आमोद पाटील-आगरी बाणा: मार्च 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ३१ मार्च, २०११

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांची ओळख माझ्या शब्दातून.....................

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब आणि त्यांच्या दिवंगत पत्नी कै.सौ.उर्मिला दिनकर पाटील


"आमचे दिबा"

पाटील साहेबांचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या:
दि.बा.पाटील साहेबांच्या विविध भावमुद्रा

Shri.D.B.PATIL,
Ex-M.P,
Ex-M.L.A,
Kulaba,Raigad,Uran-Panvel

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब.
माजी खासदार-कुलाबा/रायगड.
माजी आमदार-उरण-पनवेल

प्रस्तावना:
आज आमचे “दिबा” वार्धक्यामुळे इतरांना थोडेसे वेगळेच वाटतात..........पण त्या इतरांनी हे लक्ष्यात घ्यावं की,”शेवटी वाघ हा वाघच असतो..........!!”

आपला हा ब्लॉग ज्या व्यक्तीच्या विचारांवर काम करतोय त्या व्यक्तीचं मी माझ्या शब्दात चित्रण करण्याचा प्रयत्न करतोय. हा लेख लिहिताना कोणाच्याही भावनांचा विचार केला जाणार नाही. जे काही असेल ते रोखठोक. पाटील साहेब आमचे आजोबा असल्याकारणाने काही कौटुंबिक प्रसंगांकडे हा लेख धाव घेऊ शकतो.


मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांची ओळख माझ्या शब्दातून.....................


नाव:
श्री.दि.बा.पाटील साहेब यांच पूर्ण नाव अनेक जणांना माहित नसेल........आपण त्यांना “दिबा” ह्या नावानेच ओळखतो.......पाटील साहेबांच पूर्ण नाव आहे श्री.दिनकर बाळू पाटील..........म्हणजेच आपले सर्वांचे दि बा पाटील.......


जन्म आणि शिक्षण:
पाटील साहेबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावात झाला. १३ जानेवारी, १९२४ साली कै.माधुबाई बाळू पाटील आणि कै.बाळू गवरू पाटील(आमचे पणजोबा) ह्या शिक्षक शेतकऱ्याच्या घरात झाला. कै.बाळू गवरु पाटील यांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावात शिक्षणाचं महत्त्व प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा आहे. पाटील साहेबांच शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झालं. वकिलीच शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये घेतलं. कै.आत्माराम बाळू पाटील(आमचे आजोबा) यांचा देखील पाटील साहेबांच्या शिक्षणामध्ये मोठा हातभार लाभला. म्हणतात ना जस,”प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते” पाटील साहेबांच्या अर्धांगिनी कै.सौ.उर्मिला दिनकर पाटील(आमच्या आजी) यांचा देखील पाटील साहेबांच्या जीवनकार्यात खूप मोठा सहभाग आहे. त्या स्वतः एक शिक्षिका होत्या. पनवेल येथील के.व्ही.कन्या विद्यालयाच्या वाटचालीमध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे.


राजकीय आणि सामाजिक:

(माझा जन्म १९९१ सालचा असल्याकारणाने मी पाटील साहेबांना पाहिलंय,येईकलय तितकंच मांडू शकतो.)
पनवेल नगराध्यक्ष,महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे २ वेळा खासदार अशी अनेक पदे पाटील साहेबांनी भूषविली. नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व.आमदार, खासदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे भूषविणाऱ्या दिबांनी शेतकरी - कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. कारावास पत्करला, पोलिसांचा लाठीमारही सहन केला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो- लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते आजही आहेत. शेतकरी कामगार पक्षातील एकेकाळचा हा मातब्बर नेता त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर काळ शिवसेनेत होता. मात्र, नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त घेणेच पसंत केले. असे असले तरी शेतकरी - कष्टकऱ्यांवर ज्या ठिकाणी अन्याय होईल, तेथे ते कणखरपणे उभे राहतात. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. “दिबां” उभे राहीले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरत होती. रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हळ्याचे संबंध आहेत. अखेरचा श्‍वास असे पर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढणार, असा निर्धार दिबांनी केला केला होता, तो खरा ठरत आहे.


इतरांची राजकीय खेळी:
शेकापक्षाला रामराम ठोकून आजपर्यंत ज्या शिवसेनेला पाटील साहेबांनी विरोध केला होता त्याच शिवसेनेत १६ ऑगस्ट,१९९९ रोजी प्रवेश करून सर्वाना चकित केलं खरतर काही महिन्यापूर्वी जेव्हा अलिबाग मध्ये शेकापक्ष्याच्या काही नेत्यांनी शिवसेनेबरोबर युती केली होती त्यामुळेच पाटील साहेब नाराज होते. त्यावेळी पाटील साहेबांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस(आय) मध्ये प्रवेश करण्याचा विचार होता. पण नंतर काय झालं हे आजपर्यंत मला देखील उमगलं नाही. पण इतकं नक्की सांगेन की रायगड जिल्ह्यात अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या शिवसेनेला पाटील साहेबांनी पुन्हा उभी केली. जे शिवसेनेबाबत तेच शेकापक्षाबाबत. शेकापक्षाला पाटील साहेबांनी मोठे केलं होत. जोपर्यंत पाटील साहेब शेकापक्क्षात होते. तोपर्यंत शेकापक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण आज रायगड जिल्हा सोडता शेकापक्षाच अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.


तर पाटील साहेबांच्या शिवसेना प्रवेशानंतर ज्या अतिशय खालच्या पातळीवरच्या राजकीय खेळी करण्यात आल्या त्यांचा उहापोह..........
१९९८ साली निवडून आलेलं सरकार १९९९ साली पडलं. त्यामुळे १९९९ साली लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी पाटील साहेब शिवसेनेच्या तिकीटावर लढले.........पण तरीदेखील एक सांगतो की ही मते शिवसेनेची नव्हती तर ती फक्त पाटील साहेबांचीच होती.......कारण त्या अगोदर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने रायगड मध्ये तिकीट दिलेला उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने पराभूत झाला होता......

तर त्या निवडणुकीतील आकडेवारी इथे देतो.........ही आकडेवारी अगदी जशीच्या तशी आहे. हव असल्यास बाहेर माहिती काढू शकता.


मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब
मिळालेली मते-२,३१,२६४


दुसरा जिंकलेला उमेदवार
मिळालेली मते-२,७४,३६१

बाद झालेली(की केलेली?? मते)-७०,००० च्या आसपास.

त्या निवडणुकीच्या २ दिवस अगोदर पर्यंत पाटील साहेब विजयी होणार हेच सत्य होत.........पण आदल्या रात्री मतपेट्यांमध्ये गडबड...... आणि तिथेच निकाल लागला. पैसा जिंकला आणि आगरी माणूस हरला.............आणि अजूनही पैसा जिंकतोय आणि आगरी माणूस हरतोय..............

आणि ह्या निवडणुकीनंतर मात्र आम्हां पाटील कुटुंबियांची जितकी होईल तितकी अडवणूक करण्याचं धोरण या माणसांनी केलं. सत्तेचा गैरवापर करून आमच्या घरातल्या शिक्षक असलेल्या मुलींना एकतर नोकरीवरून काढून टाकले किंवा खूप दुरवर बदल्या केल्या. तरी आम्ही डगमगलो नाही पाटील साहेबांची साथ सोडली नाही. पण नंतर फायद्यापुरते आपले-आपले असणारे सर्वजण साथ सोडून गेले. मार्च २००४ साली लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम होती, त्यावेळी तर कहरच झाला, कोणत्यातरी सत्तेची मस्ती अंगात असलेल्या आमदाराने जाहीर पत्रकार परिषदेत पाटील साहेबांविषयी अपशब्द वापरले. हा माणूस त्यावेळी लोकसभेला उभा राहिला होता आणि याला रायगड मधल्या जनतेनी त्याची लायकी दाखवून दिली. सत्तेचा माज असलेला हा माणूस जोरात आपटला. आत्ता माझ्याच बाबतीत सांगायचं तर मी लहान होतो. पण या सर्व गोष्टी पाहून मोठा झालोय. कधी आमच्या घरावर दगडफेक केली  तर कधी निवडणुका आल्या तेव्हा आमच्या बरोबर असणाऱ्या माणसांवर खोट्या केसेस टाकून त्यांना पोलिसांनी मारमार मारल्याच दृष्य मी डोळ्यासमोर पाहिलंय.....पोलिसांना शेठजीचे हफ्ते भेटत होते ना......!! त्यांचा गुन्हा काय होता तर आम्ही सर्व पाटील साहेबांबरोबर होतो?????????? मग आज तुम्हाला पाटील साहेब कशाला हवेत......लक्ष्यात ठेवा ते आमच्या सारख्या सामान्य माणसांचे आहेत.......कारण जेव्हा ते अडचणीत होते तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर होतो.........तुम्ही नव्हता........उलटपक्षी तुम्ही त्यांना त्रास दिलात.........स्वतःच्या पोराटोरांना आमदार खासदार बनविण्यासाठी यापुढे पाटील साहेबांच्या नावाचा वापर टाळावा........२३ मार्च,२०११ रोजी लढा होणार होता. पाटील साहेबांनी अगोदरच सुचना दिली होती की कोणत्याही प्रकारचा दंगा करायचा नाही..........तरीही एक माणूस ज्याला आमदारकीची स्वप्ने पडत आहेत आणि स्वताला कामगार नेता म्हणवून घेतो......ह्या माणसाने दंगे करण्याचे, पोलिसांना मारण्याचे भाषण अनेक ठिकाणी केले होते.......आत्ता १९८४ सालच उदाहरण देतो त्यात आमच्या जासई गावातील अनेक स्त्रिया सहभागी होत्या.....त्यांनी मला हे सांगितलं की पोलिसांनी गोळ्या मारायच्या अगोदरच हे नेते बेलपाड्याच्या डोंगरा मागून पळून गेले आणि आगरी शेतकरी जनतेने गोळ्या खाल्या.....आगरी जनतेची वाट लागायला हे असले नेते कारणीभूत आहेत.........निवडणुकांमध्ये ५०००-७००० एका मताला देऊन निवडणुका जिंकता आणि नंतर स्वतःच्या नावासमोर मोठमोठ्या पदव्या लावता..........या लोकांची हिम्मत इतकी वाढलीय की आगरी जनतेला विकत घेण्याच्या भाषा ते करू लागलेत.........


पाटील साहेबांचे विचार:
पाटील साहेब कोणत्याही देवाला मानत नाही. आमचा सर्वांचा पाटील कुटुंबियांचा जासईला एकच गणपती असतो. मी लहानाचा मोठा झालो पण पाटील साहेबांना कधी देवाच्या पाया पडताना पाहिलं नाही......पण हा देवाला न मानणारा माणूस आगरी जनतेसाठी मात्र देवापेक्ष्या कमी नाही..... महात्मा फुले, आंबेडकर ह्या विचारांचे पाटील साहेब आहेत.अंधारात पडलेल्या आपल्या आगरी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उर्मीनेच आगरी समाज वाचला. आज आगरी समाजाला ओबीसी म्हणून ओळख पाटील साहेबांनीच दिली.जर ती ओळख पाटील साहेबांनी दिली नसती तर आपली परिस्थिती कोळीसमाजा सारखी असती. कारण आज कोळी समाजातील मुलांचे दाखल्याचे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत. आज माझे अनेक कोळी मित्र जातीचे दाखले मिळविण्यासाठी हेलफाटे मारत असतात. पाटील साहेबांचे विचार मुक्त आहेत त्यामुळे अनेकांना ते आवडत नाहीत. त्यांचा कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, आगरी समाजातल्या काही चालीरीतींना जसे मोठमोठे साखरपुढे, दारू पिऊन हळदी यांना विरोध आहे. बाहेरच्या माणसांना काय तर कधी कधी घरातल्या माणसांना ते पटत नाहीत. पण मी मात्र घरातल्या मंडळीना विरोध करतो. कारण पाटील साहेबांच्या त्या मुक्त विचारांना माझा पाठिंबाच असतो. डिसेंबर महिन्यात जेव्हा आमच्या आजींच(पाटील साहेबांच्या अर्धांगिनी) निधन झालं. तेव्हा पाटील साहेबांनी सर्व जुन्या प्रथांना विरोध केला. त्यांनी कोणालाही डोक्यावरील केस काढू दिले नाहीत, कोणत्याही प्रकारच श्राद्ध वैगेरे केलं नाही. या गोष्टी घरातल्या तसेच बाहेरच्या मंडळीना पचनी पडल्या नाहीत. याचं काळात एक अनुभव आला की, आगरी समाजातले विज्ञान शिकविणारे शिक्षक सुद्धा असल्या प्रथा पाळताना दिसून आले. या मंडळींच अस म्हणन आहे की, जर विधी केल्या नाहीत तर आत्मा अतृप्त राहतो वैगेरे. काहींही मुर्खासारख सांगतात. अनेकांनी अनेक भाकड कथा सांगितल्या पण जेव्हा मी त्यांना या गोष्टीमागच वैज्ञानिक, शास्त्रीय कारण विचारलं तर सर्वजण गप्प बसले. बाकी, मला आजोबांचे हे विचार पटतात त्यामुळे त्यांच्या विचारांना कोणी कितीही विरोध करो मला फरक पडत नाही. शेवटी लेख संपविताना सांगतोय की पाटील साहेबांनी आगरी समाजाला स्वताच्या हक्कांसाठी लढा द्यायला शिकवलं.त्यामुळेच आगरी समाज टिकला, वाढला, पुढे गेला आणि अजून पुढे जाणार. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांचं गाठोडं घेऊन माझा प्रवास सुरु आहे. बघुया, माझा हा आगरी एकतेचा प्रवास कसा आणि कोणत्या कोणत्या रस्त्यावरून वाट काढत जातोय.............!!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी  बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

गुरुवार, २४ मार्च, २०११

काय होता १२.५ टक्केचा लढा............????

काय होता १२.५ टक्केचा लढा............????

अखेर २३ मार्च,२०११ रोजी गेली ४० वर्षे संघर्षपूर्ण रीतीने चालत असलेल्या प्रकल्पग्रस्त लढ्याची यशस्वी सांगता झाली असे म्हणायला हरकत नाही. ५० हजारांपेक्ष्या अधिक प्रकल्पग्रस्त स्त्री आणि पुरुष जेएनपीटी आंदोलनासाठी जमले होते. अखेर जेएनपीटी प्रशासन आणि भारत सरकार यांना आम्हां जेएनपीटी आणि नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या........या सर्वांचे श्रेय फक्त आणि फक्त आमच्या "दिबा"नाच जाते.तर पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आणि मला असलेल्या माहितीच्या आधारे हा लढा काय होता ते मांडण्याचा प्रयत्न करतोय.........
माहितच श्रेय:
माझी आई आणि मोठ्याई.
आमच्या जासई गावातील अनेक वृध्द स्त्रिया.
(वरील सर्व स्त्री मंडळी प्रत्यक्ष १९८४ च्या शेतकरी लढ्यात सामील होती. जासई गावातील बहुतेक सर्व पुरुष मंडळीना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती. आणि ही सर्व पुरुष मंडळी १६ जानेवारी,१९८४ नंतर अनेक दिवस जेल मध्ये होती.यामध्ये माझे स्वतःचे बाबा(जासई गावाचे माजी सरपंच) देखील होते.)
नवी मुंबईतील सिडको जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीला योग्य भाव मिळावा, यासाठी १६ जानेवारी १९८४ रोजी राज्य सरकारविरोधात जोरदार लढा द्यावा लागला, मात्र तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकरी जमिनीला ४० हजार रुपये भाव देण्यास नकार दिलाच, उलट सक्तीचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादन करण्यास सुरुवात केली. सरकारच्या सक्तीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. हा असंतोष इतका उफाळून आला की, जुलमी सरकारविरोधात लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन उभारले. शेतकरी सरकारच्या जबरदस्तीला भीक घालीत नसल्याचे पाहून हतबल ठरलेल्या पोलिसांनी जासई येथे जमलेल्या शेतकरी आंदोलकांवर अमानुषपणे गोळीबार केला. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या बेछूट व अंदाधुंद गोळीबारात पाच शेतकरी कामी आले.
जेएनपीटी बंदर उभारणीसाठी न्हावा-शेवा व घारापुरी बेटानजीकच्या समुद्रखाडीतील उपयुक्त असल्याचा निर्वाळा मिळाल्यानंतर बंदर निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या जेएनपीटी बंदराच्या निर्मितीसाठी साधारणत: अडीच हजार हेक्टरहून अधिक जमिनीचा आवश्यकता होती. देशातील अत्याधुनिक व मेजर पोर्ट निर्मितीसाठी न्हावा-शेवा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. जेएनपीटी बंदरासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत संपादित करण्यास सुरुवात केली, मात्र शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पदरात खरेदी करू पाहात होते. याआधीच नवी मुंबई निर्मितीसाठी न्हावा-शेवा खाडीतील शेतकऱ्यांच्या नापीक जमिनी एकरी १५ हजार रुपये देऊन संपादन करण्यास सुरुवात केल्यापासूनच राज्य सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत होता. त्यानंतर जेएनपीटी बंदरासाठी लागणारी जमीनही शेतकऱ्यांकडून अल्प दरात घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला होता.
मात्र त्यावेळी परिसरात उद्योगधंदे नसल्याने मिठागरे व शेती हेच उदरनिर्वाहाचे शेतकऱ्यांचे एकमेव साधन.
हेच साधन कवडीमोल भावात सरकार घशात घालू पाहात होते. सरकारच्या या धोरणाला शेतकऱ्यांनी कडवा विरोध दर्शविला. शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीला एकरी ४० हजार रुपये भाव द्यावा, अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी चालविली होती. ‘जमीन बचाव संयुक्त समिती’मार्फत शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा लोकनेते दि.बा. पाटील यांच्यामार्फत १९७० पासूनच सुरू होता. न्हावा खाडी येथील नापीक जमिनीला एकरी १५ हजार रुपये भाव देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मान्य केले होते, मात्र शेतकऱ्यांची साधारण योग्य असलेली भावाची मागणीही पवारांच्या आश्वासनानंतर फेटाळून लावण्यात आली होती. शरद पवार यांच्यानंतर बॅ.अ.र. अंतुले, बाबासाहेब भोसले यांनीही राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले, मात्र शेतकऱ्यांच्या एकरी भावाचा प्रश्न त्यांनाही सोडविण्यात अपयश आले. त्यानंतर वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र वसंतदादा पाटील सरकारनेही शेतकऱ्यांना प्रति एकरी २१ हजार रुपयांपेक्षा जादा भाव देण्यास नकार दर्शविला. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषात अधिकच भर पडली. मात्र शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे तमा न बाळगता जेएनपीटी बंदरासाठी लागणारी जमीन सक्तीने संपादन करण्याची तयारी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी चालविली होती. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोर्चे, निदर्शने, आंदोलनाचा मार्ग स्वीकारीत सरकारचा निषेध सुरू केला. यामुळे शेतकरी व राज्य सरकार यांच्यामधील संघर्ष आणखीनच चिघळत चालला होता.८ जानेवारी १९८४ साली जासई चे हुतात्मा मैदान शेतकऱ्यांनी फुलून गेले. तालुक्याच्या कानाकोपर्यातून आपल्या अवजारांसह शेतकरी सहपरिवार परिषदेला उपस्थित राहिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोर लोकनेते श्री.दि.बा,पाटील साहेब यांनी शेतकरी लढ्याचे रणशिंग फुंकले. या रणशिंगाच्या आवाजाने शासनही हादरले. १३ जानेवारी १९८४ ला ह्या संघर्षाचा वणवा पेटला. १३ जानेवारी पासून गावातून S. R. P. जवानांनी संचालन करून हाती लागेल त्याला तुरुंगात डांबले.
शेतकरी व राज्य सरकार यांच्यात झालेल्या अनेक चर्चा फिसकटल्यामुळे भावासंदर्भात कोणताच निर्णय होत नव्हता. शेतकरी व राज्य सरकार यांच्यातही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी व राज्य सरकारमधील संघर्ष आणखीनच इरेला पेटला. राज्य सरकारने ४० हजारऐवजी एकरी २७ हजार रुपये देण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केला. शिवाय शेतकऱ्यांच्या मान्यतेची वाट न पाहता १७ जानेवारी १९८४ रोजी जबरदस्तीने पोलीस बलाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याचा निर्धारही केला. मात्र १६ जानेवारी रोजीच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यास शासकीय अधिकारी व पोलीस बंदोबस्तात लवाजम्यासह सरसावले. उरण आणि पनवेल तालुक्यातील ५० हजारापेक्ष्या अधिक शेतकरी दास्तान फाटय़ावर जमा झाले. जमीन संपादन करण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकारी, पोलीस व शेतकऱ्यांमध्ये संघर्षांची ठिणगी उडाली. लाठीमार, अश्रूधूर व बेछुट अंदाधुंद गोळीबार पोलिसांनी शेतकरी आंदोलनकर्त्यांवर केला. पोलिसांच्या या बेछूट गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमळाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील (पागोटे), केशव महादेव पाटील हे पाच शेतकरी आंदोलक धारातीर्थी पडले, तर ३८ शेतकरी लाठय़ा-गोळीबारात जखमी झाले. यामध्ये महिला तसेच आबालवृद्धांचाही समावेश होता. शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षांनंतर शेतकरी व राज्य सरकारमध्ये समेट घडून आला. त्यानंतर शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के भूखंड देण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. साडेबारा टक्के भूखंडांचा व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या बेरोजगारीचा प्रश्न तर अद्यापही आ वासून आहे. दरवर्षी १६ जानेवारी रोजी १९८४ च्या शेतकरी आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना दिली जाते. महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे या कार्यक्रमाला फारच अल्प उपस्थिती असे. पण माझ्या जन्मापासून प्रत्येक १६ जानेवारीला आम्ही तिथे हजर असत.पण तीच भाषणे आणि तीच आश्वासने ऐकून मनात खूप राग खदखदत असे. विविध पक्षाचे पुढारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आपापल्या राजकीय पक्षांचे रंग दाखवित आयोजित कार्यक्रमाकडे पाठ दाखवित कार्यक्रमाआधीच श्रद्धांजली वाहून पलायन करायचे. यामागे स्थानिक राजकारणच कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ तर गेले नाही ना, अशीच शंका व्यक्त केली जात होती.
१४ नोव्हेंबर १९९४ साली सर्वप्रथम ना. पवार साहेबांच्या हस्तेच तळोजे -पनवेल येथे १२.५ % भूखंड वाटपाचा शुभारंभ झाला होता. त्यांनी केलेल्या योजनेचा शुभारंभ तब्बल १७ वर्षानंतरही योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकली नाही हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. परंतु ना. पवार साहेबाना उरणचा प्रांत जवळचा वाटतो. उरण सुरुवातीपासून गौरवशाली असून आजही गौरवास पात्र आहे.
कारण देशाच्या संरक्षणाचा आधारस्तंभ असलेल्या नौदलाच्या शात्रागारापासून , वायुविद्युत निर्मिती प्रकल्प, B. P. C. L . चा प्रकल्प, देशाच्या जागतिक व्यापाराचे केंद्रास्तान असणारे जेएनपीटी बंदर ते देशाच्या आर्थिक विकासाची स्पंदने असणारा O. N. G. C. चा प्रकल्प हे सारे काही उरणातच आहे म्हणूनच रायगड ची शान असलेला आणि नवी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणारा उरण तालुका पुण्याच्या मावळ मतदार संघाला जोडलेला आहे. कारण ना. पवारांची कर्मभूमी पुण्यातच आहे आणि आजही काल - परवा आलेले मावळचे खासदार संबंध नसताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा १२ .५ % भूखंडाचा प्रश्न आपण चुटकीनिशी सोडवला अशी पत्रकार परिषदेत न चुकता घोषणा करतात(डिसेंबर २०१). पुणेरी पगडी परिधान केलेल्या खासदार बाबरांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि, रायगडची,नवी मुंबईची,उरण-पनवेलची आगरी जनता हि नेहमीच संघर्षाला तोंड देत आलेली आहे . तेव्हा असे विधान त्यांच्या सारख्या पुणेकरांनी कधी करू नये नाहीतर उरणची जनता आणि आजपर्यंत उरणच्या मातीत झालेले हुतात्मे त्यांना केव्हाही क्षमा करणार नाहीत.
आज आम्हां प्रकल्पग्रस्त जनतेला आमचा हक्क मिळालाय..............!! लढ्यात मदत करणाऱ्या सर्व राजकीय, सामाजिक पक्ष संघटना,कामगार संघटना, नवी मुंबई प्रकल्पग्रस्त जनता यांचे मनापासून आभार.
सर्व प्रकल्पग्रस्त तरुणांना एक आवाहन:
कृपया जेएनपीटी कडून जे विकसित भूखंड मिळतील ते कोणत्याही बिल्डरला विकू नये. त्या भूखंडावर स्वतः व्यवसाय निर्मिती करावी.कारण ही शेवटची संधी आहे.अगोदर ज्यांना भूखंड आले होते त्यांनी ते विकून मजा मारली मोठमोठ्या गाड्या घेतल्या,घरे बांधली आणि पैसे संपवले.आज ते रडत आहेत.फारच थोड्या जनतेने त्याचा विचारपूर्वक विनियोग केला.त्यामुळे भविष्यकाळाचा विचार करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. आणि सर्व तरुणांनी हे ही लक्ष्यात घेतलं पाहिजे की, हे भूखंड आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईमुळे मिळणार आहेत. जर भूखंड विकून येणारा पैसा स्वतःच्या मौज-मजेसाठी वापरलात तर आपले पूर्वज आणि आपली काळी भूमाता आपल्याला कधीच माफ करणार नाही.

"हुतात्म्यांच रक्त वाया जात नसत,
आम्ही ते वाया जाऊ देणार नाही"

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

रविवार, २० मार्च, २०११

आम्ही "गाववाले" आणि नवी मुंबई बंद


आम्ही "गाववाले" आणि नवी मुंबई बंद

नवी मुंबईतील जेएनपीटी, एमआयडीसी, सिडको व विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आता टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. रायगड, नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी मातीमोल भावाने विकत घेऊन प्रकल्प सुरू करताना त्यांना सेवासुविधा, नोकऱ्या आणि मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र या हजारो प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. प्रकल्पग्रस्तांची ताकद दाखविण्यासाठी बुधवारी २३ मार्च,२०११ रोजी संपूर्ण नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय खारी-कळवे, बेलापूर शेतकरी प्रकल्पग्रस्त संघटनेने घेतला आहे.गुरुवारी १७ मार्च,२०११ रोजी कोपरखैरणे येथे झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे नामदेव भगत यांनी जाहीर केले आहे. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. उरण येथील केंद्र सरकारचे जेएनपीटी बंदर ग्रामस्थांच्या शेतजमिनींवर उभे आहे. या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेनुसार भूखंड मिळावेत, योग्य मोबदला तसेच बेरोजगार तरुणांना नोकऱ्या व महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च,२०११ पासून प्रकल्पग्रस्त जेएनपीटी व सिडकोविरोधात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त या आंदोलनाला पाठिंबा म्हणून २३ मार्चला संपूर्ण नवी मुंबई बंद ठेवणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली सर्व घरे नियमित करावीत, हीसुद्धा प्रकल्पग्रस्तांची प्रमुख मागणी आहे.कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शाळेच्या सभागृहात प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. त्या वेळी उरणचे आमदार विवेक पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते श्‍याम म्हात्रे, महेंद्र घरत, खारी कळवे-बेलापूर शेतकरी समाज संघटनेचे अध्यक्ष मोरेश्‍वर चिंतामण पाटील, ऍड. पी. सी. पाटील, राष्ट्रवादीचे नेते दशरथ पाटील, नवी मुंबई एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सिडकोचे संचालक नामदेव भगत, कॉंग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे, घणसोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील, नामदेव डाऊरकर, शिवसेना शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, कोळी समाज संघटनेचे नेते रमेश पाटील, अरविंद नाईक, घणसोली व्यापारी मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते.या वेळी आमदार विवेक पाटील म्हणाले की, आम्ही सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्तांनी हक्कांसाठी सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसीविरोधात सुरू केलेले आंदोलन २३ मार्चपासून अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आजपासून संपूर्ण नवी मुंबईत प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन आंदोलनाला सुरुवात करतील. वेळप्रसंगी शीव-पनवेल महामार्गावर आडवे पडून "रास्ता रोको' करून सरकारचे लक्ष वेधणार आहोत.माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही आपले सडेतोड विचार यावेळी मांडले. ते म्हणाले, की नवी मुंबईतील शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी मातीमोल भावाने विकत घेणाऱ्या सिडकोकडे आज १६ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ही संपूर्ण मालमत्ता गोरगरीब प्रकल्पग्रस्तांची आहे. केंद्र सरकारने उरण येथे उभारलेले जेएनपीटी बंदरही येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर आहे. हे बंदर दरवर्षी ७०० ते ८०० कोटी रुपये नफा मिळविते. तरीही प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली आहेत. त्याच्या निषेधार्थ २३ मार्चपासून संपूर्ण नवी मुंबईत बंद पाळण्यात येणार असून वाहतूक ठप्प करण्यात येईल. वाहनांच्या टायरमधील हवा काढून "रास्ता रोको'ही करण्यात येईल. दुकाने, रिक्षा, टॅक्‍सी बंद राहणार असून वेळप्रसंगी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी रक्त सांडण्याचीही आमची तयारी आहे.ऍड. पी. सी. पाटील यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, की माजी खासदार दि. बा. पाटील यांनी संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी घालविले. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना खारी-कळवे शेतकरी समाज संघटनेमार्फत निवेदन देण्यात येईल. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच उपोषण अजूनही चालूच आहे.सिडकोचे संचालक नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे पत्रकारांना सांगितले. साडेबारा टक्के भूखंडांचा ताबा प्रकल्पग्रस्तांना दिला जात नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहील, असा इशारा कामगार नेते श्‍याम म्हात्रे यांनी या वेळी दिला.गावोगावी निर्धार सभा १८मार्च,२०११ ते २२ मार्च,२०११ पर्यंत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसीच्या विरोधात प्रत्येक गावात निर्धार सभा घेणार आहेत. बेलापूर, आग्रोळी, शहाबाज, दिवाळे, करावे, दारावे, नेरूळ, शिरवणे, सारसोळे, कुकशेत, जुईनगर, पावणे, तुर्भे, खैरणे, बोनकोडे, कोपरखैरणे, घणसोली, कोपरी, जुहूगाव, वाशी, तळवली, गोठीवली, रबाळे, दिवा कोळीवाडा, ऐरोली, दिघा आणि विटावा या गावात सिडको, जेएनपीटी आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांच्या बैठका होणार आहेत....तर लोकलही बंद करूशाळा, महाविद्यालये, औषधांची दुकाने व अत्यावश्‍यक अन्य सेवांना या "बंद'मधून वगळण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अत्याचार केला तर रेल्वेमार्गावर उतरून लोकलही बंद करण्याचा निर्धार कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

माहिमचा हलवा आणीन तुला


HAPPY HOLI..............!!
"दोन फदे दोन फदे दे गो मना गोमू दे गो मना,
घरचा लपाण सुपारीला.........
यो माहिमचा हलवा आणीन तुला गोमू आणीन तुला,
नाय खालास त मारीन तुला गो..........
मारशील मारशील कोणाला
कोणाला रे कोणाला मी जातेय गोमुचे लग्नाला..........."
आम्हां सर्व आगरी बाणा मित्रपरिवारा तर्फे आपणा सर्वाना शिमगा,होळी,धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा. होळीच्या रंगांन सारखे आपले जीवन ही रंगीबेरंगी राहुदे.
आपलाच,
आमोद पाटील.

संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

शुक्रवार, १८ मार्च, २०११

पेटून उठलेली प्रकल्पग्रस्त जनता


२३ मार्च,२०११ जे.एन.पी.टी बेमुदत बंद आंदोलन.............!!
हक्क मागून मिळत नसतो, तो लढा देऊन मिळवावा लागतो............!!
२३ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनाला उरण,पनवेल,नवी मुंबई तसेच राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्त जनतेचा तसेच सर्व कामगार संघटनांचा भरभरून पाठींबा...........लढयापूर्वीच्या जनजागृती सभा, जे.एन.पी.टी कामगारांनी प्रकल्पग्रस्त जनतेच्या बाजूनी उभे राहण्याचा घेतलेला निर्णय तसेच प्रकल्पग्रस्त गावातील जनतेचं चालू असलेले उपोषण यामुळे प्रकल्पग्रस्त जनता पेटून उठली आहे.......... जर सरकारने २३ मार्च रोजी अथवा त्याअगोदर पोलिसी बळाचा वापर करून प्रकल्पग्रस्त जनतेला थोडा जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढून संपूर्ण नवी मुंबई परिसर बंद राहू शकतो...........याची नवी मुंबई परिसरातील सर्व नागरिकांनी सर्वानी नोंद घ्यावी.............
तरी सरकारला तसेच पोलिसांना एकच विनंती की, आम्हां सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांच्या वाटेत आडवे येऊ नका..........नाहीतर होणारे परिणाम लगेच दिसून येतील.........!!
"हुतात्म्यांच रक्त वाया जात नसत,
आम्ही ते वाया जाऊ देणार नाही"
"लाल सलाम.....लाल सलाम.......
हुतात्म्यांना लाल सलाम........."
आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

मंगळवार, १५ मार्च, २०११

रक्तरंजित होळी.......!!

रक्तरंजित होळी.......!!

पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईच्या घणसोलीत दंगल झाली . स्थानिक आणि उपरे असा अनादी संघर्ष होता त्यामागे . पण तिथे स्थानिकही मराठी होते आणि उपरेही मराठी . त्या दंगलीकडे पाच वर्षांनी वळून पाहताना .... ................. ठाणे - वाशी रस्त्यावरून जाताना घणसोली स्टेशन लागतं . मग सुरू होतात , सिडकोचा टिळा भाळी लावलेल्या टिपिकल नव्या मुंबईच्या एकसाची बिल्डिंगी . पुढचा बसस्टॉप घणसोली गावाचा . हायवेखालून जाणाऱ्या रस्त्यावरून दोनेक मिनिटं चाललं की गाव सुरू होतं . आगरी - कोळ्यांचं गाव म्हटल्यावर ज्या गोष्टी डोळ्यासमोर येतात , तसं मात्र काही दिसत नाही . अपवाद काही एकमजली रंगीत बंगल्यांचा . पटेल , नाकोडा , गुप्ता अशा नावांची दुकानं असलेला लांबलचक कॉस्मोपॉलिटीकरण झालेला रस्ता आणि चौक . चौकात अधूनमधून येणारी एनएमटीची बस . बाकी रिक्षांची रांग . मोठं होर्डिंग . त्यावर दोन फोटो . हुतात्मा जगदीश पाटील आणि हुतात्मा संतोष गुप्ता . १६ मार्च हा हुतात्म्यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम . होळी आली की हे होर्डिंग लागतं .
पाच वर्षांपूवीर्ची होळी घणसोली कशी काय विसरू शकेल ? १५ मार्च २००६ . धुळवडीचा दिवस . चौकातच गावदेवीचं देऊळ आहे . त्यादिशेने पाचेक मिनिटांवर कॉलनी सुरू होते . कॉलनी म्हणजे सिडको वसाहत . धुळवडीच्या रंगबाजीचा जोर ओसरत आला होता . गावातलं एक टोळकं याच रस्त्याने दुपारी रंग लावण्यासाठी कॉलनीत पोहोचलं . कॉलनी म्हणजे सिडको वसाहत . कॉलनी बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर ओळखली जाणारी सिम्प्लेक्स कॉलनी आणि त्यात मिसळलेली घरोंदा कॉलनी , आजुबाजूच्या आणखी काही खासगी बिल्डरांच्या इमारती , याची गोळाबेरीज होऊन बनते ती माथाडी कॉलनी . गावातल्या टोळक्याने कॉलनीत शिरून एका मुलीला रंग लावला . कॉलनीवाले म्हणतात त्यांनी छेड काढली . कॉलनीत वार्ता पसरली . कॉलनीवाले खवळले . बोंबाबोंब झाली . ते गावात आले . पोरांना शोधलं . पोरं गायब होती . तिथे बोंबाबोंब केली . मग गाववाले कॉलनीत गेले . थोडी तोडफोड झाली . हे पोलिसांना माहीत होतं . होळीचा नेहमीचा प्रकार समजून ते गाफिल राहिले . पण प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही . रात्री कॉलनीतल्या दोन - तीनशे जणांचा मॉब गावात आला . पोरांना पुन्हा शोधलं . पोरं तेव्हाही गायब होती . राग खदखदत होता . शिवीगाळ , घोषणाबाजी झाली . गाड्या फोडल्या , घरांच्या काचा फोडल्या , दुकानं तोडली , एवढंच नाही तर फेरीवाल्यांच्या हातगाड्याही सोडल्या नाहीत .
घरात भाऊबंदकीने गळे पकडतील , शेजा - यांशी कोर्टकज्जे करतील पण कोणी गावाच्या विरोधात आले , तर आम्ही एकशेपाच . आगरी - कोळ्यांच्या गावांचं हे चिरपरिचित वागणं . इथे तर गावाचं नाक कापलं गेलं होतं . काल राहायला आलेल्या कॉलनीवाल्यांनी गावावर हल्ला करणं , कसं सहन होणार होतं ? झालं . सकाळीच गाववाले कॉलनीच्या शीवेवर जमा झाले . कॉलनीच्या शेजारी मैदानावर माथाडींची सभाटाइप बैठक सुरू होती . तिथल्या भाषणांची भाषा रांगडी होती . जशास तसं उत्तर देऊ , सत्ता आपली आहे , वगैरे . दोन्हीकडे वातावरण तापलं . तुफान दगडफेक सुरू झाली . दोन्हीकडचा जमाव वीस पंचवीस हजारांचा होता . पोलिसांकडे त्यांना आवरण्याची ताकद नव्हतीच . मुळात पोलिसांना घटनेचं गांभीर्यच समजलं नव्हतं . दहा वाजताच्या सुमारास पोलिसांची कुमकही आली पण तेव्हा खूप उशीर झाला होता . जमाव अनावर झाला होता . गाववाल्यांनी कॉलनीवाल्यांच्या सभेवर हल्ला केला . काठ्या - लाठ्या तयार होत्या . माथाडींचे तिथे असलेले नेते नरेंद पाटील यांच्यावरच थेट हल्ला केला . पाटील जखमी झाले पण वाचले . त्यांचे बॉडीगार्ड ज्ञानदेव बोरगडे यांचा बळी पडला . बोरगडे हे पाटलांचे फक्त बॉडीगार्ड नव्हते , तर गाववाले आणि अगदी जवळचे कार्यकतेर्ही होते . पोलिस दगड झेलत होते . त्यांच्या गाड्यांची मोडतोड सुरू झाली होती . पोलीस म्हणतात , आम्ही विनंती केली . पण जमाव ऐकत नव्हता . पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या . शेवटी गोळीबार केला . गोळीबारात घणसोलीतले किमान पंधराजण जखमी झाले . कोणाच्या मांडीत , हातात तर काहींच्या पोटात , छातीत गोळ्या घुसल्या . त्या दिवशीचा दंगलीचा आकडा होता , तीन ठार आणि सत्तर जखमी . जगदीश पाटील आणि संतोष गुप्ता मृत्युमुखी पडले . दोघंही ऐन विशीतले . संतोषचं नुकतंच लग्न झालं होतं . तो होता फळविक्रेता . हातगाडीवर सीझननुसार फळं लादून तो विकायचा . रात्री कॉलनीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याची हातगाडीही मोडली होती . त्यामुळे तो वैतागला . दगडफेकीत तो सर्वात पुढे होता . पोलिसांच्या गोळीला बळी पडला . जगदीश पाटीलचं पुढच्या महिन्यात अकरा तारखेला लग्न होणार होतं . पण सगळं सुरू होण्याआधीच संपलं . इकडे पोलिस उपायुक्त अमर जाधवांसह अनेक पोलिसांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं . दंगलीची बातमी लागताच वाशीच्या माकेर्टमधून म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीतले माथाडी कामगार कॉलनीत आले . कांदा बटाटा माकेर्ट बंद करून तिथलेही माथाडी पोहोचले . तर कोपरखैरणे , गोठिवली आणि आसपासच्या गावातली मंडळी गाववाल्यांच्या बाजूने उभी राहिली . त्यामुळे एकूण दंगलीला माथाडी विरुद्ध स्थानिक असं स्वरूप आलं . स्थानिक आणि उपरे असा संघर्षाचा जाळ नवी मुंबईला पुढचा आठवडाभर पेटवत राहिला . दंगल सुरू झाली ती घणसोली , कोपरखैरणेत . पण बोनकोडे , जुहू गाव , वाशी गाव , करावे गाव , नेरूळ , शिरवणे , बेलापूर असं अख्ख्या नव्या मुंबईला दंगलीने ग्रासलं . र्कफ्यू लावले . राज्य सरकारने निमलष्करी दल , एसआरपी , रॅपिड अॅक्शन फोर्स अशी ताकद मुंबईच्या रस्त्यांवर आणली . तरीही नेरुळ पोलिस ठाण्यावर शेकडोंच्या जमावाने हल्ला केला . सानपाडा पोलिस चौकीला आग लावली . हायवे बंद , तोडफोड , मारहाणी . स्थानिक आमदार , राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कामगारमंत्री गणेश नाईक यांच्या घरावर महिलांच्या मोर्चाने दगडफेक केली . त्याचा नाईकांनी कायम इन्कार केला . दहावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले . पेट्रोलबॉम्ब ... अश्रुधूर ... हवेतला गोळीबार ... हतबल पोलिस ... नोकरदारांची ससेहोलपट ... टीव्हीवाल्यांच्या ओबी व्हॅनला लावलेली आग ... वर्तमानपत्रांचे ठळक मथळे ... टीव्हीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल ... या गोष्टी नवी मुंबईकर दंगलीमुळे पहिल्यांदाच अनुभवत होते ... भोगत होते . आजपर्यंत नव्या मुंबईत असं काही घडण्याची शक्यताच नव्हती . १९७३ मध्ये नवी मुंबई उभारायला सुरुवात झाली . तेव्हापासून आत्तापर्यंत नवी मुंबईत पहिली दंगल हीच . अगदी ९२ - ९३ ला उभ्या मुंबईत आगडोंब उसळला , पण त्याचा पुसटसा ओरखडाही नवी मुंबईवर उमटला नाही . नवी मुंबई हा प्रतिमुंबई वसवण्याचा प्रयत्न . पण अजूनही ते मुंबईचं उपनगरच आहे . मुंबई परवडत नाही म्हणून मुंबईकर बोरिवली ते डोंबिवलीपर्यंत फाकले . तिथेही जागा नाही म्हणत एकीकडे वसई - विरार आणि दुसरीकडे नवी मुंबईचा पर्याय समोर आला . पण ती स्वस्त नवी मुंबईही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही . वाशी , बेलापूर या मुख्य मुंबईचीही उपनगरं उभी राहिली . ती होती एका दिशेने पेण - पनवेल तर दुसरीकडे घणसोली - कोपरखैरणे . या उपनगरांच्या उपनगरात संघर्ष नव्याने उभा राहिलाय . पण हा नवा संघर्ष नाही . मुंबईच्या विस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक - उपरे असा संघर्ष होताच . कधी छुपा तर कधी उघड . जगभरातल्या शहरीकरणाचा हा अपरिहार्य संघर्ष आहे . तो अनादि आहे . अगदी सिंधुसंस्कृतीतही शहरं उभी राहताना हे झालंच असणार . नवी मुंबई उभारण्यासाठी सिडकोने मुंबईच्या परिघातली आग - यांची गावं विकत घेतली . त्याजागी इमारती उभ्या केल्या . त्यात मुंबईतून लोक भसाभसा येत होते . त्यामध्ये मराठी नोकरदार मोठ्या संख्येने होते . बंगाल्यांपासून मल्याळ्यांपर्यंत सगळ्यांच्या सोसायट्या होत्या . त्यांच्यासाठी गुजराती , मारवाड्यांनी दुकानं उभारली . दुधापासून म्हावऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी भैये आले . या धावपळीत स्थानिक आगरी कोळी गावातल्याही गावठणात आक्रसले . जमिनी हातच्या गेल्या होत्या . त्याबदल्यात स्थानिकांना कवडीमोलाचा मोबदला मिळाला . पण त्याच जागा नवी मुंबईचं लेबल लावून दामदुपटीने लोकांना विकल्या जात होत्या . मिठाच्या भावाने विकलेल्या जमिनीला हि - याचा भाव मिळत होता . पण त्यासाठी त्यांना फक्त चुकचुकण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं . कधीकाळचा इंडस्ट्रियल बेल्ट आता रेसिडेन्सियल हब झाला होता . त्याचा फटकाही स्थानिकांना बसला होता . दहा - बारा वर्षांच्या नोकऱ्या अचानक हातच्या गेल्या . वाशीच्या कॉन्व्हेण्टमधली मुलं गावच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत आणावी लागली . घरच्या परसात चाळी बांधून भाड्याने दिल्या . त्याच्या भाड्यावर नाहीतर रिक्षा चालवून स्थानिकांची गुजराण सुरू झाली .अख्खी नवी मुंबई उरावर येऊन बसली होती . तिच्या लखलखटाने डोळे दिपत होते . शिकल्या सवरलेल्या पोरांना आगरी असल्याची लाज वाटू लागली होती . त्यातल्या त्यात समाधान एकच होतं , नवी मुंबईत गाववाल्यांची वट होती . मागे काहीही बोलतील , पण आगरी म्हटल्यावर बिल्ंडिगवाले हमखास टरकत . आवाज वर चढवला की समोरचा कारे म्हणायचा नाय . भाऊबंदकी असली तरी समाज म्हणून आगरी एकजूट होती . त्यामुळे गावात गाववाल्यांच्या चाळी आणि झोपड्यांमध्ये राहणारा स्थानिक नसला तरी वचकून असायचा . त्याच्या सगळ्या नाड्या गावाच्या हाती असल्याने तो आपसूक गाववाला बनून जायचा . त्यामुळे पार्टी कुठलीही असो , नवी मुंबईतले पुढारी आगरीच असायचे आणि आजही आहेत . पन्नास आणि साठच्या दशकात मुंबईतल्या मराठी माणसासारखी त्याची स्थिती होती . पण हे वर्चस्व फार दिवस चालणार नव्हतंच . नव्या मुंबईची डेमोग्राफी , सगळा नकाशाच मुळापासून बदलला होता . गाववाल्यांच्या तुलनेत तीन - चार माळ्यांच्या बिल्डिंगींमधे राहणारे पटीत वाढत होते . पण दिवसभर कामासाठी मुंबईत आणि रात्री झोपायला नवी मुंबईत येणाऱ्या कातडीबचाव नोकरदारांना कुठलीही झंझट नको होती . त्यातून गाववाल्यांशी अधूनमधून खटके उडत होते . छोट्या मारामाऱ्या , थोडी तोडफोड सुरू असायची . त्याचं कारण होतं स्थानिकांच्या नेतेमंडळींचा बोटचेपेपणा . आगरी कोळ्यांची नवी मुंबईतली लोकसंख्या आजघडीला पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नाही . मात्र इथे महापालिकेपासून विधानसभेपर्यंत राजकीय नेतृत्व सरसकट आगरी आहे . लोकसंख्येचं हे वास्तव मतदानाची गणितं मांडणा - या आगरी पुढा - यांपेक्षा अधिक कोणाला माहीत नाही . त्यामुळे मग गाववाले - बिल्डिंगवाल्यांच्या वादात कालपर्यंत गाववाल्यांसाठी रस्त्यावर उतरणारा पुढारी नेता बनताच गुळमुळीत भूमिका घेतो . त्यांच्या कार्यक्रमांत , उत्सवांत उत्साहाने उतरतो . हे बघून गाववाल्यांचा जोश कमी झाला होता . त्यांना आता समजून चुकलं होतं की आपण फार ताणून धरण्यात अर्थ नाही . त्यामुळे वाशी - बेलापूर पट्ट्यातले वाद थांबले होते . तणावाची स्प्रिंग दाबली गेली होती . गेल्या तीनेक वर्षांत नवी मुंबई ठाण्याच्या दिशेने वाढू लागली होती . एकतर वाशी ठाणे लोकल सुरू झाली होती . बस वाढल्या होत्या . हायवेही व्यवस्थित होता . त्यामुळे वाशी ते बेलापुराची तीच कथा पुन्हा एकदा या नव्या गावांमधे लिहिली जात होती . तीच धुसफूस , तोच राग , तोच संघर्ष आणि तीच समीकरणं . या सगळ्याचा परिणाम म्हणून संयमी मानलं गेलेलं हे शहर पेटून उठलेलं साऱ्या जगानं पाहिलं . पोलिस गाफील राहिले म्हणून दंगल अधिक पेटली , हे खरं असलं तरी त्यामागची कारणं तेवढीच तीव्र होती . तीन जणांचा बळी घेणा - या या गोळीबाराने इथला भूमिपुत्र पेटून उठला . वेळोवेळी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना उफाळून आली . त्यातून आपलं अस्तित्व टिकविण्याची आणि आपली एकी दाखवून देण्याची वेळ आल्याचं स्थानिक गावकऱ्यांनी मनावर घेतलं . घणसोली गावापासून सुरू झालेली ही अस्तित्व टिकवण्याची आणि सार्मथ्य दाखवण्याची लढाई हळूहळू नवी मुंबईतल्या गावागावांत पसरली . या संघर्षात कोणाचंही नेतृत्व नव्हतं , कुणाचं मार्गदर्शनही नव्हतं . पण दगडफेक , जाळपोळ , रास्ता रोको असा गाववाल्यांनी आपला राग व्यक्त केला . एखाद दुसरा अपवाद वगळला तर नवी मुंबईतले नेते या विषयावर कोणतीही भूमिका न घेता शांतच राहिले . गणेश नाईक सर्वात मोठे नेते . त्यामुळे त्यांचं मौन अधिक लक्षात आलं . स्थानिकांच्या प्रस्थापित नेतृत्वाची अशी कुचंबणा नेहमीच होत असते . नव्यांना सामावून घेणं त्यांची मजबुरी असते आणि जुन्यांशी त्यांची नाळ जोडलेली असते . गरिबांनी गरिबांशी कशाला भांडायचं , असं आर . आर . पाटील दंगलीच्या काळात म्हणत होते . पण स्थानिकांना त्यांचं हे म्हणणं बिल्डिंगावाल्यांच्या बाजूचं वाटत होतं .
घणसोलीत माथाडी कामगार समोर होते . ते संघटित होते . त्यांचे वाशी माकेर्टमधले गलेलठ्ठ पगार , गावातल्या जमिनी असूनही मिळालेले स्वस्तातले फ्लॅट . त्यामुळे स्थानिकांचा राग होताच . त्यामुळे तिथे आगरी विरुद्ध माथाडी असा सरळसोट संघर्ष दिसून आला . त्यामुळे राज्यातली मराठी मनं दुखावली . अन्याय झाला म्हणून ओरडण्याच्या आपल्या परंपरागत भूमिकेत मराठी माणूस होताच . भूमिपुत्र , स्थानिक ही परंपरागत नावं त्याच्याकडे होती . पण दुस - या बाजूलाही उपरे म्हणून , परप्रांतीय म्हणून मराठी मातीतली माणसं होती . मराठी विरुद्ध मराठी , कष्टकरी विरुद्ध कष्टकरी असा हा संघर्ष अस्वस्थ करणारा होता . पण माथाडी आणि आगरी अशी वॉटरटाइट कम्पार्टमेंट करण्याजोगी स्थिती नाही . घणसोली गाव बरंच कॉस्मोपॉलिटन आहे . गावात आग - यांएवढीच संख्या उत्तर भारतीय आणि राजस्थानींची असावी असं गावात फिरताना वाटतं . गावदेवीच्या देवळासमोर मल्याळींच्या अय्यप्पा मंडळाचा बोर्ड आहे आणि शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर भय्यांच्या चाळीची रांग आहे , इतकी ही सरमिसळ आहे . त्यामुळेच गाववाला म्हणून दगडफेक करताना पोलिसांच्या गोळीचा बळी ठरलेला संतोष गुप्ता भय्या असल्याचं फारसं कुणाला खटकलं नाही . दुसरीकडे माथाडींनी आपल्या खोल्या सर्रास भाड्याने दिल्या आहेत . तिथेही सगळे माथाडी नाहीत . शिवाय अख्ख्या नव्या मुंबईत दंगल पसरली तिथे सगळीकडे माथाडी नव्हते . त्यामुळे असा सरळसोट संघर्ष मांडण्यात हशील नाही . त्याऐवजी गाववाले आणि बिल्डिंगवाले असं हे मांडायला हवं . दोन्हीकडे मराठी माणसांची संख्या मोठी होती . त्याहीपेक्षा दोन्हीकडचं नेतृत्वही मराठीच होतं . त्यामुळे तो संघर्षही मराठी विरुद्ध मराठी असाच होता , असं म्हणावं लागेल . स्थानिकांना वाटतं बाहेरून आलेले आपल्या अस्तित्वावर घाला घालत आहेत आणि त्यासाठी रितसर आखणी करून वागत आहेत . तेव्हा तो संघर्षाच्या पवित्र्यात येतो . मग ते उपरे कुणीही असोत , वेगळी भाषा बोलणारे किंवा तिच भाषा बोलणारे , वेगळा धर्म असणारे किंवा तोच धर्म सांगणारे . इथे दोनच जाती असतात , दोनच धर्म असतात , दोनच प्रांत असतात , स्थानिक आणि उपरे . स्थानिक आणि उप - यांच्या संघर्षातून खरंच काही घडतं का ? तिथे संघर्ष नाही समन्वय हाच मार्ग असतो . दोघांकडच्या चांगल्याचा संकर नव्या संस्कृती जन्माला घालत असतो . संस्कृतीचा विकास म्हणतात तो हाच . पण त्यात अनेकांच्या हितसंबंधांना हादरा मिळत असतो . ते त्याला विरोध करतात . पण संस्कृतीचा प्रवाह त्यांना थांबवता येत नाही . कारण तो खळाळत पुढे जाणारच असतो . घणसोली गावातल्या वारकऱ्यांनी कॉलनीतल्या जाऊन भागवत सप्ताहात भाग घेतला . कॉलनीतले भाविक गावातल्या साईभक्तांबरोबर शिडीर्च्या पालखीबरोबर पायी गेले . अद्याप संघर्ष संपला नाही , पण अशा प्रयत्नांतून दोघे एकमेकांच्या जवळ आले आहेत . ज्यांच्या डोक्यातली गाठ अद्यापही सुटलेली नाही , तेही शांत आहेत . कारण हिंसा कुणालाच परवडत नसल्याचं त्यांच्याही लक्षात आलं आहे . आपल्या चुका त्यांच्याही लक्षात आल्या आहेत . एकूण नवी मुंबईची वेगळी संस्कृती घडतेय , मुंबईपेक्षा वेगळी , स्वत : ची संस्कृती . त्या संस्कृतीच्या घडण्यात घणसोलीच्या दंगलीचं एक महत्त्वाचं योगदान आहे .
पण या दंगलीच्या निम्मित्ताने हे दिसून आले कि, सर्व राजकीय पक्ष्य स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा हवा तसा वापर करून घेतात. जनता जेव्हा रडत असते तेव्हा हे सर्व राजकीय पक्ष्य अक्षरशा तमाशे पाहत असतात.मराठीच्या नावाने बोंबलणारे राजकीय पक्ष्य तेव्हा कुठे होते?????या मंडळीनी तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पेटवला होता...स्वतःच्या स्वार्थासाठी...पण जेव्हा नवी मुंबईतला मराठी माणूस अडचणीत होता तेव्हा कुठे होते हे मराठी सम्राट,वाघ अश्या पदव्या मिरवणारी मंडळी????? अहो इतकाच कशाला.....२६/११ च्या त्या भयाण रात्री तरी कुठे होती ही वाघ,सिंह,सम्राट मंडळी????? आपली परिस्थिती गांधीजींच्या माकडासारखी करून ठेवलीय या राजकीय मंडळीनी......!!ते फक्त आदेश देणार अन जनता पालन करणार???? काहींनी मराठी माणसाला "वडा-पाव" च्या गाड्यावर सीमित ठेवला तर काही सध्या रेल्वेच्या स्टोल पुरत सीमित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.....!! ही माणसे फक्त निवडनुकांपुर्तीच आपली असतात तेव्हाच यांना माता बहिणी आठवतात....आपण यांना मत देणार आणि हे नंतर अभद्र युत्या करणार स्वतःच्या स्वतःसाठी......या अशा युत्या करताना ज्यांनी तुम्हाला मत दिलंय त्यांचा विचार देखील करत नाही....कारण तेव्हा त्यांना त्यांची सत्ता प्रिय......स्थायी समितीच अध्यक्षपद प्रिय....निवडणुकीपूर्वी ज्यांना शिव्या दिल्या.....त्यांच्याच ताटात जावून जेवणार....!! त्यामुळे आत्ता तरी निट डोळे उघडे ठेवून सर्व पहा....!!
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.

शनिवार, १२ मार्च, २०११

आम्ही प्रकल्पग्रस्त आणि सरकार

आम्ही प्रकल्पग्रस्त आणि सरकार

“आमचा हक्क आम्ही मिळवणारच...............!!!!”
“हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते,
आणि आम्हीही ते वाया जाऊ देणार नाही”

राज्यात अनेक प्रकल्पग्रस्तांनी सध्या संघर्षांची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या राज्य सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या दोन प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्त तर पेटून उठले आहेत. या दोन प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांना मिळणारी वेगळी वागणूक व पॅकेज पाहता राज्यात जुने व नवीन प्रकल्पग्रस्त असा एक वाद सुरू झाला आहे. हे अद्याप राज्य सरकारच्या लक्षात येत नाही, नवी मुंबईत हा वाद अधिक उफाळून आलेला आहे. एकाच वेळी जवाहलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी,) एमआयडीसी, सिडको, विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. हे असे का झाले आहे, याचा राज्य सरकार व स्थानिक प्राधिकरणांनी आता तरी विचार करण्याची गरज आहे. प्रकल्प सुरू करताना, देतो म्हणून सांगितलेल्या सुविधा, सेवा आणि मोबदला न दिल्यामुळे हे वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळेच नवीन प्रकल्प सुरू करताना सरकारविषयी विश्वासार्हतेची भावना प्रकल्पग्रस्तांच्यात नाही. सरकारने दुजाभाव न करता प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व मागण्या तात्काळ सोडविल्यास राज्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. त्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जेवढय़ा लवकर पूर्ण होणार नाहीत, तेवढेच कोलीत स्थानिक पुढाऱ्यांच्या हाती मिळत असल्याने त्यांच्या राजकारणाचा धंदा तेजीत चालत आहे. मागण्या अधिक काळ प्रलंबित ठेवल्यास त्यांना अनेक फाटे फुटतात, हे शासन चालवणाऱ्यांच्या लक्षात कसे येत नाही, हा खरा प्रश्न आहे. नवी मुंबईच्या बाबतीत हा प्रश्न अधिक जटिल आणि कायदा, सुव्यवस्था बिघडवणारा झाला आहे.मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली हे सर्वश्रुत आहे. नवी मुंबई हे शहर वसविण्याअगोदर या ठिकाणी केमिकल झोन तयार करण्यात आला होता. त्यामुळेच नोसिल, पील, स्टॅण्डर्ड अल्कलीसारख्या मोठय़ा कंपन्यांनी या ठिकाणी बस्तान बसविले. केमिकल्स झोन निर्माण करताना राज्य सरकारने नागरी वसाहत होणार नाही, असा शब्द दिला होता. पण तो नंतर पाळण्यात आला नाही. नऊ वर्षांतच या ठिकाणी शहर वसविण्याची जबाबदारी सिडको नावाच्या शासकीय कंपनीवर टाकण्यात आली. हा प्रकल्पग्रस्तांचा पहिला विश्वासघात होता. त्यामुळे या शहरात पूर्व बाजूस औद्योगिकीकरण व पश्चिम बाजूस नागरीकरण अशी नवी मुंबईची रचना तयार झाली आहे. नवी मुंबईतील केमिकल्स झोन आता हळूहळू गायब होऊ लागला आहे. त्या केमिकल्स कंपन्यांच्या जागा आयटी कंपन्यांनी घेतल्या आहेत. त्यामुळे तो झगमगाट प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात भरला आहे. आमच्या जमिनी विकून कंपनी मालकांनी गडगंज संपत्ती जमा केली आहे. हे न समजण्याइतके प्रकल्पग्रस्त दूधखुळे राहिलेले नाहीत. या जमिनी विकण्याची परवानगी देणाऱ्या सरकारने प्रकल्पग्रस्तांना काय दिले तर त्यावेळी जमिनीचा एकरी अडीच ते पाच हजार रुपये भाव आणि एक गुंठय़ाचा जमिनीचा तुकडा, प्रकल्पग्रस्त हे कसे सहन करू शकणार आहे. त्याच वेळी संघर्ष करणाऱ्या पुण्यातील प्रकल्पग्रस्तांना विद्यमान भाव आणि संपादित जमिनीच्या पंधरा टक्के जमिनीचे भूखंड देण्याची योजना एमआयडीसीने राबविली आहे. हा विरोधाभास कशासाठी, हेच मुद्दे घेऊन नवी मुंबईतील एमआयडीसी शेतकरी कृती समितीने संघर्षांचे बिगूल वाजविले आहे. त्यासाठी त्यांनी पहिला संघर्ष महिला दिनी एकदिवसीय उपोषण करून केला. या प्रकल्पग्रस्तांनाही पंधरा टक्के भूखंड हवे आहेत याशिवाय जमिनी घेताना एमआयडीसीने आयटीआय इन्स्टिटय़ूट उभारू, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देऊ, महिलांना रोजगार देऊ या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला आहे. उरण येथील केंद्र सरकारचे जेएनपीटी बंदर हे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभे आहे. येथील प्रकल्पग्रस्तही २३ मार्च,२०११ पासून आंदोलनास सुरुवात करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांनी तर रक्तरंजित क्रांती होईल, असा इशारा दिला आहे. त्यासाठी रविवारी एक निर्धार सभा झाली. यात रायगड जिल्हयातील सर्वपक्षीय नेते झाडून हजर होते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर एखादा पक्ष अलिप्त भूमिका घेऊ शकत नाही. जेएनपीटीच्या प्रकल्पग्रस्तांनाही सिडकोने दिलेल्या साडेबारा टक्के योजनेप्रमाणे भूखंड हवे आहेत. जेएनपीटीने गेली २७ वर्षे याबाबत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता येथील प्रकल्पग्रस्त संतप्त झाला आहे. सरकार या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करताना कधीच दिसत नाही. उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या एका आंदोलनाला यश आले आहे. महामुंबई एसईझेडसाठी जमीन संपादित करण्याच्या हालचालींना पायबंद बसला असून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे पुन्हा चढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या वतीने एक अद्ययावत शहर व व्यापार केंद्र उभे करण्याचा मनसुभा प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या भावना आणि मागण्या जर सिडकोने किंवा जेएनपीटीने फार पूर्वीच जपल्या असत्या तर कदाचित विशेष आर्थिक क्षेत्रासाठी(एसईझेड) जमिनी संपादित करण्याचा मार्ग सुकर झाला असता.नवी मुंबई शहर प्रकल्प हा ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी एक फटक्यात संपादित करून उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १९९४ रोजी राज्य सरकारने जाहीर केलेली साडेबारा टक्के योजना आजमितीस पूर्ण झालेली नाही. सिडकोच्या दप्तरी ती कागदावर ८७ टक्के पूर्ण झाली असली तरी प्रकल्पग्रस्तांना प्रत्यक्षात भूखंड मिळालेले नाहीत. प्रकल्पग्रस्तांपेक्षा या भूखंड वितरणात बिल्डरांचे हितसंबंध जास्त जपले गेले. या प्रकल्पग्रस्तांसाठी सिडकोने वेळीच गावठाण विस्तार योजना न राबविल्याने या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी आणि त्यांचा आधार घेऊन काही लॅण्डमाफियांनी गावांच्या जवळ बेसुमार अनधिकृत बांधकामे बांधली आहेत. ती कायम करण्यासाठी आता प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरला आहे. यात ते लॅण्डमाफियाही आहेत. सिडको हा प्रश्न आजही प्राधान्याने सोडवीत नसल्याने हडप केलेल्या जमिनींवर आज टॉवर उभे राहत आहेत. या सर्वाना सिडको व पालिकेचे भ्रष्टाचारात मश्गूल असणारे पदाधिकारी कारणीभूत आहेत. सिडकोच्या अनेक अधिकाऱ्यांनी गेली कित्येक वर्षे मंत्रालयाव्यतिरिक्त कार्यक्षेत्रात फेरफटका मारलेला नाही. राज्य सरकारने जानेवारी २०१० रोजी ही घरे कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यात काही नियम, अटी घालण्यात आल्या आहेत. त्या जाचक अटी प्रकल्पग्रस्तांना कधीही मान्य होणार नाहीत. “कारण जमिनी आमच्या आहेत त्याच्यावर तुम्ही परक्या लोकांना फुकटात जागा देता पण इथल्या मूळ स्थानिकाला का नाही???????? माथाडी मंडळी बाहेरून येवून देखील त्यांना फुकटात घरे बांधून दिली जात आहेत........तीही आमच्याच हक्काच्या जागेवर........याच कारणावरून घणसोली दंगल पेटली होती..........जर सरकारने वेळीच पाऊले उचलली नाहीत तर स्थानिक आणि परके असा एक लढा पुन्हा निर्माण झाल्यास स्थानिक जनता जबाबदार राहणार नाही याची नोंद असावी.............कारण आगरी माणूस पेटतो तेव्हा सर्वच पेटवतो.........एकदा अनुभव घेतलात पुन्हा घ्यायचा आहे का???????” सरतेशेवटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यामुळे सिडको या प्रकल्पग्रस्तांना बैठकींना बोलावून गोंजरण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आजूबाजूच्या प्रकल्पग्रस्तांच्या फसवणुकीची उदाहरणे पाहता नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला चांगलेच वेठीस धरले आहे. त्यासाठी सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला शह देणारे एक वेगळे पॅकेज या प्रकल्पग्रस्तांनी तयार केले आहे. अगोदर प्रत्यक्ष पुनर्वसन केल्याशिवाय सिडकोच्या भूलथापांना बळी न पडता गाव खाली न करण्याचा निर्धार या प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे ३४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळाच्या नवी मुंबईत एकाच वेळी जेएनपीटी, सिडको, आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न उभे ठाकले असून ते सोडविण्याचे मोठे आव्हान शासनाला येत्या काळात पार पाडावे लागणार आहे.
“लाल सलाम,लाल सलाम,
हुतात्म्यांना लाल सलाम”
“२३ जानेवारी,२०११ चलो जे.एन.पी.टी.”

आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

शुक्रवार, ११ मार्च, २०११

ही राजकारण्यांची खरी जात........!!


ही राजकारण्यांची खरी जात........!!
खाली मी दोन परस्पर विरोधी बातम्या देत आहे. त्या वाचा आणि काय आहे ते समजून जा.

बातमी क्रमांक:१

अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कृतीतून दाखवू - राज ठाकरे
१६ डिसेंबर,२०१०(सकाळ)
चिपळूण - "कोकणचा विकास करण्यासाठी इतर अनेक पर्याय असताना केवळ अणुऊर्जा प्रकल्पच कोकणच्या माथी का मारले जात आहे ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अणुऊर्जा प्रकल्पांना असलेला विरोध कृतीतून दाखवू'', असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारला दिला.ते म्हणाले, ""अमेरिकेत 1973 नंतर दोन अणुऊर्जा प्रकल्पांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्यता दिली आहे. पण या प्रकल्पांना अमेरिकेच्या सिनेटने अजून मान्यता दिलेली नाही. चीनमध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाल्यापासून कायदे कडक करण्यात आले आहेत. एखाद्या प्रदेशात अणु प्रकल्प साकारायचा असेल तर त्याला इंटरनॅशनल लॉ ची परवानगी घ्यावी लागते. लोकसभेत अद्यापपर्यंत तसा प्रस्तावही मांडण्यात आलेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पांविषयी केंद्र सरकारकडून योग्य माहिती दिली जात नाही. असे असताना जमीन संपादित करण्याचा डाव का रचला जात आहे, महाराष्ट्राचे नेते का गप्पा आहेत.''महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करण्यासाठी वीज उत्पादनाची मोठी गरज आहे. त्यासाठी एकट्या कोकणमध्ये 21 ऊर्जा प्रकल्प आणणे हा पर्याय असू शकत नाही. कोकणची जमीन सुपीक आहे. शेतीसाठी योग्य असलेल्या या जमिनीत प्रकल्प उभारण्यापेक्षा नापिक जमिनीत अणुऊर्जा प्रकल्प उभारा. अणुऊर्जा प्रकल्पातून कोकणचा कोळसा करण्यापेक्षा येथे येणारे प्रकल्प राज्याच्या विविध भागात विभागून द्या. समुद्रकिनारा नसलेल्या प्रदेशामध्ये प्रकल्प कसे उभे राहिले. डहाणुमध्ये रिलायन्स कंपनीने 100 टक्के प्रदूषण मुक्त वीज प्रकल्प उभारला आहे. त्याची माहिती मी घेतली आहे. अशा प्रकारचे प्रकल्प सरकारने हाती घेतले तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करू; मात्र अणुऊर्जा प्रकल्पांना मनसेचा विरोध असेल आणि तो आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले

बातमी क्रमांक:२
जैतापूर प्रकल्पाला मनसेचा पाठिंबा-राज ठाकरे

९ मार्च,२०११(स्टार माझा)

बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जैतापूर प्रकल्पाला राज ठाकरेंनी मनसेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलाय. राज्याच्या विकासाच्या आड मनसे कधीही येणार नाही अशी भूमिकाही राज यांनी यावेळी स्पष्ट केली. तसेच राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही राज ठाकरेंनी केलीय. नारायण राणे यांनी कुणालाही उत्तरं देतं बसू नये, यामुळे वाद वाढतील आणि प्रकल्प रखडेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.पण सर्वच उर्जा प्रकल्प सरकारला कोकणातच का हवे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय.मनसेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांशी बोलत होते. युतीचं ओझं वाहण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेनं मुंबईत केलेल्या कारभाराचाही समाचार घेतला. झोपड्या वाढत असताना त्या बाळासाहेबांना दिसत नाहीत का असा सवालही राज यांनी केलाय.

तर आत्ता काय बोलाल????? मी तर बोलणार............कोन नाय कोनचा, आयुष्यभर खा डाल भात लोनचा..............त्यामुळे यापुढे फक्त कोकण वासियानीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने डोळे उघडून स्वतःचा लढा स्वतःच द्यायला हवा............राजकारणी कोणीही असो............ते फक्त सत्तेचाच विचार करणार................आपण ज्या माणसांशी भांडण करतो (वरून मिळालेल्या आदेशामुळे)............तेच आदेश देणारी मंडळी आणि आपण ज्याच्याबरोबर भांडतो ते मात्र नंतर एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची टेकवून, सत्तेसाठी अभद्र युत्या करून..........जनतेला वेड बनवलं म्हणून गालातल्या गालात हसत असतात..............जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी हे लक्ष्यात ठेवावं.............पक्ष्य कोणताही असो.................कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो..............
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.

मंगळवार, ८ मार्च, २०११

आगरी बाणा-लेडीज स्पेशल



आगरी बाणा-लेडीज स्पेशल
आज ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आगरी बाणातील सर्व स्त्री सदस्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. फक्त त्या दिवशीच पुरुष मंडळी महिलांना चांगल्या शुभेच्छा देतात. आत्ता मी माझा अनुभव सांगतोय............जेव्हा valentine day होता तेव्हा मात्र सर्व मित्र मंडळी "advance msg" च्या नावाखाली १५-२० दिवस अगोदर पासून ते एस.से.मेस. मुलीना त्यांच्या मोबाईल वर अथवा फेसबुक वर पाठवत होते...........ही खरी परिस्थिती होती..............आत्ता कोणीच म्हणू शकणार नाही कि मी हा प्रकार केला नव्हता..........थोड्याफार फरकात का होईना सर्वानी हे केल होत............पण जेव्हा खरोखर स्त्रियांचा स्वताचा हक्काचा दिवस आहे तेव्हा मात्र काही मुलांनी एक औपचारिकता म्हणून कुठल्या तरी पराक्रमी स्त्री चा फोटो टाकला आणि त्यात सर्व मुलीना ट्याग केल..............याच्यातही थोड्याफार प्रमाणात "फ्लर्टिंग" दिसून येतेय..........मुलीना हे दाखविण्याच्या प्रयत्न केला कि आम्ही इतर मुलांपेक्ष्या वेगळे आहोत..............म्हणजेच "आम्ही नाही त्यातले" हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आणि करत राहतील...........हे अगदी जुन्या काळापासून चालत आलंय.........काय तर म्हणे रामायण आणि महाभारत हे स्त्रीयांमुळे घडले मी नाही मानत............ही तर पुरुषांची सत्तेची लालसा म्हणावी लागेल...........पण या सत्तेच्या लालसेत मात्र स्त्रीच भरडली गेलीय आजपर्यंत.........सीता निर्दोष असूनही तिलाच कष्ट सहन करावे लागले...........आणि आजच्या आधुनिक सीतेच ही काही वेगळ नाही................लैगिक छळ, बलात्कार, खून, हुंडाबळी यांसारखे अनेक प्रकार कमी होण्यापेक्ष्या दिवसेन-दिवस वाढतच आहेत...........याला जबाबदार कोन?????????????? आत्ता आपण नेहमी सारख उत्तर देऊ............"सरकार".............तर याला सरकार जबाबदार नसून आपली मानसिकता जबाबदार आहे...........आपण आपली मानसिकता जेव्हा सोडू तेव्हा कुठेतरी बदलाचे वारे वाहू लागतील..............तोपर्यंत हे असच चालू राहणार..................आपल्या पैकी किती जणांनी "नो वन किल्ड जेसिका" हा चित्रपट पाहिलंय????????? आपल्या समाजाची खरी खुरी मानसिकता त्या चित्रपटातून उघड झाली आहे...............ती जेसिका लाल श्रीमंत वर्गातील होती तरी तीचे हे हाल मग आपल्या सामान्य कुटुंबातल्या "जेसिकांची" परिस्थिती काय असेल थोडा विचार तर करून पहा.............
तर आत्ता हा आपला आगरी बाणा हा ग्रुप चालवताना मला आलेले काही अनुभव..................
जेव्हा ग्रुप सुरु केला तेव्हा ग्रुप चाटींग हा पर्याय उपलब्ध होता. आपल्या ग्रुपला सुरुवातीपासून मुलींचा चांगला प्रतिसाद लाभत आला आहे..आगरी बाणाची स्वतःची स्वतंत्र नियमावली असताना देखील त्या काही मुलांनी चाटींग वर मुलीना त्रास देवून त्यांची लायकी सिध्द केली............अशा मुलांना मुली म्हणजे नेहमी टाईमपासच वाटतात............मग अश्या मुर्ख प्रवृत्तीच्या सदस्यांवर कारवाई करून त्यांना ग्रुप च्या बाहेर काढण्यात आले.........
मी स्वतः ५०-५०% समान हक्क मानणारा आहे..........त्यामुळे आगरी बाणा वर प्रत्येक स्त्री सदस्याचा नेहमी मान राखला जातो आणि त्यांनी आगरी बाणा वर मांडलेल्या सर्व विचारांचं मी स्वागत करतो..........कारण एक स्त्री जेव्हा स्वतःची जबाबदारी समजते तेव्हा ती संपूर्ण समाजाची जबाबदारी पुरुषांपेक्ष्या कितीतरी अधिक पटीने योग्यरीत्या सांभाळू शकते हा मला विश्वास आहे............त्यामुळे आगरी बाणाच्या सर्व स्त्री सदस्यांनी आपले विचार मनमोकळेपणाने मांडावेत........... जर तुम्ही सर्व पोरी पुढे आलात तर आपल समाज बांधणीच काम अतिशय योग्य स्वरुपात पार पडल जाईल............पुन्हा एकदा आगरी बाणाच्या सर्व स्त्री सदस्यांना "जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
आपलाच,
आमोद पाटील.
(संपादक-आगरी बाणा)
आगरी बोली-आगरी बाणा.

सोमवार, ७ मार्च, २०११

माझे आजुसचा नंगोट

माझे आजुसचा नंगोट

ऐंसा माजे आजुसचा नंगोट
चार बाय चारचा हाय टेरिकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ ||

दिसाला चोंकोन न्यासाला तीरकोन
पूरशी सरलकोट न मंगारशी बगला त भुईकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ ||

आजुसचे नंगोटयाव चिमन्या पोपट
पुन जर का गाठ सुटली त बाला धंदाच चोपट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ ||

आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

रविवार, ६ मार्च, २०११

जे.एन.पी.टी. आणि सिडको विरोधात एल्गार.....................


लाल सलाम.........लाल सलाम..............हुतात्म्यांना लाल सलाम..........!!
आमचे प्रकल्पग्रस्तांचे भीष्माचार्य माननीय लोकनेते रायगडचे माजी खासदार श्री.दि.बा.पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून जे.एन.पी.टी. आणि सिडको विरोधात गावागावांत साखळी उपोषण.................!!
"हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही, आम्ही ते वाया जाऊ देणार नाही."
आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

बुधवार, २ मार्च, २०११

जे.एन.पी.टी. बेमुदत बंद




जे.एन.पी.टी. बेमुदत बंद



आगरी बांधवांचे माननीय लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली २३ मार्च २०११ रोजी जे.एन.पी.टी. बेमुदत बंद.


आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.