आमोद पाटील-आगरी बाणा: 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

३१ डिसेंबरची नाईट...............(31st December Night)


३१ डिसेंबरची नाईट...............

कदीची वाट बगत होतू ह्या दीवसाची.
रम्या, सूर्‍या, म्हादेव न मी चौगांनी पक्का बेत ठरवलावता.सगली तयारी केलती. बॅगपायपरचे दोन खंबे,चाकन्याला अंडी, शेंगदाने,स्टार्,बॉईल चना आनुन ठीवल व्हत.बारक्याला मटन आनाला पाटवला. सूर्‍याच्या शेतात बरूबर सात वाजता जमाच ठरल होत. अंगात येगलाच वारा येत व्हता.

संद्याकाली साडेसा ला सूर्‍याची शीटी आली. मी भायेर नींगालू. शेतात पोचलु. रम्या न म्हादेव वाटच बगीत व्हते.
आमाला बगीतल्या बगीतल्या
'थर्टीपस्ट नाईट येन्जाय ~~~' रम्यान बोंब ठोकली.
आर कूट होता र आवरा टाईम ? कती वाट बगाची तूमची ? म्हादेव ला धीर नीगना
आवर्‍यात बारक्या गरमागरम मटन न भाकरी झेऊन आला.
'चला चला र स्टार्ट करूया' रम्यान गलासं काडली.

पाचव जनांचे पेग भरले, यकमेकांवर आपटले.
'चेआर्स !' पयला घोट मन भरुन झेतला. चार चार करत जालत दारू आन गेली.
गप्पा सूरू झाल्या. आख्ये शेतान आमचे आमीच, कोनाचा तरास नाय न काय नाय.

साली येक मातर गंमत हाय. दारू लोकांना जवल बी आनती न पार दुश्मनी बी करवती.
रम्या न सूर्‍याचा छ्त्तीस चा आकडा पन आज दोगव यकत्र बसलेवते.

'तुला म्हायती र मीथन्या ह्यो माज्या भावासारका हाय.' रम्यान सुर्‍याचे गल्यान हात टाकला
'म्हुन माजे बा ला शीव्या दील्ल्या व्हत्या क र ?' सूर्‍या
'आरे गपा भ्**नो. मजा कराव आल का मारामारी र' मी समझवला
'त्या शेट्टी आन्नान जाम खून्नस दिलता र परवा' म्हादेव
'माराचा क बोल. माराचा क बोल ? आत्ता कोयता आनत बोल.' बारक्या
'आर बस ,र बस'
'बस कना बस कना ? म्हादेव ला खुन्नस दीलेला मना खपाचा नाय !' बारक्या चीतालला
'आज मी जो क हाय तो म्हादेव हाय म्हनून '
'आर आसा काय झाटलीमन लागुन गेलास र तू ? साला म्हैन्याचे शेवटी लो़कांकडे पैशे मागत फीरतस.'
'मिथ्नन्या पैसा क रां* पन कमवते. आपून ईज्जतीत जगतो बोल.'
'ज्याआयला कसली ईज्जत र ? लोकांकड पैशे मागतस क ईज्जत ?'
सगली हसाला लागली.
आस सगल चाल्लवत. दोनी खंबे रीकामे झाल्ते. रात त सरली नव्हती.
'मना आजुन हवी.' म्हादेव टाईट
'आर आता कुट मीलाची येवड्या राती ?'
'मी आन्तय. देशी चालल क ?' बारक्या
'आन कुडची बी पन मना आता दारु पायजेल' म्हादेव आयकना
बारक्या गेला भेलकांडत न शेट्टीआन्नाकडशी हातभट्टीची दोन बाटल्या हानल्या

'तूमीच पीवा बाबांनो, आमाला हातभट्टीची नको, आदिच जाम झालीय' मी न सूर्‍या बोल्लो, रम्याबी नाय म्हन्ला
दोनी बाटल्या म्हादेव न बारक्यानी संपवल्या.

सगली आवराआवरी करनार येवड्यान बारक्यान ऑक्क्नन ऊल्टी केली.
म्हादेव म्हन्ला 'मना कई दीस नाय रं'
सुर्‍या त्याचे जवल गेला त त्याचे डोल्यातून रगत येत व्हत. आमी पार घाबरलो, खाडकन ऊतरली आमची
तसाच दोगांना उचालले न पनवेला हास्पीटला त नेलं. तीत त ही गर्दी. आखा गाव लोटलावता. शेट्टीआन्नान मिथेल टाकून दारू वाडवली व्हती .
घरटी यक तरी मानूस ऍड्मीट व्हता.
बारक्या म्हादेव दोगव गेले.
बत्तीस मान्स मेली. आख्या गावच मशान झाल वत. येंन्जोय करन्याचे नादान आमी पार बरबाद झालो व्हतो.

आज थर्टीपस्ट नाईट
बारक्या न म्हादेव ची लय आटवन येतय रं.
मी आनी सूर्‍या गप बसलोय. शांत शांत.

देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग.
 
आपलाच,
आमोद  पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

व्यथा मच्छिमार कोळी समाजाच्या ( Koli Samaj )


गेल्यावर्षी अनुभव अंकात सविता अमर लिखित "नाखवा गावलाय जाळ्यात" हा लेख प्रकाशित झाला होता. कोळी समाजाच्या सद्यस्थितीचे अतिशय मार्मिकपणे दर्शन घडवले आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि.मी.च्या किनारपट्टीवरचा मच्छिमार समाज ‘जगायचं कसं? ’ या प्रश्नाच्या वादळात सापडला आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण ८-९ टक्के असलेल्या मच्छिमारांना एकीकडे सागरी प्रदूषण व सागरावरील अतिक्रमणाने निर्माण झालेल्या मत्स्य दुष्काळाने तर दुसरीकडे शासनाच्या उदासीनतेने ग्रासले आहे. ‘दर्याचे राजे’ म्हणून संबोधले जाणार्‍या मच्छिमारांचा दर्याचा आधार निखळला आहे, तर भूमीवरचा त्यांचा आसराही हिसकावून घेतला जात आहे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी व केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मत्स्यविकासाच्या अनेक घोषणा करून तसंच केंद्राने सुधारित किनारा नियंत्रण कायद्याची अधिसूचना जारी करून मच्छिमारांच्या प्रश्नाबाबतची उदासीनता झटकण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांच्या जगण्याच्या सद्यस्थितीचं दर्शन घडवणारा हा लेख.
(©खालील लेखाचे सर्व हक्क लेखिका सविता अमर, अनुभव अंक आणि युनिक फीचर्स लेखनसंस्था यांच्याकडे राखीव.)
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.



वेळ - सायंकाळचे पाच-साडेपाच.
स्थळ - मुंबईतल्या वेसावे कोळीवाड्याचा किनारा.
किना-यावर उभ्या असलेल्या बोटींवर मासेमारीची जाळी, बर्फ, पिण्याचं पाणी, डिझेलचे निळे बॅरल्स, जेवणाची सामग्री वगैरे सामान चढवण्याची लगबग सुरू होती. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने एकेक बोट खाडीतून समुद्राच्या दिशेने निघण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी काही बोटी समुद्राकडून किना-याकडे परतत होत्या. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या तिथल्याच एका कोळ्याला त्याबद्दल विचारलं.
‘या ससून डॉकवर माल उतरवून परत आलेल्या मासेमारीच्या बोटी आहेत.’, त्याने सांगितलं.
‘आत्ता ज्या बोटी समुद्रात निघाल्यात त्या केव्हा परत येतील? ’
तसं काय सांगता येत नाय. कोनी दिवसासाठी जातं. कोनी आठवड्यानं परत येतं. दिवसाला जातात ते सकाली निघतां आणि सांच्याला माघारी येतां. ते खोल पाण्यात जात नाय. जे ट्रॉलर (मोठ्या यांत्रिक बोटी) आहेत ते 7-8 दिवसांनी परतीचा रस्ता धरतात. इकडे जंजिरा ते पार सातपाटी, गुजरातपर्यंत माशांचा माग काढत ते खोल समुद्रात जातात. माघारी कवा फिरायचं हे ठरलेलं असलं तरी मासली गावल्याखेरीज कोणी परत येत नाय. ’
सूर्य आता पश्चिमेला चांगलाच कलला होता. मासेमारीवरून परत आलेल्या बोटींमधल्या माशांच्या पाट्या हळूहळू वाळूवर रचायला सुरुवात झाली. किनार्‍यावर कमरेला पाऊच लटकवलेल्या काही महिला कोळी बोली लावत होत्या. तिथे कुठंही वजनकाटा दिसत नव्हता. माशांची जी काही विक्री होत होती ती ‘टकार’ म्हणजे निळ्या बॅरल्सच्या अर्ध्या कापलेल्या तुकड्यांमधून. हेच काय ते त्यांचं मोजमापाचं माध्यम. तिथल्या गोंगाटातून वाट काढत पुढे किना-याजवळ आले. नुकतीच गुजरातपर्यंत आठवड्याची ट्रिप मारून आलेल्या वसंत टपके यांना विचारलं, ‘कशी
झाली ट्रिप? ’
‘तशी बरीच झाली. आजकाल मासे गावतात कुठं जाळ्यांत? एवढे 7-8 दिवस खपलो, पण डिझेलचा खर्च निघेल एवढीबी मासळी गावलेली नाय. ’
या किनार्‍यावरच्या कोळी बांधवांशी बोलताना लक्षात आलं, की सगळ्यांचंच म्हणणं होतं, समुद्रात मासळी कमी झालीय. पहिल्यासारखी मासळी आता मिळत नाही.
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला वरळी कोळीवाडा म्हणजे मुंबईचं एके काळचं महत्त्वाचं बेट. वरळी सी-फेस संपल्यावर लागणा-या कोस्टगार्ड मुख्यालयापासून वरळी कोळीवाड्याची हद्द सुरू होते. कोस्टगार्डच्या अलीकडेच ‘फ्लड गेट’ लागतं. तिथेच एका चिंचोळ्या जागेत छोटी जेट्टी आहे. तिथे मासेमारी करणा-यांच्या काही बोटी उभ्या होत्या. कुठे बोटींची दुरुस्ती सुरू होती, तर कुठे जाळी विणण्याचं काम सुरू होतं. कोप-यात उभ्या बांबूच्या मचाणीवर बोंबील, वाकटी सुकत घातलेली होती. त्याच्यापुढेच सिमेंटच्या लादीवर सुकत घातलेल्या जवळ्यात कावळे चोची मारत होते. मांजरंही दबक्या पावलांनी जवळ्याला तोंड लावत होती. इथून सरळ चालत चालत वरळी किल्ल्याजवळचं शंकर धर्मराज गोमटे यांचं घर गाठलं. ते गेली साडेचार-पाच दशकं खोल समुद्रात मासेमारी करतात. गोमटे सध्या स्वत: बोटीवर जात नसल्याने घरीच होते. मासेमारी व्यवसायाच्या आजच्या स्थितीबद्दल त्यांना विचारलं. काहीसं हताश हास्य करीत ते म्हणाले, ‘मासेमारीची साफ वाट लागलीय. घोल, कोलंबी, खुपा, हलवा ही मच्छी पूर्वी वरलीच्या किना-याला भरपूर असायची. एका खेपेला चांगली २०-२५ किलो मासली मिलायची. आता दोन-अडीच किलोसुद्धा मिलत नाय. आधी इथं दोन पावलांवर गेलं तरी मासली डेली गावायची. आता १५-२० वाव आत जाऊन ८-१० दिवस खपावं लागतं. ’
मासेमारीतल्या घटत्या उत्पन्नाबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगितलं, ‘दहा-बारा वर्षांपूर्वी सर्व खर्च वजा जाता २०-२५ टक्के उत्पन्न मिळायचं. आता १० टक्के पण मिळत नाही. बोटीवर काम करणा-या माणसांना आठ महिन्यांचा ३५-४० हजार रुपये पगार एकदम द्यावा लागतो. पण मासळी कमी झाल्यामुळे हा पगार देणंसुद्धा आता अंगावर येतं. कधी कधी तर घरातले दागिने विकून खलाशांचे पगार द्यावे लागतात! ’
माहीम कोळीवाड्यातले रवींद्र पाटील सांगत होते, ‘एके काळी माहीमची खाडी ही आमची कामधेनू होती. जाळं न लावता नुसत्या हातानं मासळी पकडता येत होती. आता पूर्वीसारखी मासळी मिळत नाही. त्यामुळे अनेक बोटी माहीमच्या वाळूत मरगळल्यागत पडून आहेत. आज खाडीत जाळी लावली तर ती मासळीने भरत नाही. ती जड होते गाळ आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या कच-याने! ’ जी स्थिती माहीमच्या मच्छीमारांची, तीच वसईच्याही. नायगाव कोळीवाड्यातल्या लुद्रीक आवलू यांनी मासळी कमी झालीय याला दुजोरा दिला.
मुंबई हे महाराष्ट्रातलं मासेमारीचं प्रमुख केंद्र. इथल्या बहुतेक कोळीवाड्यांमध्ये मासळी कमी झाल्याचा सूर ऐकू आला. मासेमारीत मुंबईखालोखाल क्रमांक लागतो कोकण किनारपट्टीचा. मात्र तिथल्या मच्छीमारी व्यवसायाचं चित्रही फारसं समाधानकारक नाही.
सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे सुधागड तालुक्यातून वाहत येणा-या अंबा नदीची पुढे धरमतर खाडी बनते. अंबा नदीला या प्रवासात सांबरी, निगडा, भोगावती, बाणगंगा, पाताळगंगा अशा उपनद्या येऊन मिळतात. खाडीच्या मुखापाशीच न्हावाशेवा हे मुंबईला पर्याय म्हणून बांधलेलं अद्ययावत बंदर आहे. मच्छीमारी हा धरमतर खाडीतला मुख्य व्यवसाय. पूर्वी इथे मुबलक मासे मिळायचे. त्यामुळे भाव कमी मिळाला तरी मच्छीमारांची दिवसाला ४००-५०० रुपयांची कमाई सहज व्हायची. मासळी जास्त मिळाली तर त्याहून जास्त. अलिबाग व पेण तालुक्यांतील सुमारे २५ ते ३० गावं इथल्या मच्छीमारीवर अवलंबून होती. पूर्वी जिथे मच्छीमारांना ४०-५० किलो मासळी मिळायची तिथे आता ४-५ किलोही मिळणं मुश्किल झालंय. जिताडा, पाला हे या खाडीची खासियत असलेले मासे जवळपास नामशेषच झालेत.
कोकणातल्या दाभोळ खाडी परिसरातल्या मच्छीमारी व्यवसायाबद्दल दाभोळ सहकारी मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील दाभोळकर यांनी सांगितलं, ‘काही वर्षांपूर्वी शेवंड (लॉबस्टर), सफेद कोळंबी, बांगडे, खेकडे, मुशी, मांगण, शिंगटी, बगा (रिबन फिश), निवट्या असे अनेक मासे जाळी भरभरून मिळायचे. आता इथं पाच टक्केसुद्धा मासेमारी होत नाही.
एकंदरीत, मत्स्योत्पादनात होत असलेली ही घट थेट मच्छीमारांच्या जीवनावर परिणाम करत आहे. महाराष्ट्रात मुंबई व कोकण किनारपट्टीच्या भागात सुमारे २५ लाख लोक प्रत्यक्ष मासेमारीच्या व्यवसायात आहेत. तर मासेमारीशी अनुषंगिक व्यवसायांत ४० लाख लोक आहेत. दिवसेंदिवस कमी होत चाललेली मासळी, त्यातून कमी झालेलं उत्पन्न, उत्पन्न कमी म्हणून डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, शिक्षणाचा अभाव आणि त्यातून निर्माण झालेली बेरोजगारी, या फे-यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न या मोठ्या लोकसंख्येसमोर उभा राहिला आहे. मासेमारी हेच उपजीविकेचं माध्यम असलेल्या मच्छीमारांना आज मत्स्यदुष्काळामुळे रेती व्यवसाय करणं, कारखान्यांत हंगामी लेबर म्हणून काम करणं किंवा शेतावर मजूर म्हणून जावं लागत आहे. अनेक छोट्या मच्छीमारांना स्वत:च्या मालकीची बोट किना-यावर उभी करून पोटासाठी मोठ्या ट्रॉलरवर कूली किंवा खलाशी म्हणून जाणं भाग पडत आहे.
मत्स्यव्यवसायाची तसंच मच्छीमारांची ही बिकट अवस्था का झाली याचा शोध घेण्यासाठी मुंबई, कोकणातल्या अनेक मच्छीमार वस्त्या पालथ्या घातल्या. मच्छीमार, त्यांच्या विविध संघटना, त्यांचे नेते यांच्याकडून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शोधप्रवासात मच्छीमारांची उपेक्षाच प्रकर्षाने समोर आली.

मत्स्यव्यवसायाच्या यांत्रिकीकरणातून मत्स्यविनाश
मुंबई व कोकणालगतच्या समुद्रात मत्स्यदुष्काळाची स्थिती का निर्माण झाली? वरळी कोळीवाड्यातले शंकर गोमटे यासाठी सागरी प्रदूषणाला दोष देतात, त्याचबरोबर मुंबई परिसरात होत असलेल्या वरळी-वांद्रे सी लिंक ब्रिजसारख्या अवाढव्य विकासकामांचा हा परिणाम आहे, असं त्यांना वाटतं. तर मुंबई महापालिका माहीमच्या खाडीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडत असल्याने मत्स्योत्पादनात घट होत असल्याचं माहीम कोळीवाड्यातल्या रवींद्र पाटील यांना वाटतं. धरमतर आणि दाभोळ खाडी परिसरातले मच्छीमार वाढत्या औद्योगिकीकरणामुळे झालेल्या सागरी प्रदूषणाला दोष देतात. या सा-या कारणांबरोबरच मासेमारी व्यवसायाचं झालेलं यांत्रिकीकरणही या मत्स्यदुष्काळाला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, असं दीर्घकाळ या व्यवसायात असलेल्या जाणकारांचं मत आहे.
मत्स्यदुष्काळाची ही स्थिती निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, असं महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, ‘सागराची मत्स्यसंपदा अमर्याद आहे, या अज्ञानाच्या आधारावर आजही आपल्याकडे मासेमारी केली जात आहे. ‘अधिक उत्पादन, अधिक नफा’ या धोरणाच्या अतिरेकी अवलंबामुळे जशा जमिनी नापीक बनल्या तशीच गत या सागरी पिकाचीही झाली आहे. गेल्या काही दशकांत मासेमारीसाठी यांत्रिक बोटींचा म्हणजेच फिशिंग ट्रॉलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे समुद्राचा तळ अक्षरश: खरवडून निघाला आहे, परिणामी, मत्स्यदुष्काळ जाणवू लागला आहे’, असं ते सांगतात.
पूर्वी मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करायचे. त्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या लहान-मोठ्या होड्यांचा वापर व्हायचा. शिडाच्या होड्यांची संख्यादेखील मर्यादितच होती. सर्वसाधारणपणे डोल आणि कव पद्धतीची जाळी मासे पकडण्यासाठी वापरली जात होती. या पारंपरिक पद्धतीत जाळ्यात सापडणा-या माशांचं प्रमाण मर्यादित असलं, तरी खाऊन-पिऊन सुखी राहण्याइतकं उत्पन्न मच्छीमारांना मिळत होतं. शिवाय संपूर्ण हंगामभर मासेमारी करणं शक्य होत होतं. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देण्याचं धोरण अवलंबण्यात आलं. राज्याच्या मत्स्योत्पादनक्षमतेत वाढ करणं आणि मच्छीमार समाजाची आर्थिक व सामाजिक उन्नती साधणं, असं दुहेरी उद्दिष्ट या धोरणामागे होतं. या धोरणाचाच एक भाग म्हणून सत्तरच्या दशकात मच्छीमार नौकांचं शासकीय मदतीने यांत्रिकीकरण सुरू झालं. परिणामी, पारंपरिक पद्धतीच्या आणि शिडाच्या नौका मागे पडून यांत्रिक बोटींचं प्रमाण वाढलं.
यांत्रिक बोटी म्हणजेच फिशिंग ट्रॉलर्सचा वेग, भार पेलण्याची अधिक क्षमता, समुद्रात खोलवर जाण्याची शक्ती, तसंच कमी मनुष्यबळात अधिक मासे पकडण्यासाठी त्यांचा होणारा उपयोग या सा-यामुळे मच्छीमार व्यवसायाचं स्वरूप झपाट्याने बदलत गेलं. सुरुवातीच्या काळात पारंपरिक मच्छीमार आणि ट्रॉलर्सधारकांमध्ये संघर्षाचं वातावरण होतं. आपल्या पारंपरिक व्यवसायावर ट्रॉलर्सधारक अतिक्रमण करत असल्याची भावना या संघर्षामागे होती. तथापि, नंतरच्या काळात पारंपरिक मच्छीमारही यांत्रिक बोटींकडे वळले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी हा पर्याय स्वीकारला. यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मासेमारी सुरू केल्यानंतर आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचं मच्छीमार मान्य करतात.
मात्र गेल्या दशकभरात या व्यवसायाचं चित्र पुन्हा बदललेलं आहे. याचं प्रमुख कारण या क्षेत्रात बड्या देशी व परदेशी मच्छीमार जहाजांनी केलेला प्रवेश. केंद्र सरकारच्या ‘डीप सी फिशिंग’ धोरणानुसार परदेशी फॅक्टरी शिप्सना आपल्या समुद्रात मासेमारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसायात स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन व्यवसायवृद्धीला चालना मिळावी, ही भूमिका या धोरणामागे असल्याचं सांगितलं जातं. तथापि, बड्या कंपन्यांच्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित बोटींच्या अतिक्रमणापुढे पारंपरिक मच्छीमार व व्यावसायिक ट्रॉलर्सधारक हतबल झाल्याचं दिसतं. असं म्हणतात, की परदेशी कंपन्यांच्या फॅक्टरी शिप्सनी केलेल्या बेसुमार मासेमारीमुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागरात मत्स्यदुष्काळ निर्माण झाला, समुद्राचे तळ उखडले गेले, मोठ्या प्रमाणात सागरी पर्यावरणाची हानी झाली. त्यामुळे तिथे विरोध होऊ लागल्याने त्यांनी आपला मोर्चा हिंदी महासागराकडे वळवला.
यांत्रिक पद्धतीच्या मच्छीमारीमध्ये जाळ्यांचं स्वरूपही बदललं. डोल, कव वगैरे मागे पडून ट्रॉल, पर्सिनेट अशा प्रकारची जाळी वापरात आली. या प्रकारच्या जाळ्यांच्या छिद्रांचा आकार अतिशय लहान असल्याने बारीकसारीक मासळीही त्यात अडकते. एखाद्या टापूतला सगळा मत्स्यसाठा या जाळ्यांमध्ये ओढला जाऊ शकतो. बड्या फॅक्टरी शिप्स अशी जाळी वापरून समुद्रातला फिश स्टॉक संपुष्टात आणत आहेत.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील वरील मुद्द्याला दुजोरा देत म्हणाले, ‘ट्रॉलिंग व पर्सिनेट पद्धतीच्या मासेमारीमुळे मोठ्या प्रमाणात मत्स्य अंडी, मत्स्य पिल्लं व इतर सागरी जीव नष्ट होत आहेत. पर्सिनेट जाळ्यांमुळे समुद्राचा तळ खरवडला जात आहे. अशा प्रकारे मत्स्यसंपत्ती नष्ट होत असल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना बंदरात बोटी नांगरून ठेवाव्या लागत आहेत.’
रामभाऊ पाटील यांच्या म्हणण्यानुसार सध्या रायगड व ठाणे (वसई, सातपाटी) भागात सुमारे साडेपाच हजार ट्रॉलर्स मासेमारी करत आहेत. पर्सिनेटच्याही सुमारे 700 बोटी आहेत. ट्रॉलर्सची संख्या अडीच हजारांपर्यंत आणि पर्सिनेटची संख्या 300 पर्यंत खाली आणली तर भविष्यात थोडाफार फिश स्टॉक समुद्रात शिल्लक राहू शकेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याचं रामभाऊ सांगतात. तथापि, या इशार्‍याकडे सरकार आणि मच्छीमार दोघंही दुर्लक्ष करत असल्याचंही ते आवर्जून नमूद करतात.
औद्योगिकीकरणातून सागरी प्रदूषण
फिशिंग ट्रॉलर्स आणि महाकाय फॅक्टरी शिप्स समुद्राचा तळ उपसून काढत असल्याने समुद्रातल्या मत्स्यसाठ्यावर गंभीर परिणाम होत आहे, पण त्याचबरोबर किनार्‍यालगत झालेली-होत असलेली विकासकामं आणि औद्योगिकीकरणाचा फटकाही मत्स्यव्यवसायाला बसला असल्याचं दिसतं. हा मुद्दा स्पष्ट करताना वरळी कोळीवाडा नाखवा मच्छीमार संघाचे विलास वरळीकर यांनी वांद्रे-वरळी सागरी पुलाचं बांधकाम इथल्या मत्स्यव्यवसायाच्या मुळाशी कसं आलंय याबाबत सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, ‘या पुलाच्या बांधकामासाठी समुद्रकिना-यालगत टाकलेल्या भरावामुळे समुद्र हटल्याने किनार्‍यालगतची मासेमारी ठप्प झाली. मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामांसाठी समुद्रकिना-यावर भराव टाकण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे समुद्र हटून त्याचं इतर भूभागांवर अतिक्रमण होत आहे.’ वरळी-वांद्रे पुलाच्या बांधकामामुळे माहीम कोळीवाड्यातल्या मच्छीमारांवर बेकारीची वेळ आल्याचं विलास वरळीकर सांगतात. माहीमच्या किना-यावर नुसत्या पडून असलेल्या बोटी याची साक्ष देतात.
माहीम कोळीवाड्यातल्या रवींद्र पाटील यांनी मुंबई महापालिका सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी माहीमच्या खाडीचा वापर करत असल्याने होत असलेल्या दुष्परिणामाकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, ‘यामुळे शिवल्या, कालव, चिंबोरी, मुडदुशी, शिंगाळी, निवटी, कोळंबी, वाकटी, रावस, पाकट, बोय, नाव्ही, टोळ, सरवट, खजुरा, लेपटी, भिलणा, मांदेली अशा विविध जातींच्या माशांचं आगर असलेला हा सागरी पट्टाच धोक्यात आला आहे. ’
मुंबईजवळ बॉम्बे हाय क्षेत्रात खनिज तेलाचे साठे सापडल्यानंतर ओएनजीसीने इथे खनिज तेल प्रकल्पाची उभारणी केली. गेल्या तीन-चार दशकांत या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. बॉम्बे हाय आणि ठाणे जिल्ह्यात सुमारे साडेसातशे तेलविहिरी खोदण्यात आल्या आहेत. खनिज तेलासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशाकरता हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असला तरी त्यामुळे या पट्‌ट्यातल्या मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय सत्तरच्या दशकात ठाणे जिल्ह्यातल्या बोईसर-तारापूर या किनारपट्टीलगतच्या भागात औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात आल्याने इथे अनेक रासायनिक कारखान्यांची उभारणी झाली. याचाही फटका इथल्या मच्छीमारांना बसला आहे.
वसईमधील मच्छीमार समाजाचे नेते फिलिप चांदी यांनी या पट्‌ट्यातल्या मच्छीमारीच्या बिकट स्थितीचं चित्रच समोर मांडलं. ते म्हणाले, ‘ठाणे जिल्ह्यात उत्तन, वसई ते झाई तलासरी या 80 कि.मी.च्या पट्‌ट्यातल्या 35 गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. इथल्या मच्छीमारांची लोकसंख्या सुमारे दोन लाख इतकी आहे. इथली सुमारे 40 हजार कुटुंबं प्रत्यक्ष मासेमारी करतात, तर आणखी 40 हजार कुटुंबं मासेमारीशी संबंधित व्यवसायांत आहेत. 3 हजार 500 यांत्रिक व 500 बिगरयांत्रिक अशा एकूण 4 हजार बोटींतून मासेमारी व्यवसाय चालतो. प्रत्यक्ष मासेमारी, माशांचं वर्गीकरण करणं, मासे सुकवणं, खारवणं व त्यांची विक्री करणं, असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. या व्यवसायाला पूरक असे बर्फ उत्पादन, वाहतूक, बोटींची देखभाल-दुरुस्ती असे व्यवसाय आहेत. या व्यवसायांमधले सारेजण एकमेकांवर अवलंबून आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही या व्यवसायात आहेत. इथल्या कुटुंबांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 25 हजार रुपये इतकं आहे. मात्र या पट्‌ट्यातल्या औद्योगिकीकरणाची झळ या कुटुंबांना बसत आहे. रासायनिक कारखान्यांमधून प्रदूषित पाणी समुद्रात सोडलं जात असल्याने सुमारे 35 कि.मी. परिसरातली मासेमारी जवळजवळ संपुष्टात आली आहे. बॉम्बे हाय खनिज तेल प्रकल्पातून तेलाची वाहतूक होताना मोठ्या प्रमाणात तेलाची गळती होते. त्यामुळेही मत्स्यसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.
’महत्त्वाचं म्हणजे इथल्या खनिज तेल प्रकल्पामुळे मासेमारीवर बंधनं आली आहेत. या बंधनांमुळे मच्छीमारांची कोंडी झाली आहे. या संदर्भात फिलिप चांदी म्हणाले, ‘खनिज तेल- विहिरींपासून तीन कि.मी.च्या परिसरात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारीचं क्षेत्र मर्यादित झालंय. संरक्षित क्षेत्रात चुकून एखादी मच्छीमार बोट भरकटली तर ती पकडली जाते. बोटींवरच्या मच्छीमारांना जबर मारहाण होते. बोट कस्टमच्या ताब्यात जाऊन दंड भरल्याशिवाय तिची सुटका होत नाही. दंड भरण्यास उशीर झाला तर बोट कस्टममध्ये अडकून पडते. परिणामी, मच्छीमारांच्या पोटावरच गदा येते. ’

मुंबईप्रमाणेच कोकणच्या ज्या भागात औद्योगिकीकरण झालं आहे तिथे सागरी प्रदूषणाने मत्स्यव्यवसायाचा गळा आवळल्याचं दिसून येतं. रायगड जिल्हा औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचा शेजार आणि समुद्राची समीपता या गोष्टी इथे औद्योगिकीरणाच्या पथ्यावर पडल्या. सुरुवातीला पनवेल, पेण, उरण या उत्तरेकडच्या तालुक्यांत ही लाट आली. पुढे ती दक्षिणेकडे पसरली. या भागातल्या औद्योगिकीकरणाची झळ मत्स्यव्यवसायाला कशी बसत आहे या संदर्भात वडखळजवळच्या डोलवी गावात उभ्या राहिलेल्या इस्पात या मोठ्या उद्योगाचं उदाहरण बोलकं आहे. 1991 मध्ये उभारणीला सुरुवात झालेला हा प्रकल्प 2000 साली पूर्ण कार्यान्वित झाला, तर 2003मध्ये या कारखान्यात विद्युत प्रकल्प सुरू झाला. डोलवी गावातली जमीन विकत घेऊन हा कारखाना उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा या भागात येणार्‍या अनेक कारखान्यांपैकी हा एक, असाच स्थानिकांचा समज झाला. सुरुवातीला कारखान्याच्या बांधकामात अनेकांना वेगवेगळी कंत्राटं मिळाली. शेकडो स्थानिक मजुरांना रोजगार मिळाला. पैसेही चांगले मिळाले. सगळ्यांच्या तोंडी विकासाकडे वाटचाल सुरू झाल्याची भाषा होती. पुढे कारखान्याने इथे स्वतंत्र धक्का (जेट्टी) बांधला. याच धक्क्यावरून कारखान्यापर्यंत एक फिरता पट्टा (कन्व्हेयर बेल्ट)ही बांधला गेला.
हे बांधकाम पूर्ण झालं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं, की धरमतर खाडीतून वाहून आणलेला कच्चा माल उतरवण्यासाठी हा स्वतंत्र धक्का बांधण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच 3000 ते 3500 टन लोखंड वाहून आणणार्‍या मोठ्या बोटी (बार्जेस) धरमतर खाडीत दाखल झाल्या. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला तेव्हा 35,000 टनांच्या अजस्र बोटी न्हावाशेवा बंदरात दाखल होऊ लागल्या आणि त्यांनी आणलेलं खनिज लोखंड बार्जेसमधून धरमतर धक्क्यावर येऊ लागलं. या बोटींबद्दल कारखान्याने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा सरकारनेही कोणती अधिसूचना काढली नव्हती असं इथले मच्छीमार सांगतात. बोटी येण्यास सुरुवात झाल्यावर मच्छीमारांनी खाडीच्या मध्यभागी लावलेली जाळी तटातट तुटली. रोजच बोटींची ये-जा सुरू झाल्याने तिथे जाळी लावणं मच्छीमारांना अशक्य झालं. या खाडीतली मासेमारी प्रामुख्याने मधल्या खोल भागात चालायची. तिथे डोल लावणं अशक्य झालं. शिवाय या महाकाय बोटींसमोर छोट्या बोटींतून मासेमारी करायला जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं. त्याचप्रमाणे बोटींच्या प्रचंड आवाजांमुळे माशांचे कळप दूर जाऊ लागले. खाडीत मासळी येणं बंद झालं आणि इथल्या मत्स्यव्यवसायाला ग्रहण लागलं.
लोटे परशुराम हे कोकणातलं औद्योगिकीकरण झालेलं आणखी एक महत्त्वाचं केंद्र. इथे प्रामुख्याने रासायनिक उद्योग आहेत. रासायनिक प्रक्रियेतून निर्माण होणारं सांडपाणी दाभोळ खाडीत सोडलं जातं. या औद्योगिक वसाहतीच्या पश्र्चिमेलाच दाभोळ खाडी आहे. खेड, चिपळूणपर्यंत पसरलेल्या या खाडीची लांबी सुमारे 40 ते 50 कि.मी. आहे. या खाडीच्या किनार्‍यावरील अंजनवेल, वेलदूर, नवानगर, धोपावे, ओणनवसे, दाभोळ अशा 42 गावांत मच्छीमारांच्या वस्त्या असून त्यांना ‘भोई’ असं म्हणतात. जवळपास 300 छोट्या-मोठ्या बोटींमधून खाडीत डोली लावणे, पागणे, जाळी लावणे, वान धरणे इ. प्रकारांनी मासेमारी केली जाते. मासेमारी हाच या किनार्‍यावरील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सागरी प्रदूषणाचा या व्यवसायावर काय परिणाम झाला आहे हे पाहण्यासाठी थेट दाभोळ गाठलं.
डोरसेवाडीतल्या मच्छीमार सोसायटीच्या कार्यालयावर पोहोचल्यावर समजलं की सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ पालशेतकर दाभोळकरवाडीत आहेत. तिथे पोहोचले तेव्हा तिथल्या किनार्‍यावरच एका झाडाखाली सोसायटीचे अध्यक्ष आणि काही मच्छीमार बोलत बसले होते. पालशेतकर म्हणाले, ‘लोट्यात उभ्या राहिलेल्या या केमिकल कंपन्यांनी आमच्या दाभोळ खाडीची पार वाट लावलीय. या खाडीच्या मुखाजवळच (करंबवणे गावी) एम.आय.डी.सी.च्या पाइपलाइनद्वारे कारखान्यांचं संकलित होणारं सांडपाणी सोडलं जातं. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे ओहोटीच्या वेळी हे पाणी समुद्रात 12 ते 15 वावपर्यंत जाऊन मिळतं. या पाण्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाचा परिणाम माशांच्या प्रजननशक्तीवर होऊन आता खाडीत मासळीच मिळेनाशी झालीय. कंपन्यांनी समुद्रात पाणी सोडायला सुरुवात केली की पुढचे 8-10 दिवस परिस्थिती खूपच बिघडते. खाडीत मेलेली मासळी दिसू लागते. त्यामुळे गि-हाईक मासळी विकत घेत नाहीत. यात मच्छीमारांचं मरण होतं. मिळेल त्या भावात मासळी विकण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. दाभोळ खाडीकिनार्‍यावरील सर्व मच्छीमार वस्त्यांची अवस्था अशीच आहे.’
माशांवर प्रदूषणाचा नेमका दुष्परिणाम काय होतो, या प्रश्नावर इथल्या मच्छीमारांनी सांगितलं, की ‘माशांवर डाग पडतात, मासे शेपटीकडून सडतात, काही वेळा माशांना रसायनाचा वास येतो, ते खाल्ल्यावर बेचव लागतात व पोटाचं आरोग्य बिघडतं. प्रदूषणाने मासे भोवळ आल्यासारखे गरगर फिरतात व मरतात. अशी मेलेली मच्छी आम्ही जिल्ह्याधिकार्‍यांना अनेकदा नेऊन दाखवली, त्याबद्दल जाब विचारला. मात्र संबंधितांवर योग्य त्या कारवाईच्या कोरड्या आश्वासनापलीकडे काहीच घडत नाही. शासनाच्या अशा दुर्लक्षामुळे आज खाडीत स्थिर जाळी लावून मासेमारी करणं अगदीच अशक्य बनलंय. ’
गेल्या 10-15 वर्षांत दाभोळ खाडीच्या किना-यावर मेलेल्या माशांचा खच पडणं हे नित्याचंच होऊन गेलंय. आपल्या सागरी पिकाची अशी नासधूस होताना पाहून गप्प बसणं मच्छीमारांना शक्य नव्हतं. त्यांनी संघटित होऊन ‘दाभोळ खाडी परिसर बचाव समिती’ स्थापन केली. समितीने आवाज उठवला तेव्हा कुठे शासनाने पुढाकार घेऊन ‘लोटे एनव्हायर्नमेंट प्रोटेक्शन कमिटी’ स्थापन केली. तिच्या माध्यमातून पाणी प्रदूषणविरहित करणारा सीईटीपी प्लान्ट उभारण्यासाठी हालचाल सुरू झाली. केंद्र शासन, राज्य सरकार व एमआयडीसी यांनी 2 कोटींचा निधी उभारून 2000 साली हा प्लान्ट कार्यान्वित केला. त्यानंतर काही काळ मासे मरण्याचं प्रमाण कमी झालं. पण नंतर लोट्यात रासायनिक कंपन्यांची जशी वाढ होत गेली तशी या प्लान्टची क्षमता तोकडी पडत गेली. पाणी प्रदूषणविरहित होण्याची प्रक्रियाच ठप्प झाली. मासे मरण्याचं प्रमाण पुन्हा वाढलं. मच्छीमारांनी त्याविरोधात ओरड करायची, मग सरकारने काही तरी थातुरमातुर कारवाई केल्याचं भासवायचं, असंच चालू आहे. प्रत्यक्षात या प्रश्नावर आजपर्यंत ना शासन काही ठोस उत्तर शोधू शकलंय, ना त्याला कारणीभूत असणा-या रासायनिक कंपन्या. दाभोळ खाडी परिसर बचाव समितीने शासन, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्वांशी अनेकदा चर्चा करून तसंच प्रदूषणविरोधात ठोस पावलं उचलावीत, असा आग्रह धरूनही उपयोग झालेला नाही.
समितीचे लोक म्हणतात, की ‘आमचा इथल्या औद्योगिकीकरणाला विरोध नाही; पण इथल्या कंपन्यांमधून जे प्रदूषित पाणी खाडीत सोडलं जातं ते मासे जिवंत राहतील अशा स्थितीत आणून सोडावं, एवढीच रास्त अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही अनेकदा बायो-ऍसिटेसचा पर्याय सरकारला सुचवला; पण त्यालाही नेहमीप्रमाणे फाटे फोडण्यात आले. या परिसरातल्या मच्छीमारांचं मरणच सरकारला अपेक्षित आहे का? ’


दाभोळ खाडीत मासेमारी करता येत नसल्याने आता रेतीउपशाचं काम जोरात सुरू आहे. त्यासाठी मुंबईपासून गुजरापर्यंतचे लोक इथे येतात. त्यामुळे इथल्या लोकांना त्यातही फारसं स्थान उरलेलं नाही, याकडे समितीचे अध्यक्ष बाबा भालेकर लक्ष वेधतात. ते म्हणाले, ‘पूर्वी इथला मच्छीमार मासेमारी करून वेळ मिळेल तेव्हा पाण्यात बुडी मारून रेती काढायचा आणि त्याच्या विक्रीतून दोन-चार पैसे कमवायचा. पण आता बुडी मारून रेती काढायला गेलं तर डोळ्यांची आग होते, शरीराला खाज सुटते. कारण खाडीतील प्रदूषण. त्यामुळे काही वर्षांपासून यांत्रिक पद्धतीने खाडीतून रेती काढली जाते. त्यात बड्या मंडळींचं वर्चस्व अधिक आहे. वाळू वाहून नेण्यासाठी त्यांची बार्जेस इथे आली की स्थानिक मच्छीमारांना अजिबात जाळी लावता येत नाहीत. दाभोळ खाडीचं पुनर्निर्माण करायचं ठरवलं, तरी त्यासाठी जी 5-10 वर्षं लागतील तोपर्यंत वाळू उत्खननात, वाळू वाहतुकीत मच्छीमार सहकारी सोसायट्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पण तसं न करता उपशाचे अधिकार भलत्या मंडळींनाच दिले जात आहेत. त्यामुळे मच्छीमारांचा रोजगार मिळवण्याचा हा पर्यायही सरकार ओरबडून घेत आहे. अशा परिस्थितीत मच्छीमारांचा टिकाव लागायचा तरी कसा? ’
औष्णिक व आण्विक ऊर्जा प्रकल्पांचं संकट
औद्योगिकीकरणातून होत असलेल्या सागरी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या मत्स्यदुष्काळाचा सामना करत असताना कोकणातल्या मच्छीमारांना कोकणात मोठ्या संख्येने उभारण्यात येणा-या औष्णिक व आण्विक ऊर्जा प्रकल्पांच्या संभाव्य दुष्परिणामांची चिंता भेडसावत आहे.
महाराष्ट्राची सध्याची तीव्र वीजटंचाई सर्वपरिचित आहे. विजेची सध्याची परिस्थिती व भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन वीज उत्पादनक्षेत्रात खासगी गुंतवणुकीला वाव देण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेलं आहे. नव्या वीज प्रकल्पांसाठी कोकणाला प्राधान्य देण्यात आलेलं असून, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जवळपास 11 प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी बहुतांश प्रकल्प कोळसा व नैसर्गिक वायू या इंधनांवर (औष्णिक) आधारित आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील प्रकल्प अणुइंधनावर आधारित आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प न्युक्लइर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) या सरकारी उपक्रमाद्वारे उभारण्यात येणार आहे. दापोली, गुहागर, जयगड, रनपार, देवगड, धाकोरे आदी ठिकाणच्या औष्णिक वीज प्रकल्पांच्या उभारणीचं काम सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. दाभोळचा रत्नागिरी गॅस ऍन्ड पॉवर लिमिटेडचा प्रकल्प (पूर्वीचा एन्रॉन) आधीपासूनच अस्तित्वात आहे, तर जयगडचा जिंदाल समूहाचा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे.
इतके सारे वीज प्रकल्प कोकणातच का, असा प्रश्र्न सहज पडू शकतो. याचं कारण असं, की औष्णिक प्रकल्पांसाठी दगडी कोळसा, नैसर्गिक वायू असं इंधन वापरलं जातं. भारतात उपलब्ध असलेला दगडी कोळसा कमी प्रतीचा असल्याने औष्णिक प्रकल्पांकरता दगडी कोळशाची आयात करणं भाग आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या बाबतीत तर भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवरच अवलंबून आहे. साहजिकच या कच्च्या मालाच्या आयातीसाठी कोकणचा समुद्रकिनारा सोयीचा आहे. आयात केलेल्या मालावरच्या अंतर्गत वाहतूक व इतर अनुषंगिक खर्चांची बचत करायची तर कोकणात किनारपट्टीच्या भागात प्रकल्प उभारणं सोयीचं ठरू शकतं. याच विचारातून कोकणात वीजप्रकल्पांचा घाट घातला गेला आहे, असं कोकणवासीयांचं मत बनलं आहे.
राज्याची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी कोकण किनारपट्टीचा विचार करताना कोकणची नैसर्गिक साधनसंपदा व त्यावर अवलंबून असलेली कोकणवासीयांची उपजीविका यांचा विचार केला गेलेला नाही, असं कोकणवासीयांना वाटतं. औष्णिक वीज प्रकल्पांतून तयार होणा-या फ्लाय ऍशचा कोकणातल्या फलोत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच या प्रस्तावित वीज प्रकल्पांना ठिकठिकाणी विरोध होत आहे. या वीज प्रकल्पांमधलं उच्च तापमानाचं पाणी समुद्रात सोडलं जाणार असल्याने सागरी जैवसंपदेची हानी होऊ शकते. त्यामुळे कोकणातील मच्छीमारांचाही या प्रकल्पाला विरोध आहे.
या संदर्भात रत्नागिरीतील मच्छीमार संघर्ष कमिटीचे उपाध्यक्ष दादा मयेकर यांची भेट घेतली. जयगडमधील जिंदाल उद्योगसमूहाच्या औष्णिक वीज प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायाचं कसं नुकसान होत आहे याचा ऊहापोह त्यांनी केला. ते म्हणाले, ‘प्रकल्पाचं जवळजवळ 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. जयगडमध्ये धामणखोल नावाचं अति सुरक्षित बंदर आहे. या बंदराचा बेसलाइन स्टडी न करताच जिंदाल कंपनीने या ऊर्जा प्रकल्पासाठी लागणारा कोळसा उतरवण्यासाठी धामणखोल बंदर बुजवत जेट्टी उभारण्यास सुरुवात केली. या बंदरात 25 हजार मच्छीमार गिलनेटच्या साहाय्याने मासेमारी करतात. या ठिकाणी पूर्वी जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत असे. आता मात्र यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ’
याचं कारण सांगताना ते म्हणाले, ‘जेट्टी उभी करताना जो 40 हजार लाख मेट्रिकटन गाळ निघाला तो किनारी टाकावा किंवा 50 फॅदमच्या बाहेर टाकावा, असा सल्ला मत्स्य महाविद्यालयाने दिला होता. पण कंपनीने छुप्या मार्गाने 12 फॅदममध्येच गाळ टाकला. त्यामुळे 25 चौ. कि.मी. मच्छीमारी ग्राऊंड नष्ट झालं. तसेच मच्छीमारांच्या जाळ्यात आतापर्यंत कधी न येणारे दगड गोटे, चिखल येऊ लागलाय. यामुळे जाळी फाटून त्यांना नुकसान सोसावं लागतंय. कंपनीने गाळ टाकल्याने या वर्षी रत्नागिरी ते जयगड या पट्टीत शेवाळं साचलंय. परिणामी, माशांचा दुष्काळ निर्माण होऊन मासेमारी थांबलीय. आता ही परिस्थिती सुधारायचं म्हटलं तरी 9-10 वर्षं लागतील, आणि याला जबाबदार फक्त जिंदाल प्रकल्प आहे. मेरीटाइम बोर्डाने कंपनीला गाळ टाकण्यासाठीचे निकष कटाक्षाने पाळायला सांगितले असते तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.’
‘जिंदालच्या प्रकल्पाकरता धामणखोल बंदरात अमेरिका, ऑस्ट्रेलियातून मोठमोठ्या बोटी कोळसा घेऊन यायला सुरुवात झाली असून, या बोटींमधून माल उतरवताना कोळशाची राख समुद्रात मिसळून प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली आहे. या प्रदूषणामुळे समुद्रातल्या मत्स्यसाठ्यावर परिणाम होणार आहेच, पण कोकणातली फळशेतीही धोक्यात येणार आहे, याकडे लक्ष वेधत या प्रकाराबद्दल पर्यावरणवादी मंडळीही गप्प बसली आहेत’, अशी खंत मयेकरांनी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात उभारण्यात येणा-या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी माडबन व इतर काही गावांतील जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या संभाव्य धोक्यांबाबत बरीच उलट-सुलट चर्चा आतापर्यंत झाली आहे. अलीकडेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला काही अटींवर परवानगी दिली आहे. हा प्रकल्प मच्छीमारांकरता संकट ठरणार आहे, असं मयेकर म्हणतात. ते म्हणाले, ‘जगातील सर्वांत मोठ्या म्हणजे तब्बल 10,000 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातून दर सेकंदाला 6 लाख लिटर या प्रमाणात उच्च तापमानाचं पाणी समुद्रात सोडलं जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढून सागरी जीव नष्ट होणार, हे उघडच आहे. आण्विक किरणोत्सर्गाचे परिणाम औष्णिक ऊर्जा प्रकल्पांपेक्षाही भयंकर असतील. यासाठी जगभरातील उदाहरणं समोर आहेत. तरीही हा प्रकल्प आमच्या माथी मारला जात आहे.’
जैतापूर प्रकल्पाच्या परिसरातील साखरीनाटे या गावातील मच्छीमारांचे प्रतिनिधी अमजद बोरकर यांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘या प्रकल्पाच्या दक्षिणेला विजयदुर्ग खाडी आहे आणि उत्तरेला जैतापूर खाडी आहे. साखरीनाटे हे गाव या दोन्ही खाड्यांच्या मध्यावर आहे. राजापूर तालुक्यात सुमारे 15 हजार मच्छीमार आहेत. सुमारे दोन हजार कुटुंबं मच्छीमारीवर अवलंबून आहेत. गिलनेट, ट्रॉलर व पर्सिनेटच्या साहाय्याने इथे मासेमारी चालते. एकीकडे सरकार मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी मच्छीमारांना अनुदान, कर्ज व सवलती देते आहे; पण दुसरीकडे असे प्रकल्प इथे आणून इथल्या मासेमारीलाच फास लावत आहे. ’
देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी ऊर्जा प्रकल्प आवश्यक आहेत, पण ते इथे आणल्याने समुद्रावरच जगणा-या मच्छीमारांच्या पोटावर पाय येणार आहे, हाच सूर सर्वसामान्य मच्छीमारांशी बोलताना आढळून आला.
उपेक्षेचे धनी
मत्स्यदुष्काळाच्या प्रत्यक्ष आणि संभाव्य संकटाने मत्स्यव्यवसायाला आणि पर्यायाने मच्छीमारांना कसं घेरलं आहे हे आत्तापर्यंतच्या विवेचनातून स्पष्ट होऊ शकतं. वेगवेगळ्या मार्गांनी समुद्रावर आणि सागरी किनार्‍यांवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे मच्छीमारांची उपजीविका धोक्यात आली आहे; मात्र त्याची जाणीवपूर्वक दखल शासनाकडून घेतली गेलेली नाही, असं मच्छीमार समाजाच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. किंबहुना, मच्छीमारांच्या वाट्याला सातत्याने उपेक्षाच आली आहे, परंपरेने हा व्यवसाय करणार्‍या लोकांच्या जगण्या-मरण्याशी शासनाला काही देणं-घेणं उरलेलं नाही, असंच मच्छीमारांचं मत बनलं आहे.
मच्छीमारांच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या काही योजना आहेतही. या योजनांचा रोख प्रामुख्याने मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे आहे. उदाहरणार्थ, मच्छीमारांना व त्यांच्या सहकारी संस्थांना बोटींचं यांत्रिकीकरण-आधुनिकीकरण, मासळीच्या सुरक्षित साठवणीकरता शीतगृहांची उभारणी, मासळीच्या जलद वाहतुकीकरता वाहनखरेदी इ. कारणांसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध केलं जातं. राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग केंद्राच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी)च्या मदतीने अर्थसाहाय्याच्या विविध योजना राबवत असतो, मात्र योजना आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठं अंतर दिसून येतं.
शासनाच्या उदासीनतेमुळे मच्छीमारांना आज विपन्नावस्थेत जगावं लागतंय, असं महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांचं म्हणणं आहे. या संदर्भात माहिती देताना ते म्हणाले, ‘राज्याच्या 53 हजार कोटींच्या अर्थसंकल्पात 0.5 टक्केसुद्धा रक्कम मत्स्यव्यवसायाच्या वाट्याला येत नाही हे मोठंच दुर्दैव आहे. मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरता मच्छीमारांना अर्थसाहाय्यासाठी केंद्राच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 80 टक्के निधी राज्य सरकारला मिळतो. 10 टक्के निधी लाभ घेणार्‍या गटाचा असतो. म्हणजे राज्याने द्यायचा निधी केवळ 10 टक्के आहे, पण गेल्या दोन वर्षांपासून शासनाला ही 10 टक्के रक्कमही आम्हाला देता आलेली नाही. त्यामुळे यांत्रिक नौकेचे 288 प्रस्ताव, बर्फ कारखान्यांचे 6 प्रस्ताव आणि इतर 18 प्रस्ताव मंजूर होऊनदेखील तसेच पडून आहेत. या वर्षीचे नवे प्रस्ताव वेगळेच. यासाठी राज्य सरकारकडे निधीचा अभाव असल्याचं कारण सांगितलं जातंय. भविष्यात कधी काळी हा निधी मच्छीमारांना मिळालाच, तरी दरम्यानच्या काळात प्रकल्पखर्चात जी वाढ होईल त्यासाठी मच्छीमारांनी पैसा कुठून आणायचा? एकीकडे ‘निधी नाही’ असं कारण मच्छीमारांना दिलं जातं, मात्र साखर कारखानदारीकरता सढळ हाताने निधी उपलब्ध केला जातो. सहकारी साखर कारखानदारीएवढी क्षमता मत्स्यव्यवसायातही आहे, तरीही सरकारचा मत्स्यव्यवसायाप्रतीचा दृष्टिकोन उदासीन आहे.’

महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ हा मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मच्छीमार सहकारी संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. संघाचं मुख्यालय मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईत असून, तिथे ताजी मासळी विभाग, डिझेल-तेल विभाग, औद्योगिक माल पुरवठा विभाग, मत्स्यबीज विभाग, सुकी मासळी विभाग, बर्फ विभाग असे सहा विभाग आहेत. शासकीय निधीअभावी हे विभाग कसे निष्क्रिय ठरत आहेत, हे रामदास संधे निदर्शनास आणून देतात.
‘काही वर्षांपूर्वीच संघाने एनसीडीसीअंतर्गत प्रतिदिन 100 टन उत्पादनक्षमतेचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प तळोजा एमआयडीसीत सुरू केला. या प्रकल्पासाठी शासनाकडून 2 कोटी 54 लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आलं. प्रत्यक्षात पहिल्या हप्त्यापोटी फक्त 63 लाख रुपये संघाला उपलब्ध झाले. एमआयडीसीच्या नियमाप्रमाणे 3 वर्षांच्या आत प्रकल्प कार्यान्वित होणं बंधनकारक असल्याने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 70 ते 80 लाख रुपये आम्ही पदरचे घातले, बँकेच्या कर्जातून 1 कोटी रुपये उभे केले आणि प्रकल्प कसाबसा पूर्ण केला. मात्र त्यात 3 वर्षं 3 महिने इतका कालावधी गेला. पुढे उद्घाटनासाठी मंत्र्यांची वेळ न मिळाल्याने आणखी 3 महिने वाढले. या 6 महिन्यांची 27 लाख रुपये पेनल्टी एमआयडीसीने आमच्यावर लावली. ही आहे शासनाची आमच्याबाबतची भूमिका.’
ही झाली मत्स्यव्यवसायाच्या, पर्यायाने मच्छीमारांच्या विकासासाठी सरकारकडून अपेक्षित असलेल्या अर्थसाहाय्याची कथा! मत्स्यव्यवसायाच्या वृद्धीसाठी बंदरांचा विकास करण्याच्या बाबतीतही शासनाची उदासीनता समोर येते. या बाबतीत मोठाच विरोधाभास दिसतो. एकीकडे कोकणातले औद्योगिक कारखाने, खाणी यांच्या मालवाहतुकीच्या सोयीसाठी, तसंच औष्णिक वीज प्रकल्पांकरता लागणा-या आयातीत कोळशाच्या वाहतुकीकरता सरकारी व खासगी भागीदारीतून (पीपीपी) नव्या बंदरांच्या उभारणीकरता तत्परता दाखवली जात आहे, मात्र मच्छीमारांच्या बंदरविकासाच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे.
मुंबईच्या वेसावे कोळीवाड्याला 500 वर्षांची परंपरा आहे. इथल्या 550 लहान-मोठ्या बोटी समुद्रात मासेमारी करतात. वारंवार मागणी करूनही अद्याप तिथे साधी जेट्टी किंवा बंदर उभं राहू शकलेलं नाही. वेसावेतील माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या नेतृत्वाखाली 1971-72 च्या सुमारास मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्या वेळी वेसाव्यात बंदर उभारण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, आजतागायत सरकारकडून त्याची पूर्तता होऊ शकलेली नाही. वरळी कोळीवाड्यातही अशीच स्थिती असून तिथे साधा धक्कासुद्धा नाही. नायगाव कोळीवाड्यातही बोटींच्या संख्येच्या मानाने जेट्टी अपुर्‍या आहेत. विजेची अपुरी व्यवस्था, शौचालयांचा अभाव या गोष्टी तर जवळपास प्रत्येक बंदराच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. मुंबईतच बंदरांच्या विकासाची अशी बोंब आहे, तर कोकणाची काय कथा?
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली (दाभोळ), गुहागर (बुरुंडी), रत्नागिरी (मिरकरवाडा), राजापूर (रत्नागिरी) या किनारपट्टीवर वसलेल्या तालुक्यांतील बंदरं मासेमारीची प्रमुख केंद्रं आहेत. या बंदरांना सह्याद्रीत उगम पावलेल्या नद्या येऊन मिळाल्याने त्यांच्या खाडीत मासेमारी चालते. ही मासेमारी सुमारे 40 वाव खोल पाण्यात चालते. रत्नागिरी जिल्ह्यात 49 ठिकाणी मासळी केंद्रं आहेत, पण रत्नागिरी वगळता दुसरं विकसित असं मच्छीमार बंदर नाही. रत्नागिरीच्या मिरकरवाडा मच्छीमारी बंदरावर शासनाने सुमारे 18 कोटी रुपये खर्च करून बोटींसाठी धक्के, मासळी उतरवण्यासाठी मोठे कट्टे, मार्गदर्शक स्तंभ, जोडरस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा इ. मूलभूत सुविधा उभारल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत मिरकरवाडा बंदरात इतका गाळ साठला आहे, की बंदरातून समुद्रात येण्या-जाण्याचा मार्ग पूर्ण घेरला गेला आहे. त्यामुळे भरती-ओहोटीची वेळ ठरवून मच्छीमारांना समुद्रात ये-जा करावी लागते. अनेकदा ट्रॉलर गाळात रुतण्याचे प्रकारही घडतात. या संदर्भात दादा मयेकर म्हणाले, ‘रत्नागिरीसाठी 2-4 कायमस्वरूपी ड्रेझर आणणार असल्याचं कित्येक वर्षं आम्ही फक्त ऐकत आहोत. बंदरांतील गाळाच्या उपशाची मच्छीमारांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय.’
गुहागर परिसरात बो-या हे बंदर आहे, मात्र या बंदरात पुरेशा सुविधा नाहीत. वादळी हवामान असल्यास सुरक्षेसाठी इथल्या मच्छीमारांना आपल्या बोटी जयगड बंदरात न्याव्या लागतात. 2009च्या फयान चक्रीवादळात इथल्या मच्छीमार बोटींचं व जाळ्यांचं अतोनात नुकसान झालं. 15 मच्छीमारांना आपले प्राण गमवावे लागले. हेदवी, साखरी आगार, वेळणेश्वर, वेळणेश्वर पाटी, कोंडकारूळ, बो-या, बुधल व पालशेत या सागरकिनार्‍याच्या आठ गावांकरता हे मध्यवर्ती बंदर आहे. इथे सुसज्ज असं मोठं बंदर बांधण्याची इथल्या मच्छीमार बांधवांची मागणी 1989 पासून दुर्लक्षित आहे, अशी माहिती दाभोळ येथील मच्छीमार विश्वनाथ दाभोळकर यांनी दिली. ते ही माहिती देत असताना त्रिकोणी लुंगी, चट्‌ट्यापट्‌ट्याचा टी-शर्ट आणि डोक्यावर गोंड्याची टोपी असा कोळ्याचा टिपिकल वेश असलेले पंढरी रामा दाभोळकर सांगू लागले, ‘गेली कित्येक वर्षं आम्ही इथं जेट्टी हवी अशी मागणी करतोय, पण अजून ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे इथल्या प्रवासी जेट्टीचा आधार घेत आम्हाला बोटीतून मासळी उतरवावी लागते. संध्याकाळी धक्क्यावर फेरीबोट उभी असेल तर आम्हाला पाण्यातच नांगर टाकून छोट्या होड्यांच्या मदतीने मासळी उतरवणं आणि तेल (डिझेल), पाणी बोटीवर चढवण्याची ‘डबल कसरत’ करावी लागते. कधी कधी बोटीवरून मासे उतरवताना ते लाटांच्या माराने वाहून जातात. आधीच मासळी नाही. थोडीफार मिळते ती पण अशी पाण्यात जाते.’
सरकार मच्छीमारांच्या तोंडाला कशी पानं पुसतंय याचं उदाहरण एकनाथ पालशेतकर यांनी दिलं. ते म्हणाले, ‘दहा वर्षांपूर्वी दाभोळमध्ये केंद्र सरकारतर्फे एक सर्व्हे करण्यात आला. जेट्टी, मच्छी मार्केट, बोटी बाहेर काढणं, दुरुस्त करणं, जाळी सुकवणं, जाळी विणणं याच्यासाठी किमान सुविधा उपलब्ध करून देणं अशा बहुउपयोगी प्रकल्पाच्या उभारणीकरता हा सर्व्हे करण्यात आला होता. मी स्वत: त्यासाठी जागा दाखवली. पण हा सर्व्हे म्हणजे निव्वळ देखावाच ठरला. पुढील कार्यवाहीसाठी अद्याप इथं कोणीही फिरकलेलं नाही. स्थानिक आमदार, खासदारांच्या हे वेळोवेळी निदर्शनास आणूनही त्यांच्याकडून जो पाठपुरावा व्हायला हवा तो झालेला नाही.’
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील आनंदवाडी बंदराचा प्रस्ताव 1978 चा आहे, पण आजही त्याचं काम सुरू झालेलं नाही. मालवण तालुक्यातही हीच स्थिती आहे. येथील तारकर्ली नदीचा बहुतांश भाग गाळाने बुजत चालला असून, खाडीच्या पात्रात साचलेल्या गाळामुळे छोट्या छोट्या होड्यांचा तळभाग घासला जाऊन त्या निकामी बनत चालल्या आहेत.
2009-10 या आर्थिक वर्षात 4 लाख 15 हजार 767 मेट्रिक टन मत्स्योत्पादन झालं. यातील 1 लाख 31 हजार 667 मेट्रिक टन मासळी परदेशात निर्यात करण्यात आली. महाराष्ट्राला 720 कि.मी. चा सागरकिनारा लाभला आहे व सुमारे 1 लाख 12 हजार चौ. कि.मी. सागरी क्षेत्र मासेमारीसाठी उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेतली तर राज्याच्या मत्स्यव्यवसायाची क्षमता किती मोठी आहे हे लक्षात येऊ शकतं. सध्या राज्याचं सरासरी वार्षिक सागरी उत्पादन 4 लाख मे. टन आहे. मच्छीमार व मत्स्यव्यवसायाला सक्षम करण्यावर भर दिला तर आज आहे त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने संपत्ती निर्माण होऊ शकते; पण दुर्दैवाने या व्यवसायाच्या व तो करणा-या मच्छीमारांच्या वाट्याला उपेक्षाच आल्याचं दिसतं.
या संदर्भात रामभाऊ पाटील म्हणाले, ‘राज्याची मत्स्योत्पादनाची प्रचंड क्षमता लक्षात घेता राज्याच्या मंत्रिमंडळात मत्स्यव्यवसायासाठी किमान स्वतंत्र खातं तरी असायला हवं; पण प्रत्यक्षात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय यांची एकत्र मोट बांधली आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाची माहिती असलेल्यांना मत्स्यव्यवसायाविषयी सखोल माहिती असतेच असं नाही. त्यामुळे या व्यवसायाच्या, समाजाच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन होत नाही. मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता, मच्छीमारांच्या सक्षमीकरणाकरता स्वतंत्र पॅकेज, स्वतंत्र योजना व एक उद्योग म्हणून या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अशी तिहेरी सांगड घालून नियोजन व्हायला हवं.’
संघटन व सहकाराचा अभाव
मच्छीमारांच्या आजच्या बिकट स्थितीला शासनाची उदासीनता आणि सातत्याने होत असलेली उपेक्षा ब-याच प्रमाणात कारणीभूत आहे, हे खरं असलं, तरी यासाठी हा समाजदेखील जबाबदार आहे. या समाजात संघटनाचा अभाव ठळकपणे दिसून येतो. महाराष्ट्राच्या समुद्रकिनार्‍यावर परंपरेने मासेमारी करणारी महादेव कोळी ही जात. याशिवाय सोनकोळी, खारवी, माच्छी, भितना, बारी, वैती, गावीत अशा बारा जातींचे आणि ख्रिश्चन व मुस्लिम या धर्मांचे कोळी हा व्यवसाय करतात. मच्छिमार समाजात या सर्वांचा समावेश होतो, पण त्यांच्यामध्ये एकवाक्यता आढळत नाही, हे या समाजाचे धुरीणही मान्य करतात. मच्छीमारांमधल्या वेगवेगळ्या घटकांचं संघटन कमी पडतं, हे हा समाज उपेक्षित राहण्याचं एक प्रमुख कारण आहे. संघटनाच्या अभावी हा समाज राजकीय, सामाजिक व आर्थिक लाभ मिळवू शकत नसल्याची खंत अनेकजण व्यक्त करतात. मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील म्हणाले, ‘मच्छीमार समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणू शकेल व सार्‍या समूहाचे प्रश्र्न उचलून धरू शकेल असं वजनदार नेतृत्व या समाजाकडे नाही, त्यामुळे या समाजाचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाही.’ आपली ताकद एकवटण्यात हा समाज कमी पडत असेल तर सरकारला तरी दोष कसा द्यायचा, असा प्रश्र्न या समाजातले धुरीण विचारतात.
‘सहकारातून विकास’ हे तत्त्व मच्छीमारांपर्यंत पोहोचलं आहे, पण ते रुजू शकलेलं नाही. मत्स्यव्यवसायाला स्थिरता लाभावी, मत्स्योत्पादनात वाढ व्हावी, दलाल व व्यापार्‍यांकडून मच्छीमारांची फसवणूक होऊ नये, या उद्देशांतून राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांच्या सहकारी संस्था उभ्या राहण्यास प्रोत्साहन दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पहिली ‘कर्ला सहकारी मच्छीमार संस्था’ उभी राहिली. मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत मच्छीमारांच्या एकूण 405 सहकारी संस्था कार्यरत आहेत. सहकारी संस्थांच्या माध्यमातून मच्छीमारांना अर्थसाहाय्य देण्याचं धोरण शासन राबवतं. मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना यांत्रिक बोटींकरिता सवलतीत इंधन (डिझेल) पुरवता येऊ शकतं. त्यासाठी या संस्था आपल्या सभासदांकरता स्वतंत्र पंप चालवू शकतात. याशिवाय बोटबांधणी, यांत्रिकीकरण व जागांच्या खरेदीसाठी सहकारी संस्थांना 25 ते 50 टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य मिळू शकतं. यासाठी त्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. तथापि, सहकारीकरणातून पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीचा जसा विकास झाला तसा मत्स्यव्यवसायात होऊ शकलेला नाही.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमजद बोरकर याची कारणमीमांसा करताना म्हणाले, ‘मच्छीमारांचा सहकारावर विश्वास नाही आणि एकत्रित येण्याची त्यांची मानसिकताही नाही. एकूणच, कोकणाचा हा स्वभावधर्म आहे. त्यामुळे इथे सहकार रुजत नाही. सहकारी साखर कारखानदारीत ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत. साखर कारखान्यांवर त्यांचा संघटित दबाव आहे, त्यामुळे ते उसाला चांगला दर पदरात पाडून घेऊ शकतात. मत्स्यव्यवसायाचं तसं नाही. इथे मासेमारी करणारे वेगळे, मासळीवर प्रक्रिया करणारे वेगळे, मासळीची विक्री आणि निर्यात करणारे वेगळे, त्यामुळे मासळीला चांगला भाव मिळावा यासाठी मच्छीमार दबाव निर्माण करू शकत नाहीत.’

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमजद बोरकर याची कारणमीमांसा करताना म्हणाले, ‘मच्छीमारांचा सहकारावर विश्वास नाही आणि एकत्रित येण्याची त्यांची मानसिकताही नाही. एकूणच, कोकणाचा हा स्वभावधर्म आहे. त्यामुळे इथे सहकार रुजत नाही. सहकारी साखर कारखानदारीत ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत. साखर कारखान्यांवर त्यांचा संघटित दबाव आहे, त्यामुळे ते उसाला चांगला दर पदरात पाडून घेऊ शकतात. मत्स्यव्यवसायाचं तसं नाही. इथे मासेमारी करणारे वेगळे, मासळीवर प्रक्रिया करणारे वेगळे, मासळीची विक्री आणि निर्यात करणारे वेगळे, त्यामुळे मासळीला चांगला भाव मिळावा यासाठी मच्छीमार दबाव निर्माण करू शकत नाहीत.’
अमजद बोरकर यांनी स्वत: मच्छीमारांच्या मासळीला चांगला भाव मिळावा यासाठी सहकारी तत्त्वावर मार्केटिंग करण्याचा प्रयोग केला होता. हा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘या सहकारी संस्थेच्या माध्यमातून मच्छीमारांचा थेट निर्यातदारांशी समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही संस्थेमार्फत बोली लावण्यास सुरुवात केल्यावर सर्व दलाल एकत्र झाले आणि संस्थेपेक्षा जास्त रकमेची बोली लावण्यास त्यांनी सुरुवात केली. दलालांनी भाव वाढवले तरी ते तात्पुरतेच आहेत, हे मच्छीमारांना पटवण्याचा आम्ही प्रयत्न केला; तरीही ते आपला माल दलालांना विकून मोकळे झाले. संस्थेचा प्रयोग फसल्यानंतर दलाल पुन्हा पूर्वपदावर आले.’
मच्छीमारांमधील सहकारवृत्तीच्या अभावाचं हे एक बोलकं उदाहरण म्हणता येईल. मच्छीमार समाजाच्या पीछेहाटीचं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. पिढ्यान्‌पिढ्या मासेमारी करत आलेला कोळीबांधव आतापर्यंत मासे जाळ्यात कसे फसतात हे पाहत आलाय, पण आता तो स्वत:च समस्यांच्या जाळ्यात गुरफटत चालला आहे. त्यातले काही धागे सरकारी अनास्थेचे, काही लोकप्रतिनिधींच्या राजकारणाचे आहेत. काही आपल्याच समाजबांधवांच्या एककल्ली वृत्तीचे तर काही परप्रांतीयांच्या आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. दिवसेंदिवस हे जाळं इतकं घट्ट होत चाललंय की त्यातून स्वत:ची सुटका करणं त्याच्यासाठी अवघड होऊन बसलंय.
एकूणच, पारंपरिक मच्छीमार असो किंवा या क्षेत्रात घुसलेले बिगर मच्छीमार असोत, आज माशांच्या विक्रीतून ते थोडंफार उत्पन्न कमावत असले तरी त्याचं भवितव्य काय असेल याची शाश्वती देणं कठीणच. त्यात सागरातून माशांचा उपसा असाच चालू राहिला तर जी परिस्थिती पॅसिफिक किंवा अटलांटिकमध्ये निर्माण झाली तशी हिंदी महासागरात व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आणि मग उरलेलं असेल ते फक्त मोकळं आकाश आणि खारं पाणी!

लेखिका
सविता अमर
या लेखातील माहिती मिळवण्यासाठी खालील व्यक्तींचं सहकार्य मिळालं-
रामभाऊ पाटील, रामदास संधे, मोतीराम भावे (वेसावे), किरण कोळी (मढ), फिलिप मस्तान (नायगाव), विलास वरळीकर (वरळी), बाबा भालेकर (गुहागर), सदाशिव घारू जाधव, रावसाहेब जाधव (पन्हाळेदुर्ग), एकनाथ पालशेतकर, सुनील दाभोळकर, विश्वनाथ दाभोळकर (दाभोळ), अशोक कदम (परिवर्तन, चिपळूण), डॉ. विवेक भिडे (पर्यावरणवादी, मालगुंड), दादा मयेकर, मिसार दरवे (रत्नागिरी), अमजद बोरकर (साखरीनाटे), मुरारी भालेकर (मत्स्यसंशोधक), भालचंद्र दिवाडकर (कार्य. संपादक, दै. सागर, चिपळूण), प्रमोद कांदळगावकर (कार्य. संपादक, दर्यावर्दी), आनंद उद्गीर (संचालक, आनंद क्लासेस, वरळी कोळीवाडा)

रविवार, २५ डिसेंबर, २०११

मेरी ख्रिसमस! (Merry Christmas)


आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगतर्फे आपणांस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे...
 
आला नाताळ सण,घेऊनी आनंद मनात,
सर्व चुकांची माफी मागितली मनात,
सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात,
मदत हाच धर्म,गाणे गावे सुरात.

या नाताळात, सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो!
नाताळ - ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११

शेतावर डोला (आगरी कविता) (Uran, Panvel, Navi Mumbai - CIDCO)



शेतावर डोला 
 जमीन शिर्कोला (CIDCO) देवाची नाय,
पुन पार्टी वालला इकाची हाय...
एजंड रोज घरा यतय
अबला एजंडचा भाव पट नायं
म्हणून दोरी ताणून धाराची हायं...
एजंड शिर्कोची दावतय भीती
शिर्कोचे काय बापासाची नाय
पुन पोराला गारी झेवाची हाय...
आबचा इचार जमीन इकाचा हाय
मादीनूच बोलतय खावाचा काय?
पुन यंदा पोरीचा लगन कारचा हाय...
आबा बोलतय पोऱ्या कामाला लागलं
तरी शेवटी आयुष्याची जमीन जाय
पुन यंदा आपलेला घर भांदाचा हाय...
एजंडचा फावून तो आयला चरवतय
म्हणून आय बोलतय आबला
आव! करताव काय? मना लफ्फा कराचा हाय...
आरवान्स झेऊन उरणला जेलंवर
दुकानदार इचार करताय
खोपट्याचा बकरा दिसतंय
त्याला रगात वाकवून कापाचा हाय...
सयांची पाली जव यतय
तव आबची बयणीस उकटतय
ती बोलतय वाटा नको
मना आख्खी जमिनूच इकाची हाय...

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

आवाहन-आगरी कविता(AGRI KAVITA)


आवाहन-आगरी कविता

आगरी कवी श्री. महादेव म्हात्रे यांच्या आगामी "दुमान" ह्या पुस्तकातील ही "आवाहन" कविता त्यांनी खास आगरी बाणा ब्लॉगसाठी पेश केली आहे. आगरी बाणावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग तर्फे श्री.महादेव म्हात्रे यांचे मनापासून आभार.
आगरी समाजाने सद्यस्थितीत काय करायला हवं याचं वर्णन करणारी ही कविता खरचं डोळ्यात अंजन घालून जाते. आपला समाज नक्की काय करतोय, त्याने काय करायला हवं ह्याबद्दल मार्गदर्शन करणारी ही कविता आगरी बांधवात एकीची भावना जागी करण्यास नक्कीच मदत करेल, असा मला ठाम विश्वास आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

आगरी बाणा (AGRI BANA)

A special thanks to Agri Kavi Mr.Mahadeo Mhatre for writing this poem
in their upcoming book "DUMAAN".
Sir, the lines are really awesome. You tells much more things about
the AGRI SAMAJ in this AGRI BANA poem. I am eagerly waiting for
reading this book.
Again, thank you very much sir for writing such a nice informative
poem. Those who are not belongs to AGRI caste, they will really get
good information about our AGRI caste, AGRI tradition from this poem.
Your's,
Amod Patil.
AGRI BANA.
(Sorry, because of some technical issues I am not writing this blog in
marathi font.
Please accept my apology for not writing in marathi font.)

गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

आगरी भाषेतील कथा-५( AGRI BHASHA-AGRI SAHITYA)



सविताभाभी

पाचेक वर्सापुर्वी जगन मारवाड्यान गावान दुकान टाकलवत. ईन मीन तिनशे घरं. कीराणा आनाला पार हायवे पोतूर जाव लागाच.
सरपंचान जराशी जमिन दिल्लीवती. त्याच्यानच खोपटीसारक दूकान न पाटीमाग रायची खोली. मारवाड्याच लग्न झाल्त पन येकटाच आल्ता.
आस्ती आस्ती गावची नाडी त्यान पकरली. लोकांना ऊधार द्याची सुरवात केली. उधारी वाडली क त्यांचेकडशी भात घेवाचा न मार्केट मदी विकाचा.
आनि उधारी कती पैशे लावाचा ते त्याजं त्याला माईती.

पाच वर्सात पक्क दुकान केल. खाडीजवल येकराच जमीनीत घर बांदल.
न धा बारा दीवस आदी बायकोला झेउन आला. त्याला पॉर नवत. मना तो सगल काय सांगाचा. माजि न त्याची लय संगत व्हती. त्याला बी यक कारन व्हत. आर्रर्र यक नाय दोन.

दारु आनि आकडा.

गावान बाजार व्हईल म्हुन तो फक्त माजेबरुबरच बसाचा दारु पीयाला. सकाली आकडा लावाला पन मीच. ह्ये आकड्यान त्याजे बरुबर मी बी गुतलोवतो. सारक डोक्यान आकडं याचे.
साळंत आसताना कदी येवडा ईचार केला नवता बोल .

या आकडयाच बी यक गनीत आसतय. त्याजेवर नजर ठेवाय लागती रोजचेरोज. काल कोन्चा आला आज कोन्चा आला याजेवर ठरवाच क ऊद्या कोन्चा ईल.
दुसर जुगाड म्हंजी सपान.

सपनात मयत मानूस आला क आट्टी येनार
सर्प आला क मेंढी येनार आनी

जरास चावट सपान पडल क सिक्सटी नाईन पक्का बोल !

आसच येकदा मारवाड्याला आकडा लागला. सत्ताविस हजार मिल्ल. ते झेऊन त्याजेकड आलू. दूकानान गर्दी व्हती. त्याला कसबस सांगीतल.गडी लई खुश झाला. मला म्हनला
'मिथन्या येक काम कर ना माजं. जरा ते पैशे घरामदी देऊन येशील काय ? '
'हा जगनशेट देतो ना. त्यान क तरास हाय?'

पैशे झेउन मी त्याजे घरी गेलू. कडी वाजवली.
दरवाजा ऊगडला न मारवाड्याची बायकु भायेर आली .घूंगट घालून.

'भाभी ये जगनशेटने पयसा दियेला हाय. तुम्को देनेको बोला हाय.'

भाभीन हात फुर केला. तो नाजुक न गोरा गोरा हात बगुन डोस्क्यात लायटीचा शॉकच बसला. जसा केलीचा गाभाच जनू.
'क्या नाम है आपका ?' भाभी बोल्ली
परत शॉक. यकदम झंकारलू.

'मि..मिथुन भोईर. दुकान के सामने रयता मै.'
'अच्छा . आते रहना जी. '
पैशे घेतान भाभीचे बोटांना टच झाला. मी थनगार.
आजुन भाभी घुंगटातच वती.
'भाभी आपको देखाच नई मै. येक बार चेयरा दिकाव ना.' मी बोल्लो
'हमे देखना है आपको ? ये लीजीये.' भाभीन घुंगट काडला न गोड हसली माजेकड बगुन. तिचे डोले कायतरी सांगत व्हते.
'आपका नाम क्या हाय ?'
'सविता.'
'सविता. ... सविताभाभी. ' मी कसाबसा बोल्लो.
ज्याम जाल झाल्ता ते दीवशी डोक्यान. मन थार्‍यावर नवत
नंतर दोन तीन येलला गेलो आसन भाभीकड. ती आशीच बगाची माजे कड. मना कायच थांग लागना.

यक दीवशी जगन बरुबर पीयाला बसलोवतो. जगन न तीच जुनी कॅशेट सुरु केली.
'ईतक समद केला मी पन येक पोर नाय बग मला. सगले डोकटर झाले, नवस झाले, बाबा झाले पन आजुन यश नाय बग.'

'येक सांगु जगनशेट ? माज्या तोंडातुन शब्द फुटत व्हते ' मी क म्हन्तो माजे शेतानचे घरान येक सादूम्हाराज येनाय हाईत ऊंद्याच्याला. धा बारा दिवस रायचेत.
तु त्यांना क नाय भेटत. शिद्दी बाबा हाय त्यो.'

'आस म्हनतस . उद्याच भेटतं बग.'
'भाभी ला झेऊनच ये. दुपारच्याला.'
'ठिक हाय. संद्याकाली बसुया काय?'
'नको. मना पनवेल ला जायचय. खरेदी कराची हाय. '

दुसरे दीवशी दूपारच्याला जगनशेट सविताभाभीला झेऊन आला.
सादूम्हाराज शांत बसलवत. जगन पाया पडला. सविताभाभी पन पाया पडली. ऊटताना ती न डोल वर करुन म्हारांजाकडे बगीतल न वल्खीच हसली.
म्हाराजांनी प्रसाद दीला. वत्सा काळजी करु नको. सगळ व्यवस्थित होईल. तूज्या सगळ्या ईच्छा पुर्ण होतील.
आपली क्रुपा आसुद्या म्हाराज. जगन बोल्ला.
सुखि भव सु खि भव. म्हाराजांनी आशिरवाद दिल्ला.

'सुनिये जी, आप आगे चलीये. मुझे सादु म्हाराज की सेवा करनी है. चलेगा नं ?' भाभीन जगन ला ईचारल
'हां हां स्वामीजीकी सेवा करेंगे तो ईच्छापूर्ती जल्दी होगी. तूम आना आरामसे. मै चलता हु. मुझे दूकान पे बैठना है.' जगन न संमती दिल्ली

जगन गेला. आगदी लांब गेल्याचे बगुन भाभी नेच दरवाजा लावला.

दूसर्‍या दीवशी सिक्स्टी नाईन फुटला बोल.!

धा दिवस भाभी येत रायली सेवा करायला.

मह्यन्यानी जगन पेढे झेउन आला.
'समदा तुज्यामुलेच शक्या झाला रे. मी आता बाप व्हनार.'
मना काय बोलाव सुचना.
नंतर भाभी म्हायेरपनासाटी गावाला नींगुन गेली.
मुलगा झाला.
जगन तर मला डोक्याव झेऊन नाचाचाच बाकी व्हता.
येक दीड वरसानी भाभी आली पोराला झेऊन. मी बगाला गेलो.
पोर हासत व्हत. लई गोड दीसत व्हत. माज्यासारकेच कुरले कुरले केस, पानीदार डोले.
मी शंबराची नोट पोराचे हातात ठेवली. जगन त यकदम खुळा झाल्ता. त्यान मला मिठिच मारली न रडाया लागला.
'मिथन्या तुज्यामूलच सादु म्हाराजांची भेट झाली न माज्या घरात आनंद भरला. तूजे माज्यावर लई ऊपकार हाईत बग.'

मी बधीर झाल्तो.
खरच, मी जगनशेटचा ऊपकारकर्ता व्हतो क गुन्हेगार ?

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी  बाणा.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

देश उबल रहा है..... !! (stupid common man)



देश  उबल रहा है......................

झालेली घटना आवडली नाही.
महागाई आणि तत्सम गोष्टींबद्दल सरकार, संस्था आणि त्याच्याशी संबंधित
व्यक्तींवर राग आहे,
जनता वैतागली आहे वगैरे सगळे मान्य आहे आणि पटतेही आहे.
पण त्याचा निषेध करण्याचा हा मार्ग नव्हे असे वाटते. एका संपुर्ण
संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्याच्या अपयशाबद्दल एखाद्या व्यक्तीवर
असा हात उचलणे पटले नाही. पवारांना त्यांची चूक दाखवुन द्यायची असेल तर
आता निवडणुका आहेतच, त्यावेळी त्याची चुणुक मतदानातुन दाखवता आली असती.
ह्यातुन 'अराजक' आले आहे की काय असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही
परंतु जे काही घडते आहे ते नक्कीच योग्य नाही.
अवांतर १ : पवारांचे वय पाहता ह्या घटनेचे जास्तच वाईट वाटले.
अवांतर २ : ह्या घटनेवर आण्णा हजारेंचे 'खरी' प्रतिक्रिया पाहुन तर अजुनच
वाईट वाटले. 'गोरे इंग्रज
जाऊन काळे इंग्रज आले' असे
म्हणणार्या एका गांधीवाद्याची अशा 'हिंसक' प्रकरणावरची 'एकच मारली का?'
अशी कुत्सित प्रतिक्रिया देखजनक आहे.
'तोबा तोबा' म्हणत हल्ल्याचा निषेध अनेक मर्हाटी नेत्यांनी केलाय.

हल्ले करून प्रश्न सुटत नाहीत.
- मनोहर जोशी.
(मग आपण्/ आपले कार्यकर्ते ईतकी वर्षे अहिंसेची खिल्ली का उडवत होते?)

हा हल्ला निषेधार्हच आहे. महाराष्ट्रात त्यांची संतापजनक प्रतिक्रिया
उमटणे सहाजिक आहे. हल्लेखोराला महागाईविरोधातच राग व्यक्त करायचा होता तर
मनमोहन सिंग यांच्यापासून सुरुवात करायची होती.
- राज ठाकरे.
(kahi divasapurvich ekmekanchi khandane kadhat hote!! Baki 2
varshapurvi asach halla Maharashtra vidhansabhet dekhil zalyach
aathaval!!)

शरद पवारांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. अपराध्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे .
- अनंत गीते.
( १९९२ च्या दंगलीत भाग घेणार्यांनाही शिक्षा झाली पाहिजे ना?)

शरद पवारांवरील हल्ला घृणास्पद आहे'
- बाळासाहेब ठाकरे.
(har ek friend jaruri hota hai!!)

अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया होती ...
(अण्णाजी , शरद पवारको दिल्लीमे किसीने चांटा मारा..)
अण्णा:- एकही मारा क्या?
(आज तक.)
 
नन्तर आपले नेहमीचे गांधीवादाचे दळण त्यानी चालू केले. कारण कालच दारू
पिणार्याना विजेच्या खाम्बाला बांधून बदडले पाहिजे या त्यांच्या वाक्यावर
त्याना सर्वच स्तरातून 'झाडण्यात' आले होते. टीम अण्णाच काय पण खुद्द
अण्णाही बालीश वक्तव्ये कर्ण्यात मागे नाहीत आणि हे म्हणे राष्ट्राला नवे
नेतृत्व देणार....
(Gandhi topi ghalun koni Gandhivadi banat nahi!!!!)
ही नेते मंडळी देशाचे प्रश्न सोडवताना कधी एकत्र येताना दिसतात काय ?
फक्त त्यांची पगारवाढ करुन हवी असेल आणि असे काही अघटित घडले की लगेच हे
लोक एकी दाखवायला पुढे सरसावताना मात्र दिसतात !
आणि दुसरं काही नाही सापडलं म्हणून मग "हे मराठी माणूस सहन करणार नाही"
वगैरे भावनिक भडकाउ विधानं
करायची. मराठी आणि अमराठीवाद कुठुन आला यात?
बाकी कालच्या विधानावरुन आणि त्याआधी "दारु पिणार्यांना खांबाला बांधून
झोडलं पाहीजे" ह्यासारख्या तालिबानी गांधीवादावरुन अण्णांचे पाय दिसलेत.
वेनसडे मधल्या "स्ट्युपिड कॉमनमॅन"चं, "आज मे तरीके के
बारेमे नही नतीजे के बारेमे सोच रहा हुं", "लोगों मे गुस्सा बहोत है,
उन्हे आजमाना बंद किजिये", वगैरे आठवलं.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

फेसबुक आगरी नेटिझन्स फॉर आगरी कट्टा @वाघबीळ ( AGRI KATTA)


फेसबुक आगरी नेटिझन्स फॉर आगरी कट्टा @ वाघबीळ, ठाणे(पश्चिम)
AGRI KATTA
दि. १९ नोव्हेंबर, २०११ रोजी आगरी विकास सामाजिक संस्थेच्या पहिल्या कट्ट्या वर 'आगरी समाज काल, आज आणि उद्या' याविषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्या मध्ये प्रमुख वक्ते प्राध्यापिका कादंबरी कोठेकर, पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आगरी समाजाचा इतिहास पत्रकार शशिकांत कोठेकर व कवी रामनाथ म्हात्रे यांनी उलगडण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी आगरी समाजाच्या सद्य परिस्थिती बद्दल आपले परखड मते व्यक्ती केली व उपस्थितांची वाहवा मिळवली. आधुनिकीकरणामुळे रायगड, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आगरी लोकांच्या वस्त्या दिसेनाश्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा आगरी समाजामध्ये एक संघपणा नाही आहे अशी खंत उपस्थितांनी मांडली. आगरी समाज सातासमुद्रा पलीकडे गेला असून येणाऱ्या काही दिवसात आजच्या पिढीतले तरुण आपल्या समाजाचा वेगळा आसा इतिहास लिहितील अशी आशा संस्थेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या दिवसात आगरी समाज आणखी उल्लेखनीय कामगिरी करेल आशी आशा उपस्थित पाहुण्यांनी केली. कादंबरी शशिकांत कोठेकर संपादित "आगरी समाजमन" या दिवाळी अंकाच्या प्रती उपस्थितांना मोफत वाटण्यात आल्या.

"आगरी समाजा मध्ये उच्च शिक्षणात आणखी उल्लेखनीय कामगिरी यासाठी तसेच आगरी समाज आजही जुन्या वाईट रूढी व परंपरा काही प्रमाणात पाळतो या मध्ये सुधारणा होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. " असे मत प्राध्यापिका कादंबरी कोठेकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मुख्य सूत्र संचालन लेखक व आगरी प्रभोधन कट्ट्याचे प्रमुख सल्लागार अनिल ठाकूर यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

पहिल्या आगरी प्रभोधन कट्ट्या वर नाना पाटील, पांडुरंग पाटील, गणेश चौधरी, तुळशीराम शिंगे, भास्कर डाकी, जयवंत म्हात्रे, किशोर भोईर, संतोष भोईर, प्रकाश शिंगे व लीलाधर मणेरा इ. व्यक्ती उपस्थित होते.


आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

उरणला देखील लोकल प्रवासी रेल्वे जाणार(Nerul-Uran Railway)

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारताना आवश्यक असलेली दळणवळणाची इतर माध्यमे आधी पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सिडको व्यवस्थापनाने निर्धार केला आहे. नवी मुंबईत १९९२ साली रेल्वे सुरू झाली. त्याला आता बघता बघता २० वर्षे होत आली. या कालावधीत नवी मुंबईच्या विकासाला वेगळी गती मिळाली.

नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत उलवे, द्रोणागिरी नोड, उरणचा विकास होणार नाही, त्यासाठी हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. सिडकोने १० वर्षांपूर्वी नेरूळ-उरण दरम्यान २७ किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून त्याच्या कामाला सुरूवात केली होती. त्यावेळी या रेल्वेमार्गासाठी सिडकोने ४९५.९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता. सुरुवातीस सिडकोने या प्रकल्पासाठी २१६ कोटी रुपये खर्च केले होते. या रेल्वे मार्गादरम्यान खारफुटीसह इतर समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाचे काम रखडले गेले. आता पुन्हा सिडकोने या प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. या रेल्वे प्रकल्पासाठी सिडकोची ६७ टक्के (९४६ कोटी रुपये) तर रेल्वेची ३३ टक्के (४६६ कोटी रुपये) भागीदारी असणार आहे. १० वर्षे हा रेल्वे प्रकल्प रखडलेला असल्यामुळे १ हजार कोटी रुपये अधिक खर्च या प्रकल्पावर करावा लागणार आहे. भविष्याचा विचार करता हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.


नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर सीवुड्स-दारावे, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावा-शेवा, जासई, द्रोणागिरी, उरण अशी १० रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. याशिवाय या रेल्वेमार्गावर सीवुड्स, द्रोणागिरी, उरण या भागाचा विकास साधण्यास मदत होणार आहे. त्यातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव सिडकोने रेल्वे प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. रेल्वे प्रशासनाने नेरुळ-उरण रेल्वे मार्ग उभारणीच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पास गती मिळणार असून, हा प्रकल्प येत्या काही वर्षात पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पनवेलहून जेएनपीटीकडे मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वेमार्ग आहे. परंतु, त्यावरुन प्रवासी वाहतूक केली जात नाही.

उरण आणि आजूबाजूच्या परिसरात जे.एन.पी.टी., ओ.एन.जी.सी. तसेच अन्य प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय भविष्यात आणखीन काही प्रकल्प येण्याची शक्यता आहे. उरण परिसरातील नागरिकांना नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, बदलापूर तसेच अन्य ये-जा करणे नेरुळ-उरण रेल्वे मार्गामुळे शक्य होणार आहे. मालगाड्यांच्या वाहतुकीबरोबर प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. वाढती लोकसंख्या, बदलती परिस्थिती या सार्यांचा विचार करताना नेरुळ-उरण रेल्वे मार्ग सर्व दृष्टीने, उपयुक्त ठरणार आहे. उरणपासून नवी मुंबई परिसरापर्यंत रस्ते विकासावर भर देण्यात आलेला आहे. अनेक रस्त्यांचे रुंदीकरण, मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. कॉरिडॉरसारखा प्रकल्पही भविष्यात आकारास येणार आहे.

Nerul/Belapur-Uran Railway corridor

SALIENT FEATURES
  • Length:27 km. approx.
  • Approved Cost By Railway Board:Rs.1412.17 crores ( 2009 price level)
  • Date of start:June / July - 1997
  • Number of stations:10
  • Names:Seawoods,Sagarsangam, Targhar, Bamandongari Kharkopar,Gavan,Jasai, Nhavasheva,Dronagiri & Uran
  • Road over bridges:5 Nos
  • Road under bridges:15 Nos.
  • Track under bridge:1 No
  • Major bridges:Important bridge of 751 m span across  Panvel creek completed, 4 major  bridges, one viaduct.
  • Number of rakes:11 Nos.
  • Platforms:270 m platforms for four B.G. tracks to cater 12 car EMU rakes with double discharge facility.
  • Tripartite agreement between CIDCO, Govt. of Maharashtra and Railways and commercial development agreement between CIDCO and Railways signed on 29.08.2011

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

आगरी साहित्य संमेलन-२०११(AGRI SAHITYA SAMMELAN)


आगरी साहित्य संमेलन-२०११
AGRI SAHITYA SAMMELAN

राज्यस्तरीय दहावे आगरी साहित्य संमेलन १७ आणि १८ डिसेंबरला होणार आहे. हे संमेलन उलवा नोडमधील वहाळ या गावात होणार आहे. १७ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता उरणचे आमदार मा.श्री.विवेक पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे.

माझी तमाम आगरी साहित्य प्रेमी रसिकांना विनंती आहे की, आपल्या कामातून वेळ काढून या आगरी साहित्य संमेलनाचा जरूर आस्वाद घ्यावा.

वहाळ येथे जाणार कसे????
दादर(मुंबई), नवी मुंबईतून उरणला जाणाऱ्या सर्व बसेस या मार्गावरून धावतात. नवी मुंबई महानगरपालिकेची N.M.M.T आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची S.T या मार्गावरून धावते.
(पामबीच मार्गावरून उरण)

AGRI SAHITYA SAMMELAN
VILLAGE : WAHAL
Taluk Name : Panvel
District : Raigad
State : Maharashtra
Pin Code :410206

Wahal is a Village in Panvel Taluk in Raigad District in Maharashtra State . Wahal is 8.2 km far from its Taluk Main Town Panvel . Wahal is located 58.4 km distance from its District Main City Alibaug . It is located 20 km distance from its State Main City Mumbai .


Near By Villages of this Village with distance are Ulawe(1.5 k.m.) ,Targhar(1.9 k.m.) ,Gavhan(3 k.m.) ,Kundevahal(3.2 k.m.) ,Jasai(5 k.m.) ,. Towns Near By Panvel(8.2 k.m.) ,Uran(12.6 k.m.)

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

ठाणे आगरी महोत्सव(THANE-AGRI MAHOTSAV)










क्षणचित्रे ठाणे आगरी महोत्सव-२०१०
(वाघबीळ,ठाणे)

वरील सर्व क्षणचित्रे आहेत आगरी विकास सामाजिक संस्था(वाघबीळ,ठाणे) आयोजित आगरी महोत्सव २०१०. ७ , ८ आणि ९ मे २०१० रोजी झालेल्या या आगरी महोत्सवाला आगरी तसेच आगरी समाज जीवनावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचा तुफान प्रतिसाद लाभला.

यावर्षी देखील आगरी विकास सामाजिक संस्थेतर्फे आगरी महोत्सव २०११ चे आयोजन केले आहे. या २०११ च्या आगरी महोत्सवाला आपण भेट देऊन महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा. आगरी समाजासाठी कार्य करणाऱ्या तरुणांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी. आपलं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी पाठीशी असुद्या.

आगरी विकास सामाजिक संस्था, वाघबीळ, ठाणे सादर करत आहे "ठाणे आगरी महोत्सव २०११".

२३ डिसेंबर २०११ : सांस्कृतिक नृत्य
२४ डिसेंबर २०११ : आगरी नाटक
२५ डिसेंबर २०११ : वाद्यवृंद


स्थळ:
वाघबीळ, ठाणे

पत्ता:
विजय लॉंन्स, वाघबीळ गाव,
घोडबंदर रोड,
ठाणे (पश्चिम).

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आगरी दर्पण-दिवाळी अंक २०११( AGRI DARPAN)





आगरी दर्पण-दिवाळी अंक २०११

इथे आगरी दर्पण दिवाळी अंक २०११ च्या काही लेखांचे फोटो अपलोड केले आहेत. आगरी दर्पण आपल्या आगरी समाजाचा पहिला असा मासिक आहे. दर्पण या शब्दाचा अर्थ आरसा. आपल्या आगरी दर्पणने देखील आगरी समाज मनाचा आरसा नेहमीच त्यातील लेखातून, मान्यवरांच्या विचारातून उलगडला आहे. गेली १६ वर्षे आगरी दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच खूप काही काम झालेलं आहे. आणि यापुढे देखील आगरी दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच काम घडत राहो हीच सदिच्छा.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी



 
नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी

ना खेडं नाही, ना धड शहर नाही, अशी स्थिती महाराष्ट्रातल्या नगरांची झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील कोणत्याही तालुक्याच्या गावात जा किंवा नगरपालिका असणार्या कोणत्याही ठिकाणी. त्याला खेडं म्हणावं, तर खेड्यातली शांतता-रम्यता तुम्हाला शोधून सापडणार नाही. शहर म्हणावं तर, शहराला शोभणार्या सुविधा दिसणार नाहीत. अशा स्थितीत आपली सगळी ‘शहरे’ आज खितपत पडली आहेत.

मात्र, या अवस्थेविषयी कोणाला काही वाटत नाही. माथेरानपासून महाबळेश्वरपर्यंत सगळी देखणी शहरे जिथे बकाल झाली, तिथे पनवेल आणि उरण विषयी काय बोलणार? मुख्य म्हणजे, कोण बोलणार? आता मात्र अनेकांना अचानक कंठ फुटू लागला आहे. आजवर या शहरांच्या दुरवस्थेविषयी ‘ब्र’ न उच्चारणारे नेतेही अचानकपणे त्यांच्या विकासाविषयी बोलू लागले आहेत. जे सत्तेत आहेत ते विकासाच्या बाता मारु लागले आहेत, तर विरोधात असणार्यांना आपण मोठे क्रांतिकारक असल्याचा शोध लागला आहे. नेते अशी विकासाची वगैरे भाषा करु लागतात, तेव्हा त्याचे कारण एकच असते, निवडणूक जवळ आली आहे हे! एरव्ही, या शहरांच्या विकासापेक्षा जमिनींचे भाव, आपले उद्योगधंदे, आपले वारसदार, आपल्या संस्था, चमच्यांची फौज एवढीच काळजी नेत्यांना असते. निवडणूक आली रे आली की मग मात्र जनतेचे प्रश्न काय आहेत, हे त्यांना समजू लागते. त्यामुळे या नेत्यांपैकी प्रामाणिक कोण आणि दांभिक कोण, हे शोधणे सोपे नाही. अमाप पैसा खर्च करून सत्ता मिळवायची आणि नंतर त्या सत्तेतून पैसा मिळवायचा, हे सर्व चोर राजकीय नेत्यांचे जुने सूत्र. सर्वसामान्य माणूस मात्र या भ्रष्ट-मस्तवाल कारभाराला कंटाळला आहे.

भारत हा आता फक्त खेड्यांचा नव्हे, तर शहरांचा देश वेगाने होत असताना नवे आव्हान लक्षात घेतले पाहिजे. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यातील १९६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मुदत डिसेंबर २०११ ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत संपत असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या आठ डिसेंबरला मतदान होईल आणि ९ डिसेंबरला चित्र स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरीकरणाविषयी बोलायला हवे. अपवाद वगळता, सगळ्या नगरपालिका सध्या दारिद्र्याच्या खाईत आहेत आणि त्या शहरांची अवस्था कमालीची बकाल आहे. सगळीकडे अनारोग्याचे प्रश्न आहेत. मूलभूत सुविधांच्या स्तरावर अडचणी आहेत. कोणत्याही अशा शहरात तुम्ही गेलात तर एखादाच भाग कमालीचा वर्दळीचा, गर्दीचा, दुकान-हॉटेल-टपर्यांचा दिसेल आणि बाकीचे सगळे भाग दरिद्री. जो वर्दळीचा भाग आहे, तिथेही विकास या अर्थाने काही जाणवणार नाही. उलटपक्षी सूज दिसेल. कमालीची दुर्गंधी जाणवेल. रस्त्याने चालता येऊ नये अशी स्थिती असेल. शहरातील एस.टी. स्टँडकडे तर जावेसे वाटू नये, असे चित्र. रस्त्यावर उजेड नाही, मुळात रस्ते धड नाहीत, पाणी नाही, वीज नाही, अशा असंख्य वेदनांसह जगणारी ही गावं. पण त्याला गाव म्हणायचं नाही. अशा शहरांमध्ये एवढे प्रश्न आज भेडसावत आहेत की लोक कंटाळून गेले आहेत. पण काय करणार? शहर आहे म्हणून भाडं अव्वाच्या सव्वा, घर विकत घ्यायचं तर लाखो रुपये मोजा, साध्या हॉटेलात जाणं कठीण, हॉस्पिटल तर आणखी महाग. पण, शहरात असल्याचे फायदे काहीच नाहीत. मनोरंजनाची साधने नाहीत. आपल्या मूळ गावात जाऊ शकत नाही, कारण गावं उजाड झाली. शेती आवाक्याबाहेर गेली. शहरात ही भयानकता. याला जबाबदार केवळ नगरपालिकांचे नेतृत्व नाही. त्याला आपले सरकार तेवढेच जबाबदार आहे.

नागरी विकासाला चालना देऊ शकेल, अशा धोरणाचा अवलंब आपण कधी केलाच नाही. खरे म्हणजे, ‘नागरीकरण’ असा शब्द आपण वापरतो, तेव्हा ज्या मोठ्या शहरांविषयी आपण प्रामुख्याने बोलत असतो, ती शहरे म्हणजे, ज्यांची लोकसंख्या एक लाखाहून अधिक आहे ती. वर्ग एक शहरे. त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांना ‘सिटी’ असे म्हटले जात नाही. त्यांना ‘टाऊन’ असे म्हटले जाते. या छोट्या शहरांचा विकास झाला, ‘टाऊन’चा खर्या अर्थाने विकास झाला. तर मोठ्या शहरांकडे जाणारे लोंढे कमी होतील. आज स्थिती अशी आहे की, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशी शहरे प्रचंड फुगत चालली आहेत. २००१ च्या जनगणनेचा आधार घ्यायचा तर, आपल्या एकूण शहरी लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के शहरी लोकसंख्या या ‘वर्ग एक’ शहरांमध्ये एकवटली आहे. म्हणजे, हा असमतोल आहे. प्रत्यक्षात छोट्या शहरांमध्ये सर्व संधी-सुविधा आल्या तर मोठ्या शहरांवरील ताण कमी होईल. पण, असे होत नाही. लोकसंख्येचे केंद्रीकरण झाल्यामुळे शहर निर्माण होते हे खरे; पण या छोट्या शहरांमध्ये पुन्हा एखादे पोटशहर तयार होते आणि त्या संपूर्ण शहराचा विकासही शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नाही. आठ डिसेंबरला ज्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये रायगडच्या दहा पालिका आहेत. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, माथेरान, महाड, मुरुड, श्रीवर्धन, रोहा, खोपोली या त्या दहा नगरपालिका. त्याशिवाय रत्नागिरीतील पाच, सिंधुदुर्गातील तीन, नाशिकच्या सहा, धुळ्याच्या दोन, जळगावच्या बारा, अहमदनगरमधील आठ, नंदुरबारमधील एक, पुणे जिल्ह्यातील दहा, सोलापुरातील नऊ, सातार्यातील आठ, सांगलीतील चार, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ, वर्ध्यातील सहा, चंद्रपुरातील चार, भंडार्यातील तीन, गडचिरोलीतील दोन, अमरावतीतील नऊ, अकोल्यातील पाच, यवतमाळच्या आठ, बुलडाणा जिल्ह्यातील नऊ, वाशिमच्या तीन, औरंगाबादच्या पाच, बीडच्या सहा, नांदेडच्या अकरा, परभणीच्या आठ, उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ, लातूरच्या चार, जालनाच्या चार, हिंगोलीच्या तीन, नागपूरच्या नऊ, गोंदियाच्या दोन अशा नगरपालिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शहरीकरणाची गंमत अशी आहे की, मुंबई आणि मुंबईलगतचे ठाणे-रायगड, नाशिक आणि नाशिकजवळचा अहमदनगर, पुणे आणि पुणे महसूल विभागातील कोल्हापूर, त्याशिवाय औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला आणि काही प्रमाणात चंद्रपूर असे डझनभर जिल्हेच शहरीकरणाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. बाकीचे दोन डझन जिल्हे शहरीकरणापासून बरेच दूर आहेत.

पण, ज्या जिल्ह्यांनी शहरीकरणात आघाडी घेतली आहे, तेथील शहरीकरणाने निर्माण केलेल्या समस्या वेगळ्याच आहेत. वाहनांची गर्दी, रस्त्यांवरील अतिरेकी वर्दळ, अन्न-वस्त्र-निवारा या आणि सगळ्याच पायाभूत संदर्भात वाढलेला ताण, प्रदूषण, अनारोग्य, कचर्याचे ढीग, अतिक्रमण, असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य, झोपडपट्ट्या, कोसळलेली कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारीचे वाढणारे प्रमाण या सगळ्यांमुळे नगरपालिकांचा जीव घुसमटून गेला आहे. त्यांची शक्ती तोकडी पडू लागली आहे. शिवाय आव्हाने एवढी मोठी असतानाही नगरपालिकांना असणारा निधी, त्यांच्याकडील यंत्रणा याचाही विचार केला जात नाही. अनेक नगरपालिका निधीअभावी खितपत पडल्या आहेत. हे चित्र एकीकडे दिसत असतानाच, पनवेल, अलिबाग, उरण, खोपोलीसारख्या रायगड जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नगरपालिका स्थानिक मस्तवाल राजकारणामुळे देशोधडीला लागल्या आहेत. कारण, या नगरपालिकांमधील नेतृत्वाकडे सर्वसामान्य माणसाविषयी कोणतीही आच नाही. काही करावे असे त्यांना वाटत नाही. नगरसेवकांना फक्त पैसे कसे खायचे एवढीच विवंचना आणि मुख्याधिकार्यांसह सगळ्या कर्मचार्यांना त्या पैशाच्या वाटा सापडलेल्या. अगदी दरिद्री नगरपालिकेचा मुख्याधिकारीही लाखो-करोडो रुपयांची जमीन आरामात विकत घेऊ शकतो. म्हणूनच कोणतेही विकासकाम मंजूर झाले की अगोदर टक्केवारीसाठी मारामारी सुरु होते. शिवाय, ज्या ठेकेदारांना कामाच्या मंजुरीपूर्वीच ऍडव्हान्स दिला जातो, ते ठेकेदारही यांचेच भाऊबंद. सध्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेत्यांनी कोणाच्या ना कोणाच्या नावावर कंत्राटे स्वत:च घेतलेली दिसतात. अशा स्थितीत त्या नगरपालिकांची स्थिती सुधारेल, असे कोणत्या आधारावर म्हणायचे? एकीकडे मोठी वर्ग एक शहरे सगळी लोकसंख्या आपल्याकडे खेचून घेत असताना ही छोटी शहरे मात्र तेथील नागरिकांना तेथे राहण्यापासून परावृत्त करु लागली आहेत. त्यामध्ये धोरणांचे अपयश जसे आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बजबजपुरीही त्याला जबाबदार आहे.

आपल्याकडे नगरविकास मंत्रीपद सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतात. एवढे ते मंत्रालय महत्त्वाचे आहे, याचे भान असावे. पण प्रत्यक्षात नगरविकासमंत्री नगराच्या विकासाचा प्रयत्न करीत असतात की आणखी काही वेगळ्याच गोष्टीत ते मग्न असतात, याचा विचार करायला हवा. कारण, सध्या महाराष्ट्रात ज्या क्षेत्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे, तो आहे ‘रियल इस्टेट’ किंवा ‘प्रॉपर्टी बिझनेस’! रियल इस्टेट गलिच्छ आहे आणि अव्वाच्या सव्वा भाव तेथे आहे. हा सगळा पैसा प्रामुख्याने शहरांमध्ये आहे. त्यामुळे शहरांचे नियोजन करण्याऐवजी नको त्या ठिकाणी मंत्र्यांचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री वर जे करतात, तेच खाली नगराध्यक्ष-नगरसेवक करीत असतील, तर त्यामध्ये एक ‘सुसंगती’ आहे, असेच मानायला हवे! पण मुद्दा असा की, संकुचित राजकारणातून महाराष्ट्रातील अनेक शहरांचा विकास खुंटलेला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. झोपलेले नेते अचानक जागे झाले आहेत. जातींची-गटांची बेरीज-वजाबाकी सुरु आहे. ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ अशा भ्रमातील कार्यकर्ते इकडून तिकडे चालले आहेत. विकासाच्या बाता सगळेच मारत आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चात राज्य निवडणूक आयोगाने यंदा वाढ केली आहे. त्यामुळे ४५ हजार एवढा जास्त खर्च उमेदवारांना यंदा करता येणार आहे. म्हणजे अ वर्गासाठी तीन लाख ४५ हजार, ब वर्गासाठी दोन लाख ४५ हजार, क वर्गासाठी एक लाख ९५ हजार असा तो खर्च आहे. आता एवढ्या खर्चात या निवडणुका खरोखर पार पाडतात का, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहेत. अशा वेळी मतदारांवर आणि प्रचारावर, तोडफोडीवर आणि पळवापळवीवर जे पैसा ओतत आहेत, त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला, हा सवाल मतदारांनीच उपस्थित करायला हवा. तात्कालिक मुद्द्यांनी बिथरण्याऐवजी दीर्घकालीन विकासाची दृष्टी त्यासाठी स्वीकारायला हवी. राजकारणाचा धंदा करणार्या बिलंदर नेत्यांना मतदारांनीच सांगायला हवे, राजकारण एवढे ‘सोपे’ नाही! राजकारण ही जीवनप्रणाली आहे. ती निष्ठा आहे. मतदारांना भूलथापा मारणे आणि फसवणे आता यापुढे चालणार नाही. जो ठोस विकास करेल, त्यालाच मत मिळेल, असा निर्धार मतदारांनी केला तर महाराष्ट्रातील नगरपालिकांचे आजचे चित्र बदलू शकते.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.