आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी बाणाची पहिली बैठक.

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

सोमवार, २७ जून, २०११

आगरी बाणाची पहिली बैठक.









*आगरी बाणाची पहिली भेट*


लढतोय....
आगरी माणसांच्या न्यायासाठी,
स्वाभिमानी आगरी अस्मितेसाठी.



उपस्थित मान्यवर:
रामनाथ म्हात्रे(तुर्भे,नवी मुंबई).
रामेश्वर गवई(ऐरोली,नवी मुंबई)).
सागर पाटील(वाघबीळ,कावेसार,ठाणे).
संदेश पाटील(ठाणे).
कुणाल म्हात्रे(पडलेगाव,ठाणे).
दत्ता संते(पडलेगाव,ठाणे).
सर्वेश नवाली(विन्धणे,उरण).
सुनील पाटील(जुहूगाव, वाशी,नवी मुंबई ).
शान पाटील(मोरावे,पनवेल).
रुपेश पाटील(मोरावे,पनवेल).
चेतक ठाकूर(चिर्ले,उरण).
आमोद पाटील(जासई,उरण).



अनेक महिन्यांपासून मनात होत की, आगरी बाणातील सर्वानी एक यावं, एकमेकांचे विचार ऐकावेत, स्वताचे विचार मांडावेत. पण भेटीचा योग काही जुळून येत नव्हता. पण गेल्या रविवारी(१९ जून,२०११) रोजी हा विचार ग्रुप समोर मांडला, की खूप झाली ऑनलाईन टाईमपासगिरी. ऑनलाईन बोलून काही होणार नाही. जर काही करायचं असेल, बदल घडवायचा असेल त्यासाठी कुठेतरी एकत्र भेटूया. त्या दिवशी फेसबुकवर अनेकांशी चर्चा केल्या. चर्चेअंती खारघर या सर्वाना सोयीस्कर पडणाऱ्या मध्यवर्ती जागी भेटायचं निश्चित झालं. मग रविवारी सर्व तयारीची प्रत्यक्ष सुरुवात केली. भेटायची निश्चित वेळ, निश्चित ठिकाण ठरवण्यात आले. असा सर्व अंतिम मसुदा तयार करून फेसबुकवर टाकण्यात आला. हे वाचून काहीजण मनापासून तयार झाले. त्यांच्या मनात ही भावना होतीच की समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आणि जर काही करायचं असेल तर एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. नुसते फेसबुकवर बोंबलून समाज बदलणार नाही याची जाणीव आम्हांला झाली होती. तर मग ठरलं, ११ जण मनापासून येण्यास तयार झाली. आता सर्वजण प्रत्यक्ष भेटीची वाट पाहत होते. आणि भेटीचा दिवस रविवार(२६ जून,२०११) उजाडला.....................



प्रत्यक्ष भेटीचा दिवस..................
येणारा प्रत्येकजण नेहमीपेक्षा लवकरच उठला होता. समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून हे आपोआपच घडलं होत, त्यात कृत्रिमपणा अजिबात नव्हता. सकाळी .३० वाजता सागरदादांचा मेसेज आला की, बरोबर ११ वाजता मी खारघर स्टेशनवर पोहोचतोय. मग लगेच जे येणार होणार होते अश्या सर्वाना माझा मेसेज गेला. दोन जण सोडून सर्वजण येणार होते. भूषण . पाटील यांचा मेसेज मिळाला की, काही कारणास्तव मला येण्यास जमणार नाही. तुम्हाला पहिल्या भेटीच्या मनापासून शुभेच्छा. एका कडून काही उत्तर आलं नाही, म्हणजे तो येणार नव्हता हे निश्चित झालं. आत्ता फक्त ...........!!!!! कुणाल दादांचा मेसेज आणि लगेच फोन देखील आला. मी निघालोय, ११ वाजेपर्यंत पोहोचतोय. नंतर सुनील दादांचा फोन आला, गाडीचा टायर खराब झालाय, मला थोडा उशीर होईल. पण मी येतोय. मग चेतक भाईचा फोन मी पण निघालोय. लोकल मध्ये असताना शान भाईचा फोन मी पण आलोय. मग प्रत्यक्ष ठिकाणावर पोहोचल्यावर रामेश्वर दादांचा आणि सर्वेश भाईचा फोन, ते देखील तिथेच होते. पहिल्यांदा एकमेकांना भेटत होतो. त्यामुळे - मिनेटे प्रत्येकाला शोधायला जात होती. असे एक एक जमत गेलो. पण आमची संख्या खरतर असायला हवी होती. पण आम्ही प्रत्यक्ष १२ जण जमलो होतो. हे तर लय बेस्ट झालं. म्हणजे प्रत्यक्ष संख्येपेक्षा तसेच गृहीत संख्येच्या ने अधिक. कुणाल दादा बरोबर दत्ता दादा पण आले होते. आणि शान भाई रुपेश भाईला घेऊन आले.( ये दोस्ती हम नही छोडेंगे..................) तर मग असे आमचे आगरी बाणाचे अजून दोन सरदार आले. आपले आगरी समाजाचे कवी रामनाथ दादांना मी आग्रहाने बोलावलं होत. पण मनात थोडी शंका होती की, दादा तर कवी, गायक, संगीतकार. आमच्यात येऊ शकतील???? पण प्रत्यक्ष दादांना जेव्हा भेटलो त्यांच्याशी बोललो तेव्हा मात्र मनातील शंका लगेच नाहीशी झाली. अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व. कुठेही अंहकाराचा लवलेश नाही. जी गोष्ट रामनाथ दादांची तीच सर्वांची. सागर दादा एका आगरी संस्थेचे अध्यक्ष असून देखील कोणतीही मोठेपणाची भावना नाही. सुनील दादा बिल्डर असून देखील मी कोणीतरी आहे अशी भावना नव्हती. रामेश्वर दादा वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत पण तरीदेखील मी तुमच्यापेक्ष्या मोठा आहे असा रुबाब नव्हता. अगदी साधे-सोपे. कुणाल दादांचा आणि दत्ता दादांचा पण स्वताचा व्यवसाय आहे. पण ही माणसं मात्र खूप साधी. शान भाई, संदेश भाई, रुपेश भाई, सर्वेश भाई, चेतक भाई आणि मी वयाने छोटे. काहीजण शिकत आहेत, काहीजण नोकरी आणि स्वतःच्या व्यवसायात आहेत. मोठ्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हां छोट्यांना झालाच. त्यांनी कधीही जाणवू दिल नाही की, तुम्ही छोटे आहात आणि आम्ही मोठे. प्रत्येकजण मुक्त वातावरणात चर्चेत सहभागी होत होता.



आमची बैठक
अगोदर सर्व जमेपर्यंत आम्ही खारघर रेल्वे स्टेशन समोरील छोट्याश्या हॉटेलमध्ये बसलो होतो. पण जेव्हा सर्वजण आले. तेव्हा थोडी गर्दी वाटू लागली. त्यामुळे बाहेर कुठेतरी बसण्याचा निर्णय एकमुखाने संमत झाला. त्यावेळी त्या हॉटेलवाल्याच्या धंद्याचा देखील विचार केला. उगाच बिचाऱ्याचा लॉस नको. तशी रविवारी गर्दी नव्हतीच. त्याचा हॉटेल पण सुनासुना होता. पण तरीदेखील आमची स्वारी जागा शोधत दुसऱ्या ठिकाणी निघाली. वरती फलाटावर बसण्याची खूप जागा होती. पण ती सरळ लाईन मध्ये. आणि आम्हांला तस अजिबात नको होत. मग खाली उतरलो. खाली तर खूप जागा आहे. खालीच गोलाकार बैठक मारली. आमचा त्रास इतरांना नाही आणि इतर प्रवाशांचा त्रास आम्हांला नाही. अगदी दोन तास आम्ही तिथे मस्त आरामात बसलो होतो. आता फोटो पाहणाऱ्यांना हे जरा वेगळ वाटेल. की ही कसली यांची भेट???? कुठेही बसतात!!!! पण जेव्हा समाजासाठी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असते, त्यावेळी हेवेदावे, मानापमान विसरले जातात. "करके देखो अच्छा लगता है". इथे जे अनुभव आम्हांला भेटले ते खरेच खूप अनमोल होते. फेसबुकवर वटवट करून समाज बदलाच्या गोष्टी करणे सोपे असते. त्यावेळी शब्दांचे फुगे हवेत सोडले जातात. पण काम मात्र शून्य. पण ही आमची गोलाकार बैठक आम्हांला खूप काही शिकवून गेली. आमच्यातील अनेकजण आयुष्याची खरी सुरवात आहोत, विशी पालटून आयुष्याच्या वेगळ्या वळणावर, वाटेवरून जाण्यासाठी सज्ज असताना मिळालेले हे अनुभव खरेच खूप योग्य अशाच प्रकारचे. ती गोलाकार बैठक आमच्या नवीन वाटचालीला योगदान देणारी ठरली आहे.



आगरी समाजात वाद नको, संवाद घडावा.
पाटील साहेबांनी दिलेला आगरी एकतेचा झेंडा उंच गगनी भिडावा



चर्चा
अनेक चर्चा झाल्या, पुढचे ध्येय आखण्यात आले. त्यातील काही.

फेसबुकवर वटवट
फेसबुकवर वटवट करणारे खूप आहेत. त्यांना समाजाशी लेन-देन नाही. फक्त आणि फक्त टाईमपास साठी ते तिथे असतात. फक्त आगरी-आगरी बोंबलायचं. शब्दांचे बुडबुडे करायचे आणि उडवत बसायचे. तुमच्या बुडबुड्यानी समाज सुधारणार नाही हे आम्हांला माहित आहे. आणि जी काही मोजकी मंडळी मनापासून काम करत असतात, त्यांना त्रास देणे हे यांचे धंदे. पण स्वार्थासाठी, फायद्यासाठी मात्र सर्वजण पुढे असतात. दुसऱ्यांच्या कविता ढापून त्या कॉपी-पेस्ट करून त्यावर कॉमेंट्स मिळवून समाज सुधारणार नाही. जर इतकच आहे तर स्वतःच्या कविता तयार करा. आगरी बाणा त्यांना प्राधान्य देईल, तसेच त्यांची प्रसिद्धी देखील केली जाईल. फेसबुकवर वाद करणाऱ्यांकडे, नुसते आगरी-आगरी बोंबलून वाद करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं. या मताशी आम्ही सर्व सहमत झालो. कारण ह्या लोकांच्या हातून समाज सुधारणार नाही. हे फक्त इंटरनेट राजे. समोरासमोर बोलण्याची, समाजासाठी काम करण्याची ह्यांची हिंमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आगरी बाणा पुढे नेण्याच काम आम्ही करणार आहोत.


आगरी बाणाची भावी वाटचाल
आगरी समाज एकता, आगरी समाज विकास हे उद्दिष्ट असले तरी आगरी बाणा फक्त आगरी पुरता मर्यादित ठेवता इतर समाजातल्या आपल्या मित्र परिवाराला देखील त्यात सामवून घ्यायला हवं, अस मत प्रत्येकाने मांडले. आगरी बाणाला धर्म, पंथ, जातीची सीमा नसावी. आगरी-आगरी करताना इतर समाजाला त्रास दिला जाणार नाही याची काळजी देखील सर्वानी घ्यायला हवी. जे जुने वादविवाद असतील ते इथेच गाडून नवीन वाटचालीसाठी सर्वानी सज्ज राहायला हवं. ते आपले दुश्मन नाहीत आणि आपण त्यांचे दुश्मन नाहीत, हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. मात्र जर उगाच कोणी अंगावर येत असेल तर मात्र त्याला शिंगावर घेण्यात येईल. जो मनापासून आपल्याबरोबर येऊ इच्छितो त्याला आगरी बाणा नेहमीच आपल्या बरोबर घेईल ही भावना प्रत्येकाने व्यक्त केली. आक्रमकता असावी, पण ती आक्रमकता योग्य कामात लावावी. भांडण करून वाया घालवू नये.


भविष्यातील योजना
भविष्यातील काय करायला हवं आणि काय नको त्यावर गोपनीय स्वरुपाची सविस्तर चर्चा झाली. अनेक राजकीय, सामाजिक घडामोडीवर फक्त चर्चाच नव्हे तर काही ठोस निर्णय देखील घेण्यात आले आहेत. ते येत्या काळात दिसून येतीलच. ही चर्चा गोपनीय असल्याकारणाने त्यावर इथे अधिक सांगणे योग्य ठरणार नाही.



नेतृत्व योग्य, पण............
तर सर्वानी मला एक सुचना केली की, राग आवर. अजून खूप काही करू शकशील. नेतृत्व योग्य आहे, विचार योग्य आहेत. निर्णय घेण्याची क्षमता देखील योग्य आहे. पण कधीतरी तुला राग येतो आणि मग तू आर या पार ची भूमिका घेतोस. ती निश्चितच योग्य नाही. समर्थनीय नाही. शांत राहून निर्णय घेतलेस तर अधिक परिणामकारक ठरतील. तरी सर्वांच्या सूचनांचा मान राखून निश्चितपने बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा या बैठकीचा अजून एक फायदा. कारण मी कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहे हे मला प्रत्यक्ष सांगण्यात आलं.



अजून परिणामकारक धोरण
अजून परिणामकारक धोरण ठरविण्यासाठी लवकरच आगरी बाणाची अशीच अजून एक भेट आयोजित करण्याचा मानस बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात मांडण्यात आला.

धन्यवाद.
"आजुसचा नंगोट"
आगरी कवितांचा खजिना.


उपस्थित सर्व आगरी बाणा परिवाराकडून रामनाथ दादांचे धन्यवाद.
मला रामनाथ दादांचा कवितासंग्रह वाचायचा होता. त्यासाठी मी दादांना विनंती केली होती की, दादा येताना आपला कविता संग्रह घेऊन यावा. वरती फोटो आहेच बघा "आजुसचा नंगोट". अतिशय दर्जेदार अश्या आगरी कवितांचा खजिना. त्या मागची प्रेरणा कोणाची, त्या कविता संग्रहाची निर्मिती कशी झाली, काही अडचणी कश्या आल्या, पण अडचणींवर मात करीत हा कविता संग्रह प्रकाशित झाला, ह्या सर्व गोष्टी दादांनी आम्हां सर्वाना सांगितल्या. आणि "आजुसचा नंगोट" ह्या कविता संग्रहाची प्रत आम्हां सर्वाना दिली. तसेच आगरी संस्कृती सांगणाऱ्या काही व्हीसीडी देखील दिल्या. लवकरच त्या युट्युबवर पाहायला मिळतील. असा आगरी कवितांचा तसेच आगरी संस्कृती जतन करणाऱ्या व्हीसीडीचा खजिना आमच्यासाठी उघडून दिल्या बद्दल दादांचे मनापासून आभार. आपणा सर्वाना त्या कविता लवकरच आपल्या ब्लॉगवर वाचायला मिळतीलच तसेच युट्युबवर आगरी संस्कृतीचे अनोखे दर्शन देखील पाहायला मिळेल.


बैठकीची सांगता
ह्या संपूर्ण बैठकीत कधीच जाणवलं नाही की, आम्ही सर्वजण पहिल्यांदाच भेटतोय. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक चालू होती. कोणत्याही प्रकारचे हेवे-दावे नव्हते. जे काही होत ते आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा. अश्या बैठकीच यशस्वी आयोजन केल्याबद्दल मनाला खूप मस्त वाटतंय. जे स्वप्न होत ते सत्यात उतरताना पाहताना खूप आनंद होतो. अजून खूप लांबचा टप्पा गाठायचा असला तरी पाया मजबूत होऊन सुरुवात चांगली झाली आहे. लोकनेते.मा.श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या विचारांचं पाठबळ घेऊन भविष्यकाळात आमच्या हातून असचं कार्य घडत राहो ही आई एकविरेकडे प्रार्थना.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा