNPT ने देखील आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला, १२.५% भूखंड दिलेले नाहीत. त्यामुळे JNPT, NH-4B प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड सिडकोनेच द्यायला हवेत.
प्रकल्पग्रस्तांच्या बैठकी संदर्भातील अधिक माहिती इथे: 

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

MTHL साठी प्रकल्पग्रस्तांची MMRDA सोबत बैठक










शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूसाठी प्रकल्पग्रस्त होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा संदर्भात दिनांक २ जुलै, २०१२ रोजी प्रकल्पग्रस्त जनतेचे आधारस्तंभ लोकनेते मा.श्री.दि.बा.पाटील साहेब यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना अ. रा. वानखेडे, उप महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(Mumbai Metropolitian Region Development Authority) यांनी दिनांक ८ ऑगस्ट, २०१२ रोजी खालील पत्र पाठविलेले आहे.

तसेच मा.श्री. दि. बा. पाटील साहेबांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी दिनांक १४ ऑगस्ट, २०१२ रोजी MMRDA ची शेतकऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतून कोणता मार्ग निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आपलाच,
आमोद पाटील.

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

रत्नेश्वरी देवी, जसखार (Ratneshwari Devi Jaskhar, Uran)










जसखार येथील रत्नेश्वरी देवी (Ratneshwari Devi Jaskhar, Uran)

उरण तालुक्यातील जसखार गावातील श्री रत्नेश्वरी आई. नवसाला पावणारी देवी म्हणून रत्नेश्वरी आईची संपूर्ण रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ख्याती आहे. एक जागृत देवस्थान म्हणून हजारो भक्त दरवर्षी रत्नेश्वरी देवीच्या चरणी माथा टेकवतात. आईचं नवीन भलं मोठ मंदिर देखील भाविक भक्तांना एक भक्तिमय अनुभव देऊन जाते. आपण देखील देवीच्या दर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. ब्लॉगमध्ये रत्नेश्वरी देवीच्या काही प्रसन्न भावमुद्रा दिलेल्या आहेत.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी  बाणा.

मंगळवार, १० जुलै, २०१२

माझे गावांन बिल्डर आयलाय! (Majhe Gavan Builder Aaylay)




माझे गावांन बिल्डर आयलाय!

खाडींचा शेत माझा जाम भारी व्हता!
भाताचा कणगा न् खला भी व्हता!
पण आता बदल जाम झायलाय!
माझे शेताचा सौदा झायलाय!
आता फुकटचा पैसा आयलाय!
माझे गावांन बिल्डर आयलाय!

गायक जगदीश पाटील यांनी त्यांच्या बोलीभाषेतील गाण्यातून ठाणे-रायगड जिल्ह्यातील लाखो भूमिपुत्रांची जणू काही कहाणीच मांडली आहे. वाढती लोकसंख्या, त्यातून निर्माण होणारे आणि शहराला सूज आली आहे असे भासणारे अनिर्बंध नागरिकीकरण, औद्योगिकीकरणामुळे शेतीमध्ये झालेले रासायनिक सांडपाण्याचे प्रदूषण... कारणे काहीही असोत, बहुतांश शेती नष्ट होऊन गेल्या तीन दशकांमध्ये प्रथम चाळसंस्कृती आणि आता इमारतींचे इमले डोंबिवली-कल्याण परिसरात देखील उभे राहिले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
या परिसरात २७ गावे आणि २६ ग्रामपंचायती येतात. १९६५ ते १९६८ च्या सुमारास भोपर, देसलेपाडा, सागांव, सांगर्ली, सोनारपाडा, मानपाडा, आजदे, खंबालपाडा व आजूबाजूच्या परिसरांत विविध कारखाने येण्यास सुरुवात झाली. यामध्ये टेक्स्टाईल्स, केमिकल व फार्मास्युटिकल कारखान्यांचाच भरणा होता. या औद्योगिक पटट्य़ामुळे मोठय़ा प्रमाणावर नागरिकीकरण सुरू झाले. रासायनिक सांडपाण्याने शेतीबरोबरच येथील खाडीचा पट्टा प्रदूषित केला.

सागांव येथील जुने रहिवासी प्रकाश म्हात्रे सांगतात की कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचा पाडा, कुंभारखाण पाडा, चोळागाव, ठाकुर्ली, खंबाळपाडा, सोनारपाडा, पाथर्ली, आयरेगाव ही ३५-४0 वर्षांपूर्वीची डोंबिवली शहराच्या वेशीवर असणारी गावे. एकेकाळी तिथे मोठय़ा प्रमाणावर भातशेती व्हायची. ती आता नष्ट झाली आहे. औद्योगिक पटट्य़ामुळे येथे कामगारवर्ग मोठय़ा प्रमाणावर आला. नागरीकरणाच्या या बदलाचे स्वागत येथील भूमिपुत्रांनी आपल्या शेतजमिनींवर चाळींचे साम्राज्य बांधून केले. बहुतांश भूमिपुत्र वर्षातून दोन पिके घेत असत. ही दोन पिके घेतल्यानंतर पुढील वर्षाचे पीक घेण्यासाठी जमीन रणरणत्या उन्हात तापणे आवश्यक असते. प्रत्येक भरतीच्या वेळी खाडीचे पाणी शेतात शिरायचे व खाडीतल्या रासायनिक सांडपाण्यामुळे जमीन नष्ट व्हायला सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम पिकावर व्हायला लागला.
१९८0 पासून शेती कमी व्हायला लागली. नवीन पिढीतील तरुणांचा ओढा शिक्षणाकडे लागल्यानंतर अंगमेहनतीने स्वत:च्या घरच्या शेतीत राबणारे हातही कमी झाले आणि शेतात काम करणारे मजूरदेखील परवडेनासे झाले, असे म्हात्रे सांगतात.

शेतीबरोबरच मासेमारीचाही व्यवसाय होता. दिवा, दातिवली, आगासन, भोपर, कोपर, आयरे, नांदिवली या खाडीलगतच्या गावांत मासेमारीचा मोठा व्यवसाय होता. खाडीतल्या रासायनिक प्रदूषणाने मासेमारीदेखील बंद पडली.
■ कल्याणातील गांधारी, खडकपाडा, वायलेनगर, गोदरेज हिल, बारावे या हिरव्यागार परिसरात भव्य कॉम्प्लेक्समुळे दुसरे कल्याण उभे राहत आहे.
■ कल्याण ग्रामीण परिसरात उंबर्डे, सापर्डे, कोळवली या परिसरात काही प्रमाणात शेती केली जाते.
■ सध्या बी पेरणी सुरू झाली असून, त्यानंतर नांगरणीची कामे सुरू होणार आहेत.
■ गांधारी येथे राहणार्‍या सुरेश भंडारी या कुटुंबीयांची यंदाची शेवटची शेती आहे. त्यांची जमीन बिल्डरला विकण्यात आली आहे. सध्या बिल्डरने काम सुरू केले नसल्याने शेवटची शेती लावली जात असल्याचे भंडारी यांनी सांगितले. प्रदूषित झालेल्या जमिनीत शेती तर होत नाहीच, पण दोन पिके जिथे निघायची, तिथे एक पीक मुश्किलीने काढायचे. त्यासाठी लागणारा शेतीत काम करणारा मजूर महागात घेऊन यायचा. त्यापेक्षा चांगला आणि बक्कळ पैसा कमवून देणारा त्याच जोडीला आजूबाजूच्या परिसरात मान मिळवून देणारा रिअल इस्टेटचा धंदा नव्या पिढीला मिळाला. वाडवडिलांपासून मालकीची असलेली जमीन व त्यावर चढणारे इमारतींचे इमले म्हणजे या नव्या पिढीची स्वप्न पूर्ण करणारी दैवी देणगीच होती. १९८५ नंतर तर मुलुंड, घाटकोपर भागांतील बिल्डरने या भूमिपुत्रांवर आपले जाळे फेकायला सुरुवात केली. अनेक जण मग या बिल्डरबरोबर भागीदार झाले, तर काहींनी स्वत:च बिल्डर होऊन इमारती बांधायला सुरुवात केली. रेती, वाळू व विटांचा पुरवठा असा जोडधंदा पण मग अनेकांनी सुरू केला.

सौजन्य:(लोकमत-हेल्लो ठाणे आवृत्ती)

रविवार, १ जुलै, २०१२

आगरी कविता-ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला? (AGRI BHASHA)




याच्या आयला ना त्याच्या आयला
याचे बना ना त्याचे बना
असा करीतच आमचा जलम जेला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?
याला खेच ना त्याला खेच
याश्या भांड ना त्याश्या भांड
भांडनानच आमचा जलम जेला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

वार लागल ना जमिनी इकल्या
बंगला बांधला ना गाऱ्या झेतल्या
येनच सगला पैसा खपोला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

मी नाय सुधरलो तरी चालल
पुन त्याला भी सुधरुन देनार नाय
आम्हाला वाटल तसा करु
आम्ही कोनला भित नाय
सुधारण्याचा कवा इचारच नाय केला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

पोरा आमचा आयकत नाय
पोरांव लक्ष देवाला टाइमच नाय
धंदा एके धंदा केला
पोरांनी मांगला त्या दिला
तरी पोऱ्या साफ बिगरला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

त्याला मिलल तशी दारु पिली
बाहेर गावान भि गावाची इज्जत घालोवली
दारुपाई आख्खे संसाराची वाट लावली
तरी काय सोरी नाय दारुला
ना बोलतान आमचा गाव कला नय सुधारला?

चला ये सगल्याचा इचार करु
थोरा तरी चांगला करु
भोग सोरु ना योग धरु
एकी करु नेकी करु
मंग छाती पुर करुन सांगु
आमचा गाव खरा सुधारला…….!

आगरी कवी-संदीप तांडेल [अलिमघर]

शुक्रवार, १५ जून, २०१२

आगरी समाजाचे आधारवड-कॉ.जी.एल.पाटील(G. L. PATIL - AGRI SAMAJ)

आगरी समाजाचे आधारवड-कॉ.जी.एल.पाटील

"अखिल आगरी समाजाचे संस्थापक सदस्य कॉ. जी. एल. पाटील यांचा २५ वा स्मृतिदिन रविवार दिनांक १० जुन, २०१२ रोजी उरण येथे साजरा केला गेला. जी. एल. पाटील हे आगरी समाजाचे एक धुरंदर नेते होते. समाजाच्या विकासासाठी तसेच कष्टकरी उन्नतीसाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. मुंबई महानगरपालिकेचे १५ वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगरी परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. समाजाच्या न्याय हक्कांसाठी विविध आंदोलने करून आगरी समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला. अशा या थोर नेत्याच्या राजकीय, सामाजिक कार्याचा आढावा घेणारा हा लेख."

आगरी समाजातील अनेकांनी स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करले आहे. १९३० सालात चिरनेरचा जंगल सत्याग्रह याच समाजातील शूर लढवय्यांनी लढवला. त्यात सात जणांनी प्राणाहुती दिली. असा हा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांशी झुंज देणारा लढवय्या समाज.

पूर्वी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात हा समाज तसा फार मागासलेला. शिवाय व्यवसाय शेती व मीठ पिकवण्याचा असला तरी शेती व मिठागरे त्यांच्या मालकीची अगदी नगण्यच असत. बहुतांश लोक दुसऱ्यांच्या शेतात वा मिठागरात श्रम करीत व आपल्या कुटुंबाचा कसातरी उदरनिर्वाह चालवीत. अशा समाजातून जी.एल.पाटील पहिले पदवीधर झाले. त्यांनी या सर्व मागासलेपणाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना जाणवले की, शिक्षणाच्या अभावाने आपल्या समाजाची प्रगतीच खुंटली आहे. त्यांच्यात जागृती करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार कारणे जरुरीचे आहे. जी.एल. नी याबाबत आपल्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. व श्री. भाऊराव मुकुंदराव पाटील, श्री. गणपत पाटील (वाघ्रण) व स्वतः असा तिघाजणांच्या नावे जाहीर पत्रक काढून २ सप्टेंबर, १९३४ रोजी आगरी-आगळे शिक्षण फंडाची स्थापना केली. साथीला सीताराम केणी, भाऊराव गोपीनाथ पाटील होते. या संस्थेसाठी प्रसंगी अपमान सहन करूनही त्यांनी फार मोठा निधी गोळा केला. त्यांच्या धर्मपत्नी बायजी यांनीही त्यांना या कामात योग्य साथ दिली. आज आगरी शिक्षण संस्था या नावाने ही संस्था नावारूपाला आली असून पनवेल येथील खांदा कॉलनीत स्वतःच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंत १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय या संस्थेतर्फे शेकडो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पारितोषिके देण्यात येतात.

१९३५ सालातील दसऱ्याच्या मुहूर्तावर वरळीच्या लादीवाला चालीत 'आगरी सेवा संघा'ची स्थापना झाली. या संघाचे पहिले अध्यक्ष म्हणून कै.जयराम बजाजी टेमकर व उपाध्यक्ष म्हणून कै. तुकाराम बेटू पाटील यांची निवड झाली. व जी.एल. हे स्वतः जनरल सेक्रेटरी झाले.

याच दरम्यान मुंबईत कॉ.डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरणीकामगारांचे लढे जोरदार सुरु होते. जी.एल. ही या संपलढ्यात सदैव सहभागी असत. सेंच्युरी, standard आदी गिरण्या वरळी-प्रभादेवी भागात असल्याने संपकाळात इतर कार्यकर्त्यांबरोबर जी.एल. ही सेंच्युरी मिलच्या उघडया मैदानात झोपत व पहाटे मिलच्या गेटवर मिटींग घेऊन कामगारांना लढ्यात सहभागी करून घेत. आगरी सेवा संघाची स्थापना केल्यानंतर जी.एल. नी तुकाराम कमल पाटील, पांडुरंग दामोदर सोनावले, प्रभाकर मोरेश्वर ठाकूर, हिराजी काळू ठाकूर, सीताराम राघोबा पाटील, मारुती दामोदर पाटील, हिराजी कर्वे, गणू चवरकर, गोविंदा जोमा पाटील आदी सहकाऱ्यांसह वादी-प्रभादेवी, वरळी येथील आगरी वस्तीत सभा बैठकी घेऊन संघाच्या कार्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले.

आगरी सेवा संघामार्फत जी.एल.नी या भागात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. मोफत वाचनालय, लोकमान्य व्यायामशाळा ही त्याची उदाहरणे होत.अर्थात कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवण्यासाठी काही उत्सवप्रियही कार्यक्रम आखावे लागतात. या अनुषंगाने दसरा संमेलन, श्रीकृष्ण जन्मोत्सव सेवा संघाने सुरु केले.

मुंबईत जी.एल. चे असे उल्लेखनीय समाजकार्य सुरु असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांची व मिठागर कामगारांची स्थिती फार हलाखीची होती. विशेषतः उरण भागातील मिठागरे ही मुसलमानांची वा गुजराती लोकांच्या मालकीची होती व मिठागरात रोजंदारी करणारा आगरी मजूर हा जणू मालकाचा गुलाम बाणाला होता. वेठबिगारी पद्धत जबरदस्त होती. तीच स्थिती शेती पिकवणाऱ्यांचीही होती. मजुरांना दहशत बसविण्यासाठी त्या वेळी सार्वजनिक शिक्षा करण्यात येत असे. गाढवावरून धिंड काढली जाई. जुलूम-जबरदस्ती होई. यामुळे गावागावांत असंतोष पसरला होता. शेवटी १९३९ साली या असंतोषाचा स्फोट भेंडखळ(ता.उरण) गावी झाला.

ना. ना. पाटील यांनी हा निर्णय सावकारांना कळवला, पण सावकारांनी ही मागणी फेटाळली. तेव्हा शेतकऱ्यांनीही सावकारांची कसायचे नाकारले व संप पुकारला. तत्पूर्वी ना. ना. पाटील यांच्या नेतृत्वाखालील चरीचा संप संबंध महाराष्ट्रात गाजला होता. आता भेंडखळचा शेतकरी सावकारशाहीविरुद्ध लढ्यास सिद्ध झाला.

मुंबईत आगरी सेवा संघाच्या कार्याला बहर आला होता. याचं दरम्यान वरळी-प्रभादेवी भागात कॉ.जी.एल.पाटील यांच्या पुढाकाराने बॉम्बे एज्युकेशन लीग या संस्थेचे मराठा मंदिर वरळी हायस्कूल सुरु करण्यात आले. या संस्थेचे श्री.पी.के.सावंत हे प्रिन्सिपॉल होते तर जी.एल. काही काळ या संस्थेत शिक्षक म्हणून होते. या हायस्कूलमध्ये या विभागातील विद्यार्थ्यांची खुपच सोय झाली. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशा प्रकारची घोडदौड दुरु असताना १९५८च्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने जबरदस्त धक्का बसला. या निर्णयाने पूर्वीचा मध्यमवर्ग (इंटरमिजीएट क्लास) रद्द करण्यात आला. ज्या मध्यमवर्गात मराठी व तत्सम १६२ समाजांचा समावेश होतो, तो ओ.बी.सी. चा वर्ग रद्द केला गेला. अर्थातच ज्या समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती खुंटली होती, अशा समाजाला पुढारलेल्या समाजात समाविष्ट केल्याने त्यांच्यावर घोर अन्याय झाला होता. आगरी समाज हा त्यापैकीच एक होता.

१९५९ साली अखिल आगरी-आगळे ज्ञाती परिषदेची स्थापना करण्यात आली. गाव, तालुका, जिल्हा स्थरावरील आगरी समाजातील ही मध्यवर्ती संघटना होती. नव्हे ती या समाजाची अस्मिता जपण्यासाठी उभारलेली चळवळ होती. जी.एल. चा या परिषदेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता. या परिषदेच्या वतीने २३ व २४ मे, १९५९ रोजी उरणला पहिले अधिवेशन घेण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान कॉ.जी.एल.पाटील यांनी भूषविले होते. तर उदघाटक म्हणून त्या काळचे थोर शिक्षणतज्ज्ञ आचार्य मो.वा. ऊर्फ दादासाहेब दोंदे व स्वागताध्यक्षम्हणून लढाऊ समाज नेते श्री.तु.ह.वाजेकर हे होते. शेतकऱ्यांचे लाडके नेते कै.नारायण नागू पाटील या अधिवेशनास आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते. त्यामुळे हे पहिले अधिवेशन बरचं खऱ्याअर्थाने परिपूर्ण झालं होत.

उरणच्या पहिल्या अधिवेशनात कालेलकर कमिशनने दिलेल्या अहवालानुसार आगरी समाजाला सर्व प्रकारच्या सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, हा प्रमुख ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दुसऱ्या एका ठरावान्वये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलन लढ्याचा ठराव संमत करण्यात आला.

१९६० साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला व मुख्यमंत्रीपदी श्री. यशवंतराव चव्हाण आरूढ झाले. परिषदेतर्फे त्यांना मागण्यांचा जाहीरनामा सादर करण्यात आला. परिषदेच्या चळवळीने समाजातील जागृती वाढतच होती. याचं सुमारास कल्याण-शहापूर भागातून काँग्रेसचे श्री. सोनुभाऊ बसवंत खासदार म्हणून व उरण-पनवेलमधून श्री. दि. बा. पाटील, अलिबागेतून श्री. दत्ता पाटील, पेणमधून श्री. बाळासाहेब म्हात्रे व ठाण्यातून सौ.चंपूताई मोकल हे आगरी समाजातील आमदार निवडून आले होते. अखिल समाज परिषदेनेही समाजमनावरील पकड चांगली घट्ट केली होती.

इकडे सोनुभाऊ बसवंत यांनी ७५ खासदार जमवून या विषयावर संसदेत चर्चा घडवून आणली. शिवाय खासदार बसवंत यांनी अखिल आगरी समाज परिषदेचे सरचिटणीस गणेश पाटील व नाशिकचे खासदार जाधव यांच्या साने संसदेत एक पिटीशन सादर केले. त्यामुळे सरकारला या विषयावर आपली भूमिका स्पष्ट कारणे भाग पडले. या सर्व चळवळीने १३ ऑक्टोबर १९६७ रोजी ओ.बी.सी.ची यादी सरकारला प्रसिद्ध करण्यास भाग पाडले. त्यात आगरी समाजाचा समावेश केला. शिवाय १० टक्के राखीव जागा मिळून पाच वर्षांची आत शिथिल करण्यात आली. हा एकापरीने परिषदेने उभारलेल्या आंदोलनाचा विजय होता.

२ व ३ मे, १९७० रोजी अखिल आगरी समाज परिषदेचे तिसरे अधिवेशन धामोते येथे झाले. सर्व समाजाला संघटीत करण्याची भावना सर्वांच्याच मनात होती. त्यामुळे या अधिवेशनात १८८ इतर मागास समाजातील २ कोटी कष्टकऱ्यांना संघटीत करून 'महाराष्ट्र राज्य इतर मागास फेडरेशन' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेडरेशनतर्फे पुढे ओ.बी.सी.च्या मागण्यांसाठी अनेक लढे लढवले. सप्टेंबर १९७१ रोजी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब वरळीकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. कॉ.जी.एल.पाटील त्या शिष्टमंडळात प्रामुख्याने होते, तर १२ सप्टेंबर १९७१ रोजी सचिवालयावर ओ.बी.सी.संघटनेतर्फे एक प्रचंड मोर्चा नेण्यात आला व आपल्या एकजुटीचे विराट दर्शन शासनास घडवले. जी.एल. या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय फेडरेशनचे उपाध्यक्ष होते. पुढे त्यांना संघटनेचे अध्यक्षपदही लाभले.

ओ.बी.सी.च्या चळवळीने मोफत शिक्षणाबरोबरच शासकीय नोकऱ्यांत व बढतीत ३५ टक्के जागा, शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्थात २५ टक्के राखीव जागा, हाउसिंग बोर्डाच्या गाळेवाटपात १० टक्के जागा, इतर मागास समाजासाठी खास महामंडळाची स्थापना इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांकडे जनतेचे लक्ष प्रकर्षाने वेधले गेले व या या मागास समाजाच्या सवलतींचा सहानभूतीने विचार सुरु झाला.

या मंडल आयोगाने भारतभर दौरा करून विविध जातीजमातींची आर्थिक, सामाजिक परिस्थिती प्रत्यक्ष पहिली. हा आयोग मुंबईत आला तेव्हा २२ जुलै १९८० रोजी परिषदेतर्फे त्यांच्यासमोर कैफियत सादर केली गेली. पण केंद्राने या मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नही. तेव्हा मागासवर्गीयांत असंतोष पसरला. या आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आंदोलन कारणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार फेडरेशनने पुढे वेळोवेळी आंदोलनही उभारले.

मृदू भाष्य व कार्यकर्त्यांत आपलेपणा निर्माण करणे या त्यांच्या वृत्तीने ते खऱ्या अर्थाने समाजमहर्षी या पदावर पोहोचले. जी.एल आगरी समाजाचे व बहुजन समाजाचे काम अत्यंत निष्ठेने व कळवळीने करत राहिले. म्हणूनच १९८६ साली आगरी सेवा संघाचा सुवर्ण महोत्सव त्यांच्याच अध्यक्षतेखाली साजरा झाला तेव्हा त्यांनाही अत्यानंद झाला होता. अशा अनेक संस्थाना जी.एल.नी जन्म दिला व त्या वटवृक्षासारख्या वाढवल्या. पण त्यांच्या छायेत स्वतः कधी वावरले नाहीत. उलट सर्व मागास समाजाला त्याचा लाभ मिळवून दिला. या सर्व सामाजिक कार्यासाठी कौटुंबिक अडचणीही त्यांनी कधी पाहिल्या नाहीत वा वैयक्तिक मान-अपमानाचाही विचार केला नाही. म्हणूनच फक्त आगरी समाजच नव्हे तर सारा मागासवर्गीय समाज कॉ. जी.एल.पाटील यांचे मोल कधीही विसरू शकत नाही.


जाता जाता एकच.........जेवढा जो समाज मागासलेला व दुर्बल आहे, तेवढ्या प्रमाणात त्यास प्रगतांनी संरक्षण व सवलती देऊन पुढे आणण्यास मदत व हातभार लावला पाहिजे. तरच तो समाज कालांतराने पुढारलेल्या समाजाबरोबर वाटचाल करू शकेल........

गुरुवार, ३१ मे, २०१२

आगरी समाजाचा इतिहास आणि मीठ!(History Of Agri Samaj-Indian Salt Maker)


आगरी समाजाचा इतिहास आणि मीठ!(History Of Agri Samaj-Indian Salt Maker)

मीठ हा आज सर्वांना अतिपरिचयामुळे अत्यंत सामान्य वाटणारा पदार्थ...पण मीठाखेरीज माणुस जगू शकत नाही...त्यामुळेच मीठाचा शोध हा मानवी संस्क्रुतीतील सर्वात महत्वाचा क्रांतीकारी टप्पा मानला जातो. मनुष्य लाखो वर्षांपुर्वी जेंव्हा शिकारी मानव होता त्या काळात शरीरातील मीठाची गरज भागवण्यासाठी तो शिकार केलेल्या प्राण्याचे प्रथम रक्त पिवून शरीरातील मीठाची गरज भागवत असे अथवा लवणयुक्त माती खात असे. पुढे उपलब्ध असेल तेथील खनीज मीठ (सैंधव) वापरात आणले गेले. अशा मीठाच्या नैसर्गिक खाणी मुळात कमी असल्याने अर्थात ते प्रचंड महाग असे. एके काळी सोन्यापेक्षाही अधिक किंमत मीठाला मिळत असे. मीठामुळे जगात अनेक युद्धे झालेली आहेत. साम्राज्ये बनली आहेत गडगडली आहेत. जगातील सर्वात प्राचीन व्यापार हा मीठाचा होता. मीठ उपलब्ध असलेल्या प्रदेशांवर स्वामित्व स्थापित करण्यासाठी घनघोर युद्धे होत असत. आपल्याला आता सिल्क रुट्स माहित आहेत, पण जगातील व्यापारी मार्ग प्रचीन काळी साल्ट रुट्स (मीठमार्ग) म्हणुन ओळखले जात. रोममद्धे तर सैनिकांना पगार मीठाच्या रुपातच दिला जात असे, त्यामुळेच आजचा स्यलरी (salary) हा शब्दही मुळच्या salt पासुन तयार झाला आहे. मीठाने खाद्य संस्क्रुतीत क्रांती तर घडवलीच पण मानवी आरोग्यही सुद्रुढ व्हायला मोलाची मदत झाली. ज्याचे मीठ खाल्ले आहे त्याच्याशी बेईमानी करणे हा नैतीक गुन्हा मानला जावू लागला, एवढे मीठाचे सांस्क्रुतीक महत्व वाढले. धर्मकार्यातही मीठ हा महत्वाचा घटक बनला. इतकेच नव्हे तर भुता-खेतांना, अभद्र प्रकारांना टाळण्यासाठीच्या तांत्रिक विधींमद्धेही मीठाला महत्वाचे स्थान मिळाले. मीठामुळे मांस-मासे ते नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी मोलाची मदत झली. म्रुतांचे ममीफिकेशन करत प्रदिर्घकाळ शरीररुपाने टिकवण्यासाठीही मीठाचा उपयोग झाला. एका अर्थाने मानवी संस्क्रुती ही मीठाच्या शोधामुळे आमुलाग्र बदलली असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

मीठ हा नेहमीच जागतीक राजकीय इतिहास व्यापुन राहिला आहे. इंग्रज सरकारला हादरवून सोडनारा भारतातील महात्मा गांधींचा मीठाचा सत्याग्रह कोण विसरेल? मीठावर कर बसवला म्हणुनच! मीठ हे मानवी संस्क्रुतीच्या अत्यंत प्राथमिक काळात कर बसवले गेलेले एकमेव उत्पादन आहे. मीठांच्या खानींवर व मीठागरांवर देखरेख करायला "लवणाध्यक्षा" ची नेमनुक कशी करावी याबाबत कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही निर्देष आहेत. चीनमद्धे इसपुच्या तिस-या सहस्त्रकातील मीठावरील व्यापार, कर, मीठाचे प्रकार याबाबत सर्वात प्राचीन लेख मिळतो. याचे कारण म्हणजे मीठ हे त्या काळात गरजेपेक्षा कमी उपलब्ध होते आणि ज्याचे मीठावर स्वामित्व त्याचे साम्राज्य अशी परिस्थिती होती.

भारतात फार पुर्वी हिमालयाच्या भागात नैसर्गिक खानींतुन मिळनारे मीठ तेवढे माहित होते. पुढे समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवायचा शोध इसपुच्या ५००० वर्षापुर्वी लागला असे गुजरातेतील ढोलवीरा येथे झालेल्या उत्खननातुन दिसते. समुद्राच्या (सिंधु) पाण्यापासुन निर्माण केले गेले ते सैंधव असे असंख्य उल्लेख आपल्याला आपल्या पुरातन साहित्यांतुन आढळतात. अर्थात समुद्राच्या पाण्यापासुन मीठ बनवण्याचा शोध मत्स्यमारी करणा-या लोकांनीच लावला. जमीनीवर आलेले समुद्राचे खारे पाणी वाळले कि मीठाची स्फटिके मिळतात आणि ते खाद्यसंस्क्रुतीत उपयुक्त ठरते हे निरिक्षण कामी आले आणि मीठाचीच शेती करण्याची पद्धत शोधली गेली.

भारतात मीठाचा अमोलिक, सर्व मानवी जीवनाला आवश्यक आणि उपकारक असा शोध कोलीय समाजाने लावला. सर्वप्रथम हा शोध लागला तो कच्छ प्रांतात, मग हळु हळु जेथे जेथे अनुकुल किनारे व वातावरण होते तेथे हा मीठशेतीचा उद्योग विस्तारत गेला. कोळी समाजातील जी कुटुंबे मीठशेतीकडे वळाली त्यातुनच आगरी समाजाचा उदय झाला. आगर या प्राक्रुत शब्दाचा सरळ अर्थ आहे बाग वा शेत. नारळी-पोफळींच्या बागांबरोबरच जेथे मीठ "पिकवले" जात होते त्याला अर्थातच मीठाची बाग... मीठागर म्हटले जाणे स्वाभाविक होते. या आगर शब्दातुनच "आगरी" या शब्दाचा उगम झाला असल्याचे स्पष्ट दिसते. याचाच दुसरा अर्थ असा कि कोळी व आगरी हे मुळचे एकच! कोळी व आगरींचे मुळचे ऐक्य सांगणारी एक पुराणकथाही येते. अगस्ती मुनीच्या आंगले आणि मांगले या दोन पुत्रांपासुन क्रमश: आगरी आणि कोळी समाज निर्माण झाले अशी ही कथा सांगते. त्यातील पुराणकारांचा मित्थकथा बनवण्याचा हव्यास सोडला तरी हे दोन समाज आधी एकाकार होते हे पुराणकारालाही माहित होते हे स्पष्ट होते अणि ते खरेही आहे.

कोळी समाज देशभर आढळतो. या समाजाचेही मुळ रुप काय हेही येथे पाहणे आवश्यक आहे. या समाजाचे मुळ हे "कोलीय" या भारतातील अतिप्राचीन अशा मानवगणाकडे जाते. भारतात प्राचीन कालापासुन अनेक मानव गण वावरत होते, त्यापैकी हा एक. हा पुरातन मानवी घटक देशभर विखुरलेला होता, भारतात कोलीय (कोलीयक) नांवाची अनेक गांवे नेपाळ, राजस्थान, झारखंड, ओरीसा ते केरळ-तमिळनाडुपर्यंत आढळतात व ती त्यांच्या देशव्यापी अस्तित्वाची कल्पना देतात. कोलीय हे फक्त मत्स्यमार नसुन ते वीणकर ते क्रुषिकार्यही करणारे होते. त्यातील समुद्रकिनारी वसलेल्यांनी सागरी मत्सोद्योगही होवू शकतो याचा अंदाज घेत पहिल्या नौका बांधल्या व सागरी मासेमारी सुरु केली. जाळ्यांचा शोध त्यांना उपयुक्त ठरला कारण ते कुशल वीणकरही होते. हे शोध त्यांच्या अन्नाच्या, भरणपोषणाच्या निकडीमुळेच लागले. पुढे काही शतकांतच प्रत्यक्षानुभवामुळे समुद्राच्या खारट पाण्यापासुन मीठाचे उत्पदन होवू शकते हा शोध लागला. या शोधांतुन नव्य अन्नोद्योग तर सुरु झालाच, पण त्यांच्याच नौकाशास्त्रातुन पुढे विदेश व्यापार सुरु झाला. अर्थात प्राथमिक निर्यात होणारे उत्पादन होते ते म्हनजे मीठ व खारवले गेलेले मांसान्न. पुढे त्यातुन बलाढ्य अशी भारतीय आरमारे सुद्धा उभी राहिली. मुळात हा समाज दर्यावर्दी असल्याने नौकानयनाच्या शोधाचे श्रेयही याच समाजाला द्यावे लागते. नौकानयनामुळे नुसते मीठच नव्हे तर अन्यही उत्पादने निर्यात होवू शकत होती. भारतात दहाव्या शतकापर्यंत जी सम्रुद्धी दिसते त्याचे मुलकारण या नौकानयनात साधल्या गेलेल्या प्रगतीत आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

सह्याद्रीच्या कड्यांतुन जे घाट निर्माण केले गेले ते पुरातन मीठमार्गच होते. वंजारी समाज या मार्गांनी मुख्यत्वाने मीठच जनावरांवर लादुन घाटावरील मीठाचे दुर्भिक्ष असणा-या प्रदेशात भटकत रहात मीठ पुरवत असत. या समाजाचाचेही भारतीय संस्क्रुतीला महान योगदान आहे.

सिंधु संस्क्रुतीपासुनच (इसपु ४२००) भारताचा जागतीक व्यापार सुरु झाला होता. लोथल या क्रुत्रीम बंदराची सिंधुकाळातील पुरातन निर्मिती हा कोलीय समाजाने निर्माण केलेला आश्चर्याचा अद्भुत असा नमुना आहे. कोकणातली चेउल सारखी अनेक प्राचीन बंदरे (इसपु २२३) आजही या समाजाच्या सागरव्यापाराची आणि विजिगिषु व्रुत्तीची साक्ष देतात. इजिप्त, सुमेर, अरबस्तान व अन्य युरोपीय देशांशी त्यांचा व्यापार होत होता. मीठ हे अर्थातच महत्वाचे उत्पादन होते व त्याच बरोबर अन्य भारतीय वस्तुही आपसुक निर्यात होवू शकल्या. यामागे कोळी-आग-यांची अपार कल्पकता होती. साहस होते. भारतातुन सोण्याचा धुर निघत होता असे आपण मानतो, जे सत्यही आहे, पण जर मुळात हे शोध लावलेच गेले नसते तर?

कोकणातील आरंभीच्या सत्ता याच समाजाच्या होत्या. कुडा-मांदाड येथील लेण्यातील शीलालेखात तत्कालीन स्थानिक सत्ताधा-यांचा उल्लेख येतो. ते आगरी कोळीच आहेत. इसवीच्या सहाव्या शतकात तर आगरी-कोळी आणि महार (महारक्ख) यांची कोकणावर संयुक्त सत्ता होती. (संदर्भ: बोंबे प्रेसिडेन्सी ग्यझेट-कोलाबा जिल्हा आणि एच. डी. सांकलिया) किंबहुना नंतरच्याही सत्ता यांच्या मदतीखेरीज या भुभागावर राज्यच करु शकल्या नाहीत असेच इतिहास सांगतो.

सातवाहन काळापासुन (इसपु २२०) महाराष्ट्राचे लष्करी आरमारही बलाढ्य बनल्याचे दिसते. यात खरा हातभार कोळी-आगरी लोकांचाच होता. हे आरमार एवढे बलाढ्य होते कि सातवाहनांनी आगरी-कोळी बांधवांच्या मदतीने श्रीलंकेचाही पराभव करत तेथवर सत्ता पोहोचवली. एवढेच नव्हे तर सातवाहनकालीन व आजच्या मराठीचे मुळ असलेल्या माहाराष्ट्री प्राक्रुताच्या मुळ रुपाला आगरी बांधवांनी आपल्या आगरी भाषेत कटाक्षाने जपलेले दिसते.

वैदिकांनी जरी पुढे सिंधुबंदी नामक अत्यंत अनिष्ट प्रकरण पुढे आणले असले तरी नौकानयन या समाजाने सुरुच ठेवलेले दिसते. त्याचाच उपयोग सोळाव्या शतकात छ. शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार उभारायला झाला. याचा दुसरा अर्थ असा कि हा समाज वैदिक संस्क्रुतीच्या प्रभावात कधीच आला नाही. त्यांनी समुद्रबंदीचा फतवा मान्य केला नाही. पुढे सरखेल कान्होजी आंग-यांच्या रुपाने इतिहासाला एक महानायक मिळाला. आगरी-कोळी समाजाचे आरमारी युद्धतंत्र त्यांच्या काळात कळसाला पोहोचले. समुद्राचीच संगत पुरातन कालापासुन असल्याने सागरी किल्ल्यांची संकल्पनाही याच समाजाने खुप आधी विकसीत केली होतीच. हे आधीचे सागरी किल्ले बनवले गेले ते सागरी चाच्यांना तोंड देण्यासाठी व व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यांचा उपयोग स्वराज्याला केवढा झाला हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. आजच्या सर्वच सागरी किल्ल्यांच्या निर्मितीचे खरे श्रेय आगरी-कोळी समाजालाच द्यावे लागते ते यामुळेच. पण पुढे नानासाहेब पेशव्याने आंग्र्यांचे आरमार बुडवण्याची घोडचुक केली आणि इंग्रज-पोर्तुगीजांना मोकळे रान मिळाले हा दुर्दैवी इतिहासही येथे विसरता येत नाही.

कोळी हे कोलीय या गणाचे लोक. हे कोलीय कोण होते, याचाही विचार येथे करायला हवा. कोलीय वंश जरी भगवान बुद्धांमुळे आज माहित असला तरी त्या वंशगटाचा उगम हा सिंधुपुर्व संस्क्रुतीतच आढळतो. व्यास-वाल्मिकी हे आद्य महाकवी याच कोलीय समाजाने दिले हेही येथे आवर्जुन नमुद करुन ठेवतो. सिंधुकालीन नौका (ज्या तशाच प्रकारे आजही सिंध प्रांतात बनतात) बनवण्याची रीत या कोलीय लोकांनीच शोधली. कोलीय वंश हा मुळचा शैव मात्रुसत्ताक पद्धती पाळनारा समाज होय. त्यांची स्वतंत्र गणराज्ये होती व ती त्यांच्या वंशाच्या नांवानेच ओळखली जात असत. मुळचे कोलीयच असल्याने व विशिष्ट भागांतच एकवटल्याने पुरातन मात्रुसत्ताक पद्धतीचे अंश आजही आगरी समाजाने जतन केले आहेत. अन्य समाजगटांपेक्षा वैदिक संस्क्रुतीचा पगडा दूर ठेवण्यात त्यांना यश आले ते त्यामुळेच! त्यांच्या देवता प्रामुख्याने मात्रुदेवताच असून (उदा. एकवीरा, जोगेश्वरी, मंबाई, गोराई, इ.) त्यांच्यात हुंडा देणे-घेणे पुर्णतया अमान्य आहे. एवढेच नव्हे तर समाजाची पंचायत ही फक्त देवीमंदिरासमोरच भरते. घरातील आर्थिक व्यवहार हे आजही सर्वस्वी स्त्रीयांच्याच हाती असतात. गणसत्ताक पद्धतीचेही त्यांनी अगदी अलीकडच्या काळापर्यंत जपलेले वैशिष्ट्य असे कि आगरी खेड्यांत आगरी सोडुन अन्य माणुस औषधालाही सापडत नसे. आगरी पंचायतच सामाजिक निर्णय एकत्रीतपणे घेत असे. बाह्य सत्तांना त्यात जवळपास प्रवेशच नव्हता.

कोलीय लोक हे "कोल" या मानवीवंशगटचे आहेत असे मानववंशशास्त्रद्न्यांचे मत आहे. हा मानवी गट भारताबाहेरही आढळतो. कोकनात या मानवी गटाचे आगमन इसपू ७ ते ८ हजार वर्षांपुर्वी झाले असावे असे पुरातत्वीय पुराव्यांवरुन दिसते. नदी-तळी येथील मासेमारी मानवाला पुरा-पाषाणयुगापासुन येत होती. पण समुद्रातील मासेमारी अत्यंत धाडसाची अशीच होती. ज्या कोलीय गणाने सामुद्रिक मासेमारीचा शोध लावला व अन्नाची गरज भागवु लागला तो सागरकिनारे हेच आपल्या वास्तव्याचे ठिकान ठरवणार हे उघड आहे. पुढे तोही उद्योग बनला. आणि मीठाचा शोध लागल्यानंतर जो भाग मीठशेतीस योग्य आहे तेथेच त्यांची वस्ती आढळणे स्वाभाविक असेच आहे. त्यामुळेच कि काय महाराष्ट्रात व गुजराथेतही (जेथेही मीठशेती करता येणे शक्य होते तेथे) त्यांच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरातत्वीय पुरावे आढळतात आणि तेथेच ते आजही एकवटलेले दिसतात. त्यामुळे महिकावतीच्या बखरीतील आगरी समाज हा बिंबराजाबरोबर मुंगी-पैठणवरुन आठशे वर्षांपुर्वी कोकनात आला ही कथा आपोआपच बाद होते. कारण मीठ बनवणे हा आगरी समाजाचा पुरातन कालापासुनचा व्यवसाय होता. बिंब राजाने कोकणात आक्रमण केल्यानंतर त्यांना सैनिक म्हणुन गरज संपल्यानंतर मीठागरे बनवून दिली व तेच आगरी हे मत कोणत्याही पुराव्यांवर टिकत नाही. ते मानले तर मीठाचा शोध तेराव्या शतकात बिंबराजाने लावला असे म्हनावे लागेल!

आगरी समाजाचे मानवी संस्क्रुतीवर फार मोठे उपकार आहेत. हा खरा संशोधक व निर्माणकर्ता समाज होय! मिठाचा इतिहास म्हनजे आगरी समाजाचा इतिहास होय...या समाजाचा इतिहास वैदिक संस्क्रुतीपेक्षाही पुरातन म्हणजे किमान सात हजार वर्ष एवढा प्राचीन आहे. सर्वांनीच त्यांचे मिठ खाल्ले आहे. इतिहास हा फक्त राजा-महाराजांचाच नसतो तर ज्यांनी संस्क्रुती घडवली अशा निर्माणकर्त्यांचाही असतो हे या निमित्ताने लक्षात यावे!

लेखक:
संजय सोनवणी

शनिवार, ३१ मार्च, २०१२

माझ्या एकविरा आईचा दरबार (Ekvira Aai)


माझ्या एकविरा आईचा दरबार

लेण्या कोरल्या डोंगरी
भार ठेऊन आईवर
गेले पांडव बांधुनी
माझ्या आईचा दरबार ||धृ||

भीम उचली दगडी
अर्जुन नक्षी हो काढी
धर्म डोंगर फोडी
द्रौपदी मंदिर झाडी
सहदेव-नकुलाने
करविला जीर्णोद्धार
गेले पांडव बांधुनी
माझ्या आईचा दरबार ||१||

पाषाण मंदिरी
दिला कळस सोन्याचा
सह्याद्रीच्या माथी
शोभे मुकुट आईचा
साऱ्या जगभर चाले
माझ्या आईचा कारभार
गेले पांडव बांधुनी
माझ्या आईचा दरबार ||२||

कवी-आगरी पोऱ्या
सर्व हक्क राखीव.

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

चलो जेएनपीटी............!! (JNPT BANDH)



चलो जेएनपीटी !! चलो जेएनपीटी !!

मा.लोकनेते.श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळावर दि. २७ मार्च २०१२ रोजी सकाळी ९.०० वा. पासून जेएनपीटी व सर्व सी.एफ.एस. बेमुदत बंद व करळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन.
ह्या विषयासंदर्भातील अगोदरच्या पोस्ट

जे.एन.पी.टी. बेमुदत बंद

1970 साली सिडकोने नवी मुंबईसाठी जमीन संपादित केली होती. त्याविरोधात स्थानिकांनी सातत्याने आंदोलने केली आहेत. 16 जानेवारी 1984 रोजी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जासई येथे दोन व पागोटे फाटा येथे गोळीबारात तीन शेतकरी हुतात्मा झाले. त्या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित भूखंड तसेच शेतमजूरांना 40 चौरस मीटरचा विकसित भूखंड देण्याचे ठरवण्यात आले होते. पण सिडकोने ठरल्याप्रमाणे येथील गावक-यांना विकसित जमीन न दिल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. सिडकोने या परिसराच्या 18 गावांतील जमीन जवाहरलाल नेहरू बंदर न्यासाला विनामोबदला दिली होती. पण विकसित भूखंड देण्यासाठीचा खर्च कुणी करावा, त्या सिडको व जेएनपीटीने अनेक वर्ष वाया घालवल्याने प्रकल्पग्रस्तांत नाराजी उमटत आहे.

लाल सलाम !! लाल सलाम !! हुतात्म्यांना लाल सलाम !!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१२

वैलेंटाइन डे (break up ke baad)



मन्या खुष झाला होता कारण वैलेंटाइन डे जवळ येणार होता. आपण तिला प्रपोझ मारणार आणि ती आपल्याला हो बोलणार या कल्पनेने तो सुखावला होता. गेले काही दिवस तो मस्त मुड मध्ये होता. तसा मन्या बारावी पास पण त्यापुढे शिक्षणाचा खास करून इंग्रजीची भितीने त्याने शिक्षणाला रामराम केला होता. तेव्हापासून कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून नाक्यावर उभे राहणे, सिगारेट फुंकणे असे आयुष्याचा वेळ वाया घालवण्याचे प्रकार तो करू लागला होता. अचानक एके दिवशी त्याला मनी दिसली. लहानपणी तिला पाहिलेली. तिच्यात झालेला बदल पाहून मन्या प्रेमात पडला मनी मन्याच्याचा मोहल्यात राहणारी , रोज सकाळी उठून कॊलेजात जाणारी. तर मन्या रोज सकाळी उठून नाक्यावर उभा राहणारा. दिवसांमागून दिवस जात होते. मन्या मनीला पाहत होता, मनी मन्याला पाहत होती. पण साला मन्याची तिला विचारण्याची हिंम्मत होती. आता काय करावे हा प्रश्न मन्याला सतत सतावत होता ? मग त्याला त्याच्या
नाकेकरी मित्राने सल्ला दिला "अरे मन्या, वैलेंटाइन डे जवळ येतोय. विचारून टाक, हो बोलेलच. यावेळेला कोणीही नाही म्हणत नाही, बिंनधास्त जा. लाईन पक्कीच...." मित्राच्या या बोलण्याने मन्या सुखावला होता, त्याला स्वप्ने पडु लागली होती, आता मनी हो बोलणार, मग आपण सुधारणार, नाका वैगेरे सगळे सोडणार, शिकणार काम करणार. अशा आपल्या आयुष्याच्या कल्पना त्याने रंगवल्या होत्या.

इथे "वैलेंटाइन डे" जवळ येत होता. ग्रीटींग्ज, भेटवस्तूंनी दुकाने सजली होती. मन्याला वाटले आपणही भेटकार्ड आणि छानशी वस्तू मनीला देऊ. वेलेंटाईन डे आला. मन्याने भेटकार्ड आणि वस्तूसाठी आईकडून पैसे घेतले होते. इथे मनी कॊलेजात जायला निघालेली असते. मन्या कडक इस्त्री केलेले शर्ट-पैंट घालून परफ्युम मारून मनीच्या समोर येतो. "थांब मनी", ती थांबते. इथे मन्या मनातल्या मनात घाबरलेला .
"बोल, काय काम आहे रे ?" मनी म्हणते. मन्या थरथरल्या हातांनी तिला भेटकार्ड भेटवस्तू देतो. आणि म्हणतो,"मला तु खुप आवडतेस , माझे तुझ्यावर प्रेम आहे." इथे मनी भडकते,"तुझी हिंम्मतच कशी झाली, मला विचारायची." असे म्हणुन मन्याच्या श्रीमुखात भडकावते. "चल निघ इथून नाहीतर पोलीस कंप्लेट्च करेन." असे म्हणुन ती निघून जाते. इथे मन्या रडकुंडीला आलेला असतो. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. तो जाम भडकतो. त्याचे मित्र त्याचं सांत्वन करत असतात.

याच सुमारास काही ठिकाणी वैलेंटाइन डे ला विरोध होत असल्याची बातमी मन्याच्या कानावर येते . अचानक मन्या पलटतो. ही आपली परंपरा नाही. पाश्चात्य आहे असे तो म्हणू लागतो. नाक्यावरच्या मुलांना घेऊन उठतो. विरोध झालाच पाहीजे, वैलेंटाइन डे हाणुन पाडलाच पाहिजे अशा घोषणा तो देऊ लागतो. ज्या दुकानातून त्याने मनीसाठी भेटवस्तू घेतली असते त्याच दुकानात जाऊन तोडफोड करतो. इथे टीव्हीवर मन्या झळकू लागतो. वैलेंटाइन डे ला विरोध केल्याने त्याला प्रसिध्दी मिळते. ज्या पार्टीने विरोध केला त्याचे वरिष्ट नेतृत्व मन्याची दखल घेते. आपल्या पक्षाची लाज राखल्याबद्द्ल त्याला आगामी पालिका निवड्णूकीत नगरसेवक पदाचे तिकीट देते .मन्या निवडून आलेला असतो. तो यापुढे दरवर्षी वैलेंटाइन डे ला विरोध करणार असतो. आता मनीला मन्याच्या कानफडात मारल्याच्या पश्चाताप होत असतो. पण त्या बिच्चारीला काय महित असते की, आपल्यामुळेच मन्या नावारुपाला आला (इथे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे तंतोतंत लागू पडलेले आहे) मन्याला आमदारकीचे तिकीट मिळणार असते. गल्लीतल्या मन्या आता साहेब झालेला असतो...............

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

प्रश्न आगरी समाजाच्या अस्तित्वाचा (AGRI SAMAJ)


प्रश्न आगरी समाजाच्या अस्तित्वाचा
आगरी. मुंबईचे मूळ मालक. त्यांची अफाट शेतजमीन. विस्तीर्ण मिठागरे. पण, शहरीकरण वाढत वाढत औद्योगिकीकरण झाले नि बघता बघता सारे कसे होत्याचे नव्हते झाले. पैसा खुळखुळला. दारी गाडय़ा आल्या. इंधनाचा धुरळा उडाला. हळदी समारंभ, साखरपुडे झोकात झाले. लग्नाच्या खर्चाची शेखी मिरवली गेली. पण, जमीनजुमला विकून हाती आलेल्या पैशाचे नियोजन करायचे असते हे कुणी शिकवलेच नाही वा शिकून घेण्याचीही कधी गरज भासली नाही. कालौघात हाती आलेला पैसा कुठे गेला हेच कळले नाही. गरिबी वाढली. घरे ओसाड पडली. बघता बघता शेतजमीन गेली. लाडके बैल गेले. श्रमाला प्रतिष्ठा देणारे नांगर थांबले. खिल्लारी बैलांच्या गाडीची चाके कर्जाच्या गाळात रुतली. आता आगरी गावात फेरफटका मारला तर भयावह चित्र दिसतेय. नांगर कोनाडय़ात पडलेत, बैलगाडीची चाखे निखळलीत. जिथे भाताची कोठारे होती, तिथली भात भरडणारी जातीच बंद पडलीत. दगडाच्या खाणी संपल्यात नि डोंगरही भुईसपाट झालेत. काही जमीनमालक आपल्याच जमिनीवर दुर्दैवाने बजावताहेत वॉचमनची डय़ुटी. एकूणच काय भातशेती-मिठागरांचे वैभवी आगर ज्यांच्या ताब्यात आहेत, ते आगरी बांधवच बनलेत भूमिहीन. दयनीय अवस्था. मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगडमधील गावांवर बिल्डर, बडे उद्योजक यांची वक्रदृष्टी पडू लागलीय. एकेकाळचे आगरी समाजाला तारणारे नेते गेले नि आता मारणारे नेते आलेत. काळ तर मोठा कठीण आलाय. आगरी शेती, मिठागरे जात आहेत… हळूहळू आगरबोलीचा जन्मदाता माझा आगरी माणूसही!

आगरी समाजाच्या हक्काची हिरवीगार भातशेती, पुनवेच्या चंदेरी रात्री चमचमणारी मिठागरे यांच्या पूर्वीच्या खाणाखुणा आता लुप्त होत आहेत. बडय़ा कंपन्यांच्या आयोडिनयुक्त मीठनिर्मितीमुळे मिठागरे संपुष्टात येत आहेत. शेतीही फायद्याची ठरत नसल्याने त्याकडेही समाजाने पाठ फिरवली आहे. आगरी समाजाच्या मोक्याच्या जमिनींचे लचके तोडण्यास सुरुवात झाली आहे. कुठे सेझ येतेय… कुठे विमानतळ. फिक्सिंग करण्यात सर्वच नेते आघाडीवर आहेत. बिल्डर्स, बडे कारखानदार, पुढारी, सरकारी बाबू, राज्यकर्ते सारेच मॅनेजर! पैशाच्या वाहत्या गंगेत सारेच हात धुऊन घेत आहेत. गाववाले बसलेत चिडीचूप. पण, शिवेच्या बाहेरचे होताहेत मुजोर, शिरजोर!!

होय, एक काळ होता, आगरी बांधवांचा. त्यांच्या नेत्यांचा. समाजाचा. नाना पाटील (अलिबाग), नारायण नागू पाटील (पोयनाड), माजी खासदार श्री. दि.बा. पाटील(जासई-उरण/पनवेल), ऍड. दत्ता पाटील (अलिबाग) तु.ह. वाजेकर (उरण), सोनूभाऊ बसवंत (वसई), कॉम्रेड जी. एल. पाटील, ग.ल. पाटील (मुंबई), यांनी भूमिपुत्रांच्या न्याय्यहक्काचे लढे उभारले. पण, आता काळ बदलला. नेते बदलले. एकेकाळचा बलाढय़ समाज नेत्यांपासून पार दुरावला. पूर्वी आगरी बांधवांना सावकारांनी लुटले, आता नेते ,बिल्डर, उद्योगपती लुटताहेत. एकेकाळचा चरीचा संप आगरी समाजाने सात वर्षे लढविला. `कसेल त्याची जमीन’ हा कायदा समाजाच्याच आंदोलनातून साकारलाय. ५ हुतात्मे झालेल्या जासई येथील साडेबारा टक्केचे आंदोलन आगरी समाजातल्या भ्रष्ट राजकीय नेत्यांनी संपवल्यातच जमा आहे. पण, आता इतिहास कुणालाय हवाय? सार्यांचे लक्ष भूगोलाकडे लागलेय!

आगरी समाजाची मुंबईत गावे होती. घरे होती. शेतजमीन होती. गावात आगरी बांधवांचे वजन होते. तथापि, आता मुंबईच्या नकाशावर, समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात, सत्तेत त्यांचे स्थान अगदी नगण्य बनलेय. पुढील पंचवीस वर्षांत नवी मुंबईच्याही पुढे `तिसरी मुंबई’ वसविण्याची स्वप्ने `वीकेण्ड’वाल्या गर्भश्रीमंतांसाठी खुणावू लागली आहेत. भविष्यात भीती आहे. काय, तर रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण, अलिबाग हे तालुके आणि वडखळ, वाशी, शहाबाज, पोयनाड, पसी ही गावे उद्ध्वस्त होण्याची. वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे आगरी समाजाचे उरलेसुरले अस्तित्व आणि संस्कृतीही नष्ट होऊन भावी पिढीचे भवितव्य अंधःकारमय होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच आता सर्व समाजाने एकत्र आल्याशिवाय आणि आपला राजकीय दबावगट निर्माण केल्याशिवाय आगरी समाजाचा विकास होणे अवघड असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील खासदार आणि नगरसेवक !
मुंबईत आगरी समाजाचे खासदार आहेत संजय पाटील, तर नगरसेवक आहेत विद्या भोईर, रघुनाथ थवई, शीतल म्हात्रे आणि भालचंद्र म्हात्रे. गावाकडे काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच आगरी समाज राजकीयदृष्टय़ा विभागला गेल्याचे दिसून येत आहे. मुंबईत एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 30 टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे.


आगरी बाणा !
तांदळाचे वडे, तांदळाच्या भाकर्या, तांदळाची बोरं, आंबोळ्या, पुरणपोळी, मोदक, घावन, त्याचबरोबर सुक्या माशाचे कालवण. जिताडा, खवली, वरस, चिमणी, निवटय़ा, कोलंब्या, चिंबोर्या, सुक्या जवळ्याची चटणी म्हटलं की आपली खवय्येगिरी जागी होते आणि मग आपसूकच आपली पावले आगर गावाकडे वळतात. आगरी हा मूलतः कष्टकरी, शेतीनिष्ठ समाज. दगडी शिल्पकलेतही माहीर. भातशेती, मिठागरे हेच त्यांचे विश्व आणि जीवनही. आगोटं (पावसाळ्याची सुरुवात), झोलाला (मासे पकडायला), बगला (मासे पकडण्याचे आयुध),  मुरुकली (काळी कोळंबी), इरा (ओढा), कायजून (कोणास ठावे), मंगोला (मातीचा चुला) आखंदा (लहान खडी) अशी आगर बोली बोलणारे ते आगरी.
म्हणजे आगारात राहणारे.
म्हणजे गर्व नसणारे.
री म्हणजे रीतभात जोपासणारे.
म्हणजेच आगरी… मूळ मुंबईकर.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, येथील मूळ समाज म्हणजे आगरी समाज. भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा म्हणजे आगर. त्यावरूनच आगरी हा शब्द प्रचलित झाल्याचे मानण्यात येत आहे. आडनावाविषयी काही आख्यायिका सांगितल्या जात आहेत. आरमाराचा प्रमुख म्हणजे तांडेल, पालखी वाहून नेणारे भोईर, माहुताचे काम करणारे महापात्र म्हणजे म्हात्रे, मठाचा प्रमुख तो मढवी, देवळात पूर्जाअर्चा करणारे भगत, शेतात भात भरडणारे ते घरत. गावचे जमीनदार म्हणजे ठाकूर, गावचे राज्यकर्ते पाटील अशी अनेक उदाहरणे दिली जात आहेत.

आगरी समाजाच्या पोटजाती !
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाडय़ा, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. 1911 मध्ये ठाणे जिल्ह्यात 96 हजार 548 तर पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यात 1 लाख 16 हजार 711 एवढी लोकसंख्या होती. आता किती आहे याचा अंदाजच केलेला बरा. आगरी समाजाच्या तीन पोटजाती. शुद्ध आगरी, दास आगरी आणि वरप आगरी. शुद्ध आगरी म्हणजे शुद्ध मीठ पिकविण्याची कला अवगत असलेले मूळ आगरी. दास आगरी प्रामुख्याने पालघर तालुक्यात आढळतात. तिथे त्यांना कराडे आगरीही म्हणतात. पण, ते मूळ आगरीच. आधी ख्रिस्त धर्म स्वीकारून पुन्हा आगरी झालेले म्हणजे वरप आगरी. याशिवाय, ढोलवादन करणारे, नृत्य करणारे ढोल आगरी. ढोर मेहनत घेणारे ते ढोर आगरी. कमी मेहनत घेणारे ते सोन आगरी. अलिबाग तालुक्यात जे आगरी राहतात, त्यांना खारकी, खारपाटे म्हणतात. मीठ पिकविणार्या आगरी लोकांना खारवा म्हणतात. बारा, चौदा, बावन्न पाटील!



मुंबईतील आगरी गावे
आगरी समाजाची वस्ती एकेकाळी मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा, ठाकूरवाडी, बाणमोळी, नायगाव, वडाळा, माटुंगा, खडा माटुंगा, गोवारी (वडाळा स्टेशन) शीव, माहीम, माखाडी आणि परळ यांचा समावेश होता. काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत. हे आगरी नागोठण्याहून येऊन डोंगरी, चिंचबंदर, भायखळा, उमरखाडी भागात स्थायिक झाले. गोवंडी, मानखुर्द, तुर्भे, गवाण, माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसं प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड, पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ आणि त्यानंतर माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले. चेंबूरच्या आरसीएफ आणि बीएआरसी प्रकल्पामुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले.


आगरी गावातील परंपरा
आगरी बांधवांच्या गावात मधोमध मरीआईचे देऊळ असते. सोबत हनुमान, विठ्ठल, राम, गणपती, शंकर यांचीही देवळे असतात. वाघेश्वरी, जाखमाता, बापदेव, खंडोबा, बाहेरी भवानी ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात आगरी बांधव नाचतात. गोविंदाही जोशात खेळतात.

पाटलांनी गाजविली विधानसभा!
माजी खासदार दि.बा. पाटील, माजी आमदार दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवून समाजाचे विविध प्रश्न सरकार दरबारी सोडविले आहेत. तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ऍड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते. पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार, तुकाराम हिरुजी म्हात्रे पहिले एलएलबी, जनार्दन हीराजी दमामे हे पहिले जेपी तर नकुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे. आगरी ज्ञाती परिषद (1917), आगरी शिक्षण संस्था (1934), आगरी सेवा संघ, वरळी (1937), अखिल आगरी समाज परिषद यांच्यासह अनेक लहान-मोठय़ा संस्था मुंबईत कार्यरत आहेत. आगरी बांधवांच्या बोलीचा यादवकालीन प्राकृत भाषेशी संबंध जोडला जात आहे. शाहीर राघोबा कोपरकर कलगीवाले ऊर्फ कवी राघवदास हे समाजातील पहिले कवी-कीर्तनकार होते. आगरी बोलीचा लेखनात कलात्मक वापर करून मराठी साहित्यात ती सर्वपरिचित करण्याचा बहुमान प्रा. शंकर सखाराम (कोपरी-अलिबाग) यांना जातो. आगरी समाजाचा इतिहास प्रेरणादायी आहे; परंतु त्यांच्याच शेतीवर आणि मिठागरांवर आता चौफेर आक्रमण सुरू  झाले आहे. विविध संक्रमणातून जात असलेल्या समाजासाठी हा कसोटीचा काळ आहे, एवढे मात्र निश्चित!

सौजन्य:
नवशक्ती

सोमवार, ९ जानेवारी, २०१२

आता डाउनलोड करा आगरी-कोळीगीते-लग्नगीते (agri-koligeet-lagngeet)



आपल्या आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगवर देखील आगरीगीते-कोळीगीते-लग्नगीते उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आपला ब्लॉग मोबाईल फ्रेंडली असल्याने आपणांस ही गाणी डायरेक्ट मोबाईलवरून देखील डाउनलोड करता येतील. मोबाईलच्या ओरिजिनल ब्राऊजर मधून गाणी डाउनलोड होण्याचा वेग जास्त असू शकेल. तर मग आत्ता आगरी-कोळीगीतांचा तसेच लग्नगीतांचा आस्वाद घ्यायला तयार राहा.

१. आगरीगीते-कोळीगीते (Agri geete-Koligeete)
इथे भेट द्या.

२. डोंगराचे आरून (Dongrache Aarun)
इथे भेट द्या.

३. डोल डोलतंय वाऱ्यावर (Dol Dolatay Varyavar)
इथे भेट द्या.



४. दिरकीला बोंबील पंदरा (Dirkila Bombil Pandara)
इथे भेट द्या.

५. कोळीगीते (Koligeete)
इथे भेट द्या.

६. एकविरा आई (Ekvira Aai)
इथे भेट द्या.

७. हिंगलाई देवी (Hinglai Devi)
इथे भेट द्या.

८. मी हाय कोळी (Mi Hay Koli)
इथे भेट द्या.

९. रसिकाच्या लग्नात-१ (Rasikacha Lagnat)
इथे भेट द्या.

१०. रसिकाच्या लग्नात-२ (Rasikacha Lagnat)
इथे भेट द्या.

११. राजाच्या हळदीला-१ (Rajachya Haldila)
इथे भेट द्या.

१२. राजाच्या हळदीला-२ (Rajachya Haldila)
इथे भेट द्या.

१३. शिंगाला नवरा (Shingala Navra)
इथे भेट द्या.

१४. सुपर सिक्स-हळदी मिक्स (Haldi Mix)
इथे भेट द्या.


१५. या गो दांड्यावरून (Ya Go Dandyavarun)
इथे भेट द्या.

१६. वेसावची पारु (Vasavchi Paru)
इथे भेट द्या.


१७. वेसावची सोनटिकली (Vesavachi Sontikali)
इथे भेट द्या.

१८. मांडवाचे मगारी -(आगरी लग्नगीते-कोळीगीते-पारंपारिक) (Agri Lagnageete)
इथे भेट द्या.


१९. काला काला निवटा खारीनचा (kala kala nivata kharincha)
इथे भेट द्या.


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.